नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७८
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला बोंदरगाव च्या मुली बद्दल सांगितलं होतं. अचानक पणे रस्त्यात भेटलेली टेलर मुलगी आणि तिने दिलेली सेवा ही मी तुम्हाला सांगितली होती. खरंगहना ला झालेला सत्संग देखील आपण बघितला. इथून पुढे आम्ही कुकरा मठ ला गेलो. कुकरा मठ ला एका कुत्र्याचं मंदिर आहे. कुकुर म्हणजे कुत्रा. कुत्र्याचं मंदिर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या कुत्र्याची गोष्ट थोडक्यात सांगते.
ही गोष्ट एका बंजारी जमाती मधल्या बाईच्या कुत्र्याची आहे. ही बंजारी जमात गावोगाव फिरत असते. एकदा ही जमात दिंडोरी जवळ थांबली असताना एका बंजारी बाईला कर्जाची गरज भासली. तिथल्या सावकाराकडून तिने कर्ज घेतले मात्र गाव सोडताना ते कर्ज ती परत करू शकली नाही. काहीतरी ठेव ठेवायची म्हणून त्या बंजारी बाईने आपला कुत्रा सावकाराला दिला. कुत्र्याला समजवून सांगितलं की आता तुझे मालक सावकार आहेत. त्यांची तू सेवा करायची तरच माझं कर्ज फिटेल. हा कुत्रा देखील सावकाराची प्रामाणिकपणे सेवा करू लागला.एकदा सावकाराकडे चोरी झाली मात्र कुत्र्याने प्रसंगावधान राखून चोरांना पळून लावले आणि सावकाराचा जीव वाचवला. सावकाराला अतिशय आनंद झाला आणि ह्या बंजारी बाईच्या कुत्र्याने आपले प्राण वाचवले हे पाहून त्याने त्या बंजारी बाईचे सर्व कर्ज सावकाराने माफ केले. इतकेच नव्हे तर आपल्या जवळील सर्व दागिने एका रुमालात बांधून त्यात एक चिठ्ठी ठेवली. “मी तुझ्या कुत्र्याला बंधनमुक्त करत आहे आणि या दागिन्यांसह तुझ्याकडे परत पाठवत आहे” असं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं.
कुत्रा अतिशय आनंदाने आपल्या मालकिणीकडे दागिन्यांचं गाठोडं घेऊन निघाला. मालकिणीला भेटला आणि तिच्या पुढ्यात दागिन्यांचं गाठोडं ठेवलं. ते दागिने पाहून बंजारीण चिडली, रागावली, तिला वाटलं या कुत्र्यानेच सावकाराकडे चोरी केली. दिलेली चिठ्ठी न वाचताच तिने कुत्र्याला काठीने चांगलेच बदडून काढले. आणि त्यातच त्या कुत्र्याचा जीव गेला. दागिन्यांची पिशवी घेऊन बंजारीण सावकाराकडे गेली असता झालेली हकीगत तिला समजली. आपल्या कुत्र्याच्या निधनामुळे आणि स्वतःच्या कृत्यामुळे ती फार फार दुखी झाली आणि जिथे त्या कुत्र्याने देह सोडला तिथेच तिने त्याचे मंदिर बांधले व शेवटपर्यंत या मंदिरात सेवा करत राहिली.हे मंदिर बघतो त्यावेळी आणि ही कथा ऐकतो त्यावेळी मन खरोखरीच भरून येते. या कुकरा मठ चा परिसर अतिशय रमणीय आहे.
