नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५७
नर्मदे हर..
तर जयंती माता मंदिरात आलेला अनुभव मला संपूर्ण पणे हलवून टाकणारा होता. माझ्या काका आजोबांची बातमी ऐकून मला खूप कसं तरीच होत होतं. अर्थात त्या परिस्थितून मी बाहेर आले पण कदाचित या मानसिक आघाताचा माझ्या शरीरावर परिणाम झाला. मला खूप ताप चढला. लक्कड कोट ची घनदाट झाडी पार केली खरी पण नंतर पामाखेडी ला न थांबता दंठा ला मुक्काम केला. गरम पाण्याने आंघोळ करायला मिळाली इतकंच आठवतंय….. मी लगेच झोपी गेले असावे, माझा ताप थोडा वेळ उतरून पुन्हा लगेच चढायचा…असं दोन दिवस सतत सुरु होतं.
मध्ये दोन मुक्काम अजून झाले, तमखान नंतर मी फार चालू शकत नव्हते, पण का कोण जाणे नेमावर लाच थांबायचं अशीच मागणी मी मैया जवळ करत होते आणि माझी तब्ब्येत मात्र अधिकच खालावू लागली. मला नर्मदा जयंती ला नेमावर लाच असायचं होतं, हट्टच होता तो माझा, मैयाकडे. तमखान नंतर तर माझ्याने एक पाऊलही चालवेना, चक्कर आणि उलट्या देखील सुरु झाल्या. अंगावर खूप पुरळ उठलं, आग आग होऊ लागली..मात्र ती नर्मदा माई लेकराला सांभाळतेच… माझी अवस्था पाहून एक राजपूत सिंग नावाचे कुणी आम्हाला विश्राम करा, असा आग्रह धरू लागले… ते डॉक्टर आणतो म्हणून गेले ही, पण इथे त्यांना डॉक्टर मिळाला नाही…. त्यांनी घरी फोन करून जेवणाचा डब्बा, चहा आणि दोन स्कार्फ मागवलीत, त्यांचा मला फारच उपयोग झाला.. ते काही अंतर आमच्या सोबत पायी चालले देखील. आमची व्यवस्था अविनाश करत आहे हे समजल्यावर ते घरी परतले…अविनाश सोळंकी यांचा फोन आला त्या वेळी, आम्ही नेमावर च्या जवळपास असू. मी फोनवर बोलू देखील शकले नाही मात्र बाबा बोलला… मला दवाखान्यात भरती करून घ्यावं लागणार असं बाबा आणि अविनाश दोघांनाही वाटू लागलं असावं.. काय बोलणं झालं ते मला आठवतत नाही मात्र अविनाश चे ४ ते ५ फोन येऊन गेले. मी डोळे बंद करून, बाबाचा हात धरून फक्त पावलं उचलत होते..आता जिथे कुठे व्यवस्था असेल तिथे फक्त जाऊन आडवं व्ह्यायचं इतकच मला माहित होतं.. माझे पाय सुद्धा कसे उचलले जातात आहेत हे देखील माझ्या कल्पने बाहेर होतं…..आम्ही नेमावर ला पोचलो तेव्हा वर्मा जी आमच्यासाठी उभेच होते. त्यांनी आम्हला एका हॉटेल च्या खालच्या रूम मध्ये जागा दिली… कुठे थांबायचं, डॉक्टर कोण, हे सगळे निर्णय अविनाश आणि बाबा यांनी घेतले, त्या वेळी अविनाश, राम बाबू, वर्मा जी या सगळ्यांनी फोनाफोनी करून माझी व्यवस्था केली होती, आणि मी मात्र फक्त आराम करत होते.
मला संध्याकाळी जरा बरं वाटलं आणि तेव्हा सगळं बाबानी सांगितलं, पण बिचारा बाबा पूर्णवेळ हॉटेल च्या रीसेप्शन वर बसून होता. एकतर हॉटेल मध्ये राहणं त्याला पटलेलं नव्हतं, त्यात मी खोलीत आराम करत असल्याने बाबा ला पूर्ण वेळ बाहेर बसावं लागलं होतं…मला ही ते पटलं नाही आणि म्हणून आता थोडं बरं वाटतय तर आश्रमात जाऊ असं ठरवून आम्ही तयारी करायला घेतली. मी झोपून उठलेली पाहून हॉटेल च्या मालकाला हायसं वाटलं. त्याने देखील त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टर ला बोलावलं आणि “ये हमारे घर के ही डॉक्टर है, एक बार दिखा दो” असा आग्रहच केला. सत्तरी पंचहत्तरी चे डॉक्टर शर्मा मला तपासायला आले तेव्हा त्यांनी मला आपल्या दवाखान्यात येण्याचा आग्रह केला, एक इंजक्षन द्यायचं आहे आणि ब्लड टेस्ट करायची आहे असं सांगून बोलावलं. मी पण विचार केला की इतकं कुणी करतय आपल्यासाठी तर दाखवून देऊ एकदा, म्हणून आधी दवाखाना करू आणि मग आश्रमात जाऊ असं ठरवलं, आणि दवाखान्यात गेलो.
