आज ४ जुलै:स्वामी विवेकानंद यांची १२१ वा स्मृती दिन.! – बडगुजर. इन

आज ४ जुलै:स्वामी विवेकानंद यांची १२१ वा स्मृती दिन.!
(१२/१/१८६३-४/७/१९०२)
नरेंद्रनाथ दत्त हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते.ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले,तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा (शिकवण पद्धती) परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली.
संक्षिप्त👇माहिती
जन्म: १२ जानेवारी १८६३
कोलकाता,बंगाल प्रेसिडेन्सी, भारत.
मृत्यू: ४जुलै१९०२ बेलूर मठ,बंगाल प्रेसिडेन्सी,भारत.
राष्ट्रीयत्व: भारतीय
नागरिकत्व: ब्रिटीश भारत
शिक्षण: कला शाखेत पदवीधर
प्रशिक्षणसंस्था: कलकत्ता विद्यापीठ
धर्म: हिंदू
वडील: विश्वनाथ दत्त
आई: भुवनेश्वरीदेवी दत्त
~~~~~~~~
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले.विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. “माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो…” या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत,ज्यामध्ये त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला.

बालपण: माता भुवनेश्वरी देवी,उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३,सोमवारी सकाळी ६:३2 वा.(पौष कृष्ण सप्तमी,संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले.वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते.ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते.वेद,उपनिषदे,रामायण,महाभारत,भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम,खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई.त्यांना वाचन, व्यायाम,कुस्ती,मुष्टियुद्ध, पोहणे,होडी वल्हवणे, घोडेस्वारी,लाठियुद्ध,गायन आणि वादन इत्यादी छंद होते.

शिक्षण: नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली.नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला.येथे त्यांनी तर्कशास्त्र,पाश्चात्त्य तत्त्वज्ञान,आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्रनाथांनी डेविड ह्युम, इम्यानुल कँट,गोत्तिलेब फित्शे,बारूच स्पिनोझा,जॉर्ज हेगेल,आर्थर शोपेनहायर,ऑगस्ट कोम्ट,हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता.हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते.गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता.काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता.त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ.विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे.मी खूप फिरलो,जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना “श्रुतिधारा” (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.

गुरू रामकृष्ण यांची भेट: कोलकात्यात शिमला नामक मोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले.इ.स.१८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले.त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले.सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले,असे दिसते.

नरेंद्राची साधना: अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले.त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली.रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरुण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले.येथे या ठिकाणीच भावी ‘रामकृष्ण संघाची’ पायाभरणी झाली.

गुरुभेट व संन्यासदीक्षा: याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यासदीक्षा दिली.संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले.नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ.रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते.धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, “भाई,धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस.तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.” एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले.सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत.त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे.रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते.एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, *"हे सारे माझ्याने होणार नाही."* रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही?अरे तुझी हाडं हे काम करतील.पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरणस्वामी विवेकानंद’ असे केले.

धर्मप्रसार: रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली.तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे,असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.

रामकृष्ण यांच्या समाधीनंतर: स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले.अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले.तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले.भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.

शिकागोतील सर्वधर्म परिषद: सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंद,११सप्टेंबर,१८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती.त्या सभेला विवेकानंद गेले.तेथे त्यांनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला,जो दोन मिनिटे अखंड चालू होता. *”जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली”आहे,अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने,मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो” या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले.ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना,वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले.जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले.काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले.या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन *’भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’* असे केले. ‘न्यू यॉर्क क्रिटिक ने’ त्यांच्याबद्दल लिहिले आहे की “ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत.” वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका,इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली.अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

समाधी: शुक्रवार, ४जुलै १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या.ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली.कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.

तत्त्वविचार आणि शिकवण: गुरू रामकृष्ण परमहंस,स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या ‘वेदान्त’ शाखेचे पुरस्कर्ते होते.आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत,त्यामुळेच ‘शिवभावे जीवसेवा’ हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.