कुकरा मठ होऊन पुढे ऋणमुक्तेश्वर मंदिर बघत पुढे आलो. आम्ही नर्मदा किनाऱ्यापासून साधारण तीन ते चार किलोमीटर दूर असू. इथे पुढे गोमती नदीचा संगम आहे. आम्ही मात्र रस्त्यानेच पुढे पुढे जात होतो. वाटेत एका दुकानात आम्हाला चहा आणि फराळासाठी बोलावलं. त्याच दुकानात एक गिर्हाईक आला होता. त्याला परिक्रमावासींबद्दल फार आस्था होती. जरा विश्राम झाल्यावर जाता जाता त्याने बाबाच्या हातात एक कागदाची पुंगळी कोंबली. बरेचदा लोक दक्षिणा अशी कागदात गुंडाळून देतात. आम्हाला वाटलं त्यानेही दक्षिणा दिली असेल. तो पुढे निघून गेल्यावर बाबाने कागदाची पुंगळी म्हणून पाहिली तर त्यात पैसे नव्हते. त्यात “कृष्णा” आणि खाली फोन नंबर लिहिला होता. सोबत एक नोट लिहिली होती ती अशी- “आपको मेरी जरुरत ना पडे तो अच्छा है, लेकिन आपको मेरी जरुरत पडने वाली है तब मुझे फोन करियेगा”… मैयानी दिलेलं दान समजून तो फोन नंबर फोन मध्ये सेव करून घेतला आणि आम्ही पुढे निघालो. कृष्णा ने आमचा फोन नंबर घेतला नव्हता. तो कुठला राहणारा याबद्दल आम्हाला माहिती नव्हती. त्याची गरज आम्हाला पडेल का? केव्हा पडेल? आणि त्याची मदत होईल का? असा कुठलाच विचार आम्ही केला नव्हता, मात्र त्याच्या मदतीची वेळ अगदीच समोर आहे हे आम्हाला तरी कसं समजणार?
आम्ही दिंडोरी ला पोहोचलो. साधारण साडेचार पाच झाले असणार. किनाऱ्यावर आश्रम आहे तिथे गेलो. आश्रमात प्रचंड गर्दी होती. अजिबात जागा नव्हती. जी जागा आम्हाला दाखवण्यात आली की अतिशय कोंदट, कुबट, धूळ ग्रस्त अशी असल्याने तिथे रहावसं वाटलं नाही. स्नान पूजादि आटोपून मग बघुयात, वाटलं तर अंगणात आसन लावूयात असं आम्ही ठरवलं.आमचं स्नानादी आटोपून झाल्यावर ठरल्याप्रमाणे अंगणात आसन लावणार तोच बाबाच्या मनात विचार आला, अजून कुठली जागा माहीत असेल तर ह्या कृष्णा ला विचाराव का? जी चिट्ठी मैया ने आपल्या हाती दिली कदाचित त्याचा उपयोग करण्याची हीच वेळ असेल? कदाचित अशी वेळ येणार आहे हे माहीत असल्यानेच मैया ने कृष्णाला त्याचा नंबर आम्हाला देण्याची बुद्धी दिली असेल?.. बाबांनी कृष्णाला फोन केला. फोन येताच कृष्णाने आम्हाला आम्ही कुठे आहे ते विचारलं आणि फोन बंद केला. मग कृष्णा चा फोन लागला नाही. मात्र थोड्याच वेळात आम्हाला शोधत शोधत दोघं मुलं आली. त्यांच्याजवळ दुकानात काढलेला आमचा आणि कृष्णाचा फोटो होता. “बाबाजी मैया जी चलो आपकी व्यवस्था दुसरी जगह कर दीयी है.. अभी अभी हमारे बडे भैया कृष्णा भैया का फोन आया था..” असं म्हणत ती दोघं मुलं आम्हाला एका मोठ्या बिल्डिंगच्या फटका समोर घेऊन आलीत. ही बिल्डिंग बहुधा काही ऑफिसेस किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स सारखी असावी मात्र कुठलीही पाटी लिहिलेली नव्हती. “यहाँ नीचे एक रूम है, आप विश्राम कीजिए. भोजन थोडी देर मे आ जायेगा” असं म्हणून आमचं सामान रूम मध्ये ठेवून ती मुलं निघून गेलीत… सांगितल्याप्रमाणे थोड्यावेळात पुरी, भाजी, भात वरण आणि गुलाबजाम असा जेवणाचा डब्बा आला. कृष्णाचा फोन काही केल्या लागेना… मात्र ती रात्र अगदी फाइव स्टार फॅसिलिटी असल्यासारखी गेली… कोण कुठला हा कृष्णा मैयाच जाणे… पुढे अनेक दिवस कृष्णाचा फोन लावून पाहिला मात्र त्याचा फोन कधीच का लागला नाही हे कोडं उलगडत नाही. कृष्णाने देखील नंतर कधी फोन केला नाही. माझ्याकडे या व्यतिरिक्त कृष्णाबद्दल काहीही अजून माहिती नाही. इतकच काय तर आमचा आणि कृष्णाचा फोटो देखील कृष्णाने त्याच्या कॅमेरा काढला होता तो ही आमच्याकडे आलेला नाही.