तिथे इंजक्षन देऊन, ब्लड टेस्ट साठी ब्लड देऊन झाल्यावर डॉक्टरांनी मला जाउच दिलं नाही “आज आपको यही रहना है माताजी, अंडर ओब्जर्वेशन, कल फिर चले जाना”. तुम्हाला हवं ते सगळं इथेच देतो पण माझ्याकडेच रहा असं म्हणून थांबवूनच घेतलं. आमचं सगळं सामान हॉटेल ला आणि आम्ही दोघं डॉक्टरांच्या घरी. खाली हॉस्पिटल आणि वर घर, सगळी देखरेख.. त्यांच्या घराच्या समोर च्या खोलीत आमची व्यवस्था केली होती आणि दर दोन तासांनी एक नर्स येऊन माझी तब्ब्येत पाहून जात होती. दुस-या दिवशी सकाळी डॉक्टर स्वत: जाऊन आमचं सामान घेऊन आले आणि दुस-याही दिवशी मला जाऊ दिलं नाही. या दोन दिवसांची देखभाल आणि औषधा नंतर मात्र माझी तब्ब्येत सुधारली, आणि मग आम्ही पुढे जायचं ठरवलं..पण नर्मदा जयंती नेमावर ला करायची होती. माझी तब्ब्येत सुधारली तो दिवस नर्मदा जयंतीचा. आजच्या दिवशी परिक्रमावासी ना डॉक्टर आपल्या घरून जाऊ देणार नव्हतेच, म्हणून तो ही दिवस तिहेच थांबलो.. बहुधा याही मागे कारण असावं…
नर्मदा जयंतीचा सोहळा मी नुसता बघावा असं त्या मैयाला मान्य नसावं. त्यात माझा सक्रीय सहभाग असलाच पाहिजे अशी तिची इच्छा असावी आणि म्हणून ती माझ्या मनातही उत्पन्न झाली, आणि तसं तिनी घडवून आणलंही. सायंकाळी नर्मदा जयंती निम्मित्त आयोजित कार्यक्रमात आरतीच्या वेळी परिक्रमावासी च्या हाताने आरती व्हावी असं एका मैयाजीच्या मनात आलं आणि मी तीथे हजर होते म्हणून असेल पण ते भाग्य माझ्या पदरी येऊन पडलं. त्या आरतीच्या तेजाचं वलय पाहून मला दिवा लावण्याची इच्छा झाली आणि चितळे माईंचा ५०१ दिव्यांचा अनुभव आठवला…आणि वाटलं ५०१ नाही पण ५ तरी दिवे लावावे आपण… तिथेच एका दुकानातून मी ५ दिवे घेतले आणि विझणार नाही असं ठिकाण शोधावं म्हणून जरा अंतर लांब गेले, मी माझे दिवे लावून ठेवत होते आणि तिथेच एका पायरीवर एक आजी बसल्या होत्या, त्यांच्या समोर ५-६ ताटात भारपूर दिवे तयार करून ठेवले होते आणि अजून त्या तयार करतच होत्या. त्यांच्या हाताशी त्यांची १५- १६ वर्षांची नात एक एक ताट घेऊन ते दिवे पायरी वर मांडत होती. सगळे दिवे मांडून झाल्यावर ते लावायचे होते… “इतने दिये छोडोगी माताजी” मी विचारलं..”नही बिटिया, सारा किनारा झगमग करे आज तो….मैया मे नही छोडना है.. यही रखना है किनारे पर… मेरी मदत करदे..तू भी आजा मेरे नातीन के साथ.. वो दिये सजा रही है, तू जलाती जा पीछे पीछे”.. मी फक्त ५ दिवे लावायची इच्छा व्यक्त केली होती.. किती तरी दिवे त्यादिवशी मी लावले असतील… पण मैयांनी माझी इच्छाच पूर्ण केली नाही तर मला हवं होतं त्याही पेक्षा जास्त, खूप जास्त दिलं तिनी मला…त्याच दिवशी नाही…नेहमीच…… मैया किनारा त्या दिव्यान्नी उजळून निघाला होता… पायऱ्यावर लांब पर्यंत पसरलेले दिवे, त्यांच्या सात्विक, मंद पण प्रसन्न प्रकाशानी मन, आत्मा आनंदमय झाला होता.. “तमसोमा ज्योतिर्गमय” हा देहाचा मनाचा आणि आत्म्याचा प्रवास इथेच बसून बघत राहावा असच वाटत होतं… दिवे लावून झाल्यावर त्या आजी आपल्या नातीसह परतताना मी पहिल्या होत्या.. एकेक पाउल चालायला त्या आजींना बराच त्रास होत होता, नातीचा हा धरून त्या पाया-या चढत होत्या…इतके कष्ट घेऊन त्या आजी इथे आल्या आणि माझी इच्छा पूर्ण झाली… नेमकी मला चितळे माईची आठवण यावी, नेमका तो दिव्यांचा अनुभव आठवावा, आणि नेमकं याच वेळी ह्या आज्जी मला भेटाव्यात! योगायोग वाटतो का हा?… मला इथून जावसं वाटत नव्हतं पण डॉक्टर साहेब वाट बघत असणार होते, त्यामुळे त्या उज्वल ज्योतिर्मय मैयाचं नववधू सारखं रूप डोळ्यात साठवून आम्ही घरी परतलो.
