.
रक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील. रक्षाबंधनचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले. राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे. राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते. एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात. द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम. स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.) असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते. रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग – रक्षाबंधन घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ! शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-बाबाकडून मिळणारा ‘प्रसाद’ वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो. शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते. लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणार्या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली. तिचे डोळे पुसत मधल्या सुटीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते. शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा ‘बॉडीगार्ड’च बनूनच जातो. तिच्या आवडीनिवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो. ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो. आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव! स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते. व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे. लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठेहोईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो. बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. आपली बहीण सुखात राहावी अशी प्रत्येक भावाची मनोकामना असते. बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहानपरी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत. दादाची ती लाडकी छकुलीच असते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते. दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.| राखी पौर्णिमा श्रावण पौर्णिमेला येणार्या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व या लेखातून विशद केले आहे. १. रक्षाबंधन : इतिहास अ. ‘पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.’ आ. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। अर्थ : ‘जे बारीक रक्षासूत्र महाशक्तीशाली असुरराज बळीला बांधले होते, तेच मी तुम्हाला बांधत आहे. तुमचे रक्षण होवो. हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण होवो.’ इ. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली. २. राखी बांधण्यामागील शास्त्र राखीपौर्णिमेच्या अर्थात् रक्षाबंधन या दिवशी वातावरणात यमलहरींचे प्रमाण जास्त असते. यमलहरी या पुरुष साकारत्व असतात. म्हणजेच त्या पुरुषांच्या देहात जास्त प्रमाणात गतीमान होतात. याच कारणास्तव यमदूत किंवा यमराज यांना प्रत्यक्ष चित्र-साकारतेच्या दृष्टीने साकारतांना पुरुष स्वरूपात साकारले जाते. पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह वहाणे चालू झाले की, त्यांची सूर्यनाडी जागृत होते आणि या जागृत सूर्यनाडीच्या आधारे देहातील रज-तमाची प्रबलता वाढून यमलहरी पूर्ण शरिरात प्रवेश करतात. जिवाच्या देहात यमलहरींचे प्रमाण ३० प्रतिशतहून अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते; म्हणून पुरुषात असलेल्या शिवतत्त्वाला जागृत करून जिवाच्या सुषुम्नानाडीची काही अंशी जागृती करून प्रत्यक्ष शक्तीबिजाद्वारे, म्हणजेच बहिणीद्वारे प्रवाहित होत असलेल्या यमलहरींना, तसेच त्यांना प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी साहाय्य करणार्या सूर्यनाडीला राखीचे बंधन घालून शांत करण्यात येते.’ भावनिक महत्त्व रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पालटतो. ४. राखी बांधणे तांदूळ, सोने आणि पांढर्या मोहर्या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्याने बांधली जाते. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।। अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस. अ. तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ? ‘तांदूळ हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक, म्हणजेच ते सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान-प्रदान करणारे आहे. तांदुळाचा समुच्चय पांढर्या वसनात बांधून तो रेशमाच्या धाग्याने शिवरूपी जिवाच्या उजव्या हातात बांधणे, म्हणजे एक प्रकारे सात्त्विक रेशमी बंधन सिद्ध करणे. रेशमी धागा सात्त्विक लहरींचे गतीमान वहन करण्यात अग्रेसर आहे. कृतीच्या स्तरावर प्रत्यक्ष कर्म घडण्यासाठी हे रेशमी बंधन प्रत्यक्ष सिद्ध केले जाते. राखी बांधणार्या जिवातील शक्तीलहरी तांदुळाच्या माध्यमातून शिवरूपी जिवाकडे संक्रमित झाल्याने त्याची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्यातील शिवतत्त्व जागृत होते. तांदुळाच्या कणांच्या माध्यमातून शिवातील क्रियाशक्ती कार्यरत होऊन वायूमंडलात कार्यलहरींचे गतीमान प्रक्षेपण करून वायूमंडलातील रज-तमकणांचे विघटन करते. अशा रितीने रक्षाबंधनाचा मूळ उद्देश शिव आणि शक्ती यांच्या संयोगाने साध्य करून या दिवसाचा लाभ मिळवणे मानवजातीच्या दृष्टीने जास्त इष्ट ठरते.’


Leave a Reply