दिंडोरी होऊन पुढे सलैया, किसलपुरी मार्गे नंतर आम्ही सक्का ला येउन थांबलो. हा रस्ता डोंगराळ रस्ता आहे. दूर दूर पर्यंत रस्ता आणि चढाव दिसत राहतो. आजूबाजूला शेती आहे आणि झाडं अजिबात नाहीत. दुपारच्या टळटळत्या उन्हात विसावा म्हणून असा काही नाहीच. नाही म्हणायला कुठेकुठे पाण्याचे रांजण भरून ठेवलेले. आणि वाटेत येणारे जाणारेही फार म्हणून नाही. दुपारचं टळटळ ऊन मला जाणवू लागलं होतं. मजल दरमजल करत समोर दिसणाऱ्या टेकडीच्या वर असलेल्या वस्तीमध्ये आता आपण विश्राम करू असं आम्ही ठरवलं होतं. जवळचं पाणी संपत आलं होतं. क्वचित एखादा येणारा जाणारा नर्मदे हर करायचा. असाच कुठून सा एक माणूस आमच्या पाशी येऊन थांबला. त्याच्याजवळ हिरो पुक गाडी होती. त्याच्या गाडीच्या दोन्ही बाजूला कसल्याश्या मोठाल्या बॅग बांधल्या होत्या. शेताच्या एका कोपऱ्यात, नाली च्या बाजूला, एका काटेरी झाडाखाली, थोड्याशा सावलीत मी आणि बाबा बसलेलो होतो. ती गाडी आमच्या पुढे येऊन थांबली आणि त्या गाडीवाल्या तरुणाने मागच्या बॅगा उघडून सुंदर रसरशीत लाल टमाटे बाहेर काढले. पटकन खिशातून चाकू काढला. टमाट्याच्या चार फोडी केल्या त्यावर मीठ मसाला घालून एका पेपर प्लेट मध्ये आमच्या पुढ्यात ठेवल्या. “बाबुजी अभि खेत से तोडे है टमाटर, एकदम ताजे है, मुझे नमक मसाला डालकर खाना पसंद है इसलिये साथ नमक मसाला भी रखा है..आपको देख के लगा आपको बहुत प्यास लगी होगी इसीलिए अभी काटके दिया टमाटर… और भी है रास्ते के लिए देकर रखता हु” असं म्हणत चार टमाटे बाबाला आणि चार टमाटे मला असे जबरदस्ती हातावर ठेवले. सोबतच दुसऱ्या पिशवीतून काही आवळे काढले आणि तेही आम्हाला दिले. मैय्या फक्त भुकेची काळजी घेते असं नाही. माझ्यासारख्या डायटीशियन ला त्यावेळी टमाटे आणि आवळे मिळण्याचं महत्त्व समजू शकतं. योग्यवेळी रसदार आणि पोषक विटामिन असलेलं फळ मिळणं म्हणजे काही गंमत नाही हं!
*याच रस्त्यावर एक स्कूटर वाले म्हातारे आजोबा येऊन थांबले. आमची चौकशी केली. आम्हाला दहा दहा रुपयांची दक्षिणा घेऊन परत फिरले आणि म्हणाले “मै अभी आ रहा हु, आप चलते रहो मै आपको पकड लूंगा”… आम्ही पुढे निघालो. त्या आजोबांची दक्षिणा देऊन झाली होती. आता कशाला परत येतील ते? असा विचार करून आम्ही त्यांच्यासाठी थांबलो नाही. पुढेच चालत राहिलो. तासा दीड तासांनी स्कूटर वाले आजोबा पुन्हा आमच्या मागून आले आणि एक भली मोठी पिशवी आमच्या हाती दिली. त्या पिशवीचं वजन साधारण तीन-साडेतीन किलो असेल. आम्ही एवढी जड पिशवी घेऊन चालू शकणार नाही.
क्रमशः
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
..


Leave a Reply