नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ८३👇- बडगुजर. इन


नर्मदे हर

मागच्या भागात मी तुम्हाला सुरज कुंड च्या आधी पर्यंत चे अनुभव सांगितले होते. गरीब माता राम आणि तिच्या मुलाला भेटल्यानंतर मनात आलेल्या विचारांची साखळी सुद्धा तुमच्या पुढे मागच्या अनुभवात ठेवली होती. आता पुढे सांगते.

सूर्यकुंड ला पोहोचण्याच्या आधी वाटेत एका गावात आम्हाला पुन्हा एकदा चहा ला बोलावलं. तो खरं तर एक जुना आश्रमच असावा मात्र आता तिथे एक कोणी बाबाजी एकटेच राहत होते. बाबाजींनी छान गूळ आणि आलं घातलेला काळा चहा केला. चहा घेऊन आम्ही निघणार तेवढ्यात बाबाला कुणाचा तरी फोन आला आणि आम्ही पुन्हा काही वेळ तिथेच विसावलो. यावेळी आलेला अनुभव फक्त माझा होता आणि म्हणून तो फक्त मलाच मिळाला.

अनेक लोक नर्मदा परिक्रमा करतात पण एक अगदीच ठरलेले असते ते म्हणजे ज्याचे त्याचे प्रारब्ध. अनेकांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेत बरेचदा रस्ते सारखे असतात, ठिकाणं सारखी असतात, अनुभव मात्र वेगळे असतात. आम्ही दोघं सहप्रवासी असून सुद्धा काही अनुभव फक्त मला मिळालेत तर काही अनुभव फक्त बाबाला मिळाले. त्यापैकी एक तुम्हाला आता सांगते आहे. या अनुभवाचा सूर्यकुंडाशी निकटचा संबंध आला तोही सांगते.

चहा घेऊन झाल्यावर बाबा फोनवर बोलत रस्त्यावर येरझारा घालत होता. मी आणि बाबाजी आश्रमाच्या पडवीत बसलेलो होतो. बाहेर आभाळ भरून आलं होतं आणि कोणत्याही क्षणी कोसळेल असं वाटत होतं.आम्हाला सूर्य कुंडला मुक्काम करण्याची इच्छा आधीपासून होती मात्र या बाबजींकडे आल्यावर ती इच्छा अधिकच बळावली. सूर्यकुंड हनुमान मंदिर अतिशय छान आहे हे मी ऐकून होते. त्या मंदिराचं एक रहस्य आहे असं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. ते आता सांगते. सूर्य कुंडाच्या हनुमान मंदिराचं एक वैशिष्ट्य असं मंदिरातील मारुतीरायां चे वेगवेगळे रूप आपल्याला दिसतात. पुस्तकात असंच लिहिलं होतं. आणि ते तीन वेगवेगळी रूपं बघण्यासाठी मला ख्खा दिवस सूर्यकुंडला घालवायचा होता. मात्र बाबाजींकडे आल्यावर ही इच्छा अधिक प्रबळ कशी झाली ते सांगते.

बाबा फोनवर बोलत असताना मी आणि बाबाजी सूर्यकुंड विषयी बोलत होतो. बोलता-बोलता बाबाजी म्हणाले, “हनुमांजी चिरंजीव है इसका प्रत्यय बहुत लोगो को आता है. शायद आपको भी ऐसा हुआ होगा, अगर नही हुआ होगा तो बहुत जल्दी हो जायेगा ऐसा मेरा विश्वास है”… त्यांच्या या बोलण्या नंतर मी मला झालेलं मारुतीरायां चं दर्शन आणि गुजरात मधल्या कांदरोज गावी जात असताना, ज्या वेळी मी एकटी होते तेव्हा आजुबाजूच्या सृष्टीने गायलेल्या हनुमान चालीसा चा अनुभव बाबाजींना सांगितला. ते ऐकून बाबाजींच्या डोळ्यात पाणी आलं… ते उठून आत गेले. त्यांनी एक भजनांचं पुस्तक आणलं आणि सुंदरकांडावर आधारित अवधी भाषेतलं एक भजन ते गाऊ लागले. मला आता शब्द आठवत नाहीत, पण अतिशय रसाळ शब्द आणि मधुर चाल असलेलं हे भजन बाबाजी खूप प्रेमाने, भक्तीने आणि गोड आवाजात गात होते. भजन गाण्यापूर्वी बाजूला एक आसन त्यांनी मांडून ठेवलेलं होतं. डोळे मिटून मी ते भजन ऐकत होते. भजन संपूच नये असं मला वाटत होतं. बंद डोळ्यात कुठे मारुतीरायांचं रूप उभं राहिलं होतं. भजन लवकरच पूर्ण झालं,बाबाजींनी बाजूच्या रिकाम्या आसनाला मनोभावे नमस्कार केला त्यावेळी अंगावर काटाच आला होता. बाबाजी रिकाम्या आसनाकडे डोकं टेकवून नमस्कार करत होते आणि क्षणभर मारुतीराया यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे की काय असा मला भास झाला…. हो हा भासच होता… पण त्यात सुद्धा एक क्षणासाठी का होईना मारुतीराया इथेच आहेत असं वाटलं होतं. मी आणि बाबाजी आम्ही दोघंही शांत बसलो होतो… बाबाचा फोन आटोपला आणि बाबा आत मध्ये आला तेव्हा कुठे आम्ही पुन्हा बोलायला सुरवात केली.
क्रमशः८४
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*