👉अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
👉कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
👉उठा,जागे व्हा,आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
‘दरिद्री नारायण’ हा शब्द विवेकानंदानी जगाला दिला.
👉त्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: ‘सखार प्रति’)(या मथळ्याचा अर्थ : मराठी-“मित्रास”,इंग्लिश- “To a Friend”) नावाच्या कवितेतील एक अंश-
मूळ बंगाली उतारा:
বহুরূপে সম্মুখে তোমার, ছাড়ি কোথা খুঁজিছ ঈশ্বর?
জীবে প্রেম করে যেই জন, সেই জন সেবিছে ঈশ্বর।
देवनागरी लिप्यंतरण:
बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि
कोथाय खूंजिछो ईश्वर
जीवे प्रेम करे जेई जन
सेई जन सेविछे ईश्वर
अर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे.ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात.

आत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती:
ज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही ‘योग’ म्हणतो,आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळणारे असतात,ते👇वर्गीकरण👇.

१.)कर्मयोग:या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
२.)भक्तियोग:यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
३.)राजयोग:यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.
४.)ज्ञानयोग:ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.
त्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत.(ग्रंथावली खं.८,पृ.३८६)

कर्मयोग: अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय.संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या एकूणेक दुःख-क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो.माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून निःस्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण निःस्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल.

ब्रह्म संंकल्पना: अद्वैत तत्त्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे,आणि तिलाच तत्त्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.

भक्तियोग:;भक्तियोग म्हणजे खऱ्या,अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान.ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून,प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच.अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.

शिक्षण संदर्भातील विचार: शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे

प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके:

विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम,१८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले.ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे:अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य,दत्ता टोळ)

मानवतेचा महापुजारी(सुनील चिंचोलकर)

राष्टद्रष्टे विवेकानंंद:(वि.वि. पेंंडसे,ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन

शोध स्वामी विवेकानंदांचा (दत्तप्रसाद दाभोळकर)

संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी,लेखक – चंद्रकांत खोत))

स्वामी विवेकानंद(संदीप जावळे-(२०१५)

स्वामी विवेकानंद आणि २१वे शतक(श्रीपाद कोठे)

स्वामी विवेकानंद: भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)

नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार:
पुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची नृत्यनाटिका सादर करतात(इ.स.२०१३)

पुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो.(इ.स. २०१३)

शंकर अभ्यंकर हे ’स्वामी विवेकानंद’ या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात.(इ.स. २०१३)
पुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते.
पुरस्कारार्थी: निनाद बेडेकर (२०१३)

विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते.संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे,लेखिका शुभांगी भडभडे आणि दिग्दर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केलेआहेत,१७/७/ २०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला.या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.
विवेकानंदांच्या जन्म दिवशी महाराष्ट्रातील अनेक संस्था वक्तृत्व स्पर्धा,गीता पठण स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आदी आयोजित करतात.काही ठिकाणी सामुदायिक सूर्यनमस्कारांचा, योगासनांचा कार्यक्रम असतो.विविध शहरात जुलूस निघतात. काही संस्था स्वच्छता अभियान,छायाचित्र प्रदर्शन किंवा प्रश्नोत्तर स्पर्धा यांतला एखादा कार्यक्रम करतात.

भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव: डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहरूंचे पीए एम.ओ.मथाई यांना म्हणाले होते की “अलीकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद आहेत,गांधी नव्हे.”
सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, “जोपर्यंत बंगालचा संबंध आहे,आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे ‘आध्यात्मिक पिता’ म्हणू शकतो. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला.काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली.तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता._
मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता👇येईल:
👉 स्वामीजींनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.
👉 निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय,असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले.
👉 भारतातील राष्ट्रीय चळवळी,आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे._
👉पाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली._
अश्या महान विभूतीस १२१ व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन🌹🙏🌹
संदर्भ:गुगल/इंटरनेट.
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👉👉

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*