संपूर्ण भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला.डॉ.राधाकृष्णन हे विद्वान आणि शिक्षक होते.शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शिक्षणाप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि शिक्षकांबद्दलचा आदर पाहून त्यांचा वाढदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.आपले पालक आपल्याला जन्म देतात आणि शिक्षक योग्य मार्गदर्शनाने आपले भविष्य उज्ज्वल करतात. त्यामुळेच आपल्या पालकांपेक्षा शिक्षकांचे स्थान वरचे असते असे म्हणतात. कारण शिक्षणाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी शिक्षणाची गरज असते.केवळ शिक्षकच नि:स्वार्थीपणे शिक्षण देऊ शकतात. आपल्या शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल आपण नेहमी आदर केला पाहिजे.
“जीवनाच्या सर्व अंधारात
प्रकाश दाखवता तुम्ही,
बंद झाले सर्व दरवाजे
तर मार्ग दाखवता तुम्ही,
केवळ पुस्तकी ज्ञान नाही
जीवन कसे जगायचे
हे शिकवता तुम्ही..!”.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. असे म्हणतात की भक्कम इमारतीचा पाया हा जितका महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरूचे महत्त्व आहे.
🙏गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः |🙏
हा मंत्र गुरु गीता अध्यायच्या गुरु स्रोतामधून घेतला आहे.
ज्याचा अर्थ आहे गुरू ब्रह्मा आहे, गुरू विष्णू आणि गुरु भगवान शंकर आहेत. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अशा श्रीगुरुंना माझा नमस्कार ते गुरु ब्रह्मा समान आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे हुशार विद्यार्थी होते. त्यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी “ऐथिक्स ऑफ वेदांत” वर एक पुस्तक लिहिले आणि वयाच्या २० व्या वर्षी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तत्त्वज्ञानाची पदवी घेण्याबरोबरच ते शिक्षकही झाले.
भारतीय तत्त्वज्ञान त्यांनी नेहमीच जागतिक पटलावर ठेवले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या जीवन काळात एक नामवंत शिक्षक, एक प्रख्यात लेखक आणि उत्तम प्रशासक, आणि शेवटी एक हुशार विद्यार्थी देखील होते. ते भारताचे उपराष्ट्रपति आणि दुसरे राष्ट्रपति झाले, पण आयुष्यात एवढे मोठे पदे भूषवत असतानाही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे राहणीमान एकदम साधे होते.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त काही विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असता त्यांनी त्यांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा करण्यास नकार दिला आणि त्याऐवजी हा वाढदिवस संपूर्ण भारतातील शिक्षकांना समर्पित व्हावा अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1962 रोजी भारतात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
गुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागू पाय ॥
बलिहारी गुरु आपने, गोविन्द दियो बताय ॥
या प्रसिद्ध ओळी कबीरदासजींच्या आहेत. या ओळींद्वारे कबीरदासजी म्हणतात, जर तुमच्यासमोर गुरु आणि गोविंद म्हणजेच देव उभे असतील तर तुम्ही सर्व प्रथम तुम्ही कोणाला वंदन कराल.
कवी, कबीरदासजी म्हणतात, गुरूच तुम्हाला गोविंद म्हणजेच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात, याचा अर्थ तुम्ही आधी तुमच्या गुरूची पूजा केली पाहिजे.
“चिखलातला जन्मही सुंदर सार्थकी लावावा.
निसर्गासारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा.”
मित्रांनो, आई ही मुलाच्या आयुष्यातील पहिली गुरू असते जी आपल्याला या जगाची जाणीव करून देते.
दुसरीकडे, शिक्षक आपल्याला सांसारिक जीवनाची समज देतात, ज्याप्रकारे कुंभार मातीच्या भांड्याला आकार देतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.
गुरू आपल्याला दगडाप्रमाणे कोरून एक आकर्षक रूप देऊन जगात नवीन जन्म देतात. उंच आणि उंच ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपल्याला एक चांगला नागरिक, एक चांगला मुलगा, एक चांगला भाऊ, एक चांगला पती आणि एक चांगला पिता बनवतात.
आपल्या जीवन निर्मात्या आणि पूज्य गुरूंबद्दल आता काय बोलू, त्यांच्यासाठी जगातील प्रत्येक शब्द लहान आहे. शेवटी मी माझे भाषण दोन ओळींनी संपवतो.
गुरुविना ना मिळे ज्ञान,
ज्ञानाविना ना मिळे सन्मान
जीवन भवसागर 🌊 तराया,
चला वंद्या गुरुराया…!
माझ्या सर्व मित्रांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
🙏.🙏


Leave a Reply