पुढे छीपानेर ला मुक्काम केला, आणि पुढचा मुक्काम डीमावर ला. डीमावर ला जाताना बरीच वाट शेतातून जायला लागते. इथे एक खूप जागृत मंदिर आहे, तिथे मुक्काम करण्याचं ठरवलं, रस्त्यात भेटलेल्या रामसिंग दुबे जींनी आम्हाला या मंदिराची माहिती दिली. साधारण चार शे वर्ष जुनं हे मंदिर आहे, त्यामुळे इथेच मुक्काम करायचा असं ठरलं. तिथे जाईस्तोवर संध्याकाळ झाली आणि अचानक पावसाला सुरवात झाली. मंदिरात गेलो तर तिथे अजिबात जागा नसल्याचे समजले. बाहेर गावाची ४० ते ५० जणांची एक बस तिथे येऊन उभी होती. भागवत करण्यासाठी त्यांनी हे मंदिर आधीच बुक करून ठेवलं होतं. “प्रसाद के लिये आजाओ आप पर रुकने की व्यवस्था नही है” असं म्हटलं तेव्हा आता पावसात, अंधारात आम्ही जावं कुठे तेच कळेना. हे मंदिर तसं गावापासून थोडं लांब, म्हणजे आता ३ किमी चालून गावात जाण्याशिवाय पर्याय नव्हता, आणि गावातही सोय आहे की नाही याची खात्री नव्हती…. आम्ही निघालो.
मैया प्रत्येक गोष्ट करते त्यामागे कारणं असतात, कुणाचीही भेट ती उगाच घडवत नाही, त्या मागे कारणं असतात आणि असतातच. आम्हाला ज्या रामसिंग दुबे जींनी मंदिराची माहिती दिली होती, वाटेत चहा पाजला होता, तेच रामसिंग आम्हाला पुन्हा रस्त्यात भेटले, आणि “आपको ही लेने आ रहा हू, असं सांगितलं” आम्ही तर त्यांना काहीही सांगितलं नव्हत, किंबहुना त्या भागवत कथे बद्दल ही रामसिंग यांना माहित नसावं कारण तसं असतं तर मंदिरात राहा असा सल्ला त्यांनी दिलाच नसता..मग यांना कसं समजलं आम्ही निवारा शोधतोय ते?… नाही.. त्यांना काहीही समजलं नव्हतं… ही मैयाची कृपा होती. दोन चांगल्या घरचे लोक आणि परिक्रमावासी रस्त्यात भेटल्या चं रामसिंग जी आपल्या बायको जवळ बोलले असता त्या बाई खूप भावूक झाल्या आणि “आज परिक्रमा वासी की सेवा का मन हो रहा है, आप उन्हे घर बुला लाईये, उनके पैर की मिट्टी अपने घर मे आनी चाहिये” असं इतकं कळवळून म्हणाल्या की भर पावसात,अंधारात, छत्री घेऊन हे रामसिंगजी आम्हाला शोधायला मंदिराकडे निघाले… आम्ही निवारा शोधत होतोच, पण सांगा, मी याला योगायोग कसं म्हणावं हे मला समजत नाहीये. नेमकं आम्हाला राम सिंग भेटणे, आम्हाला मंदिरात जागा न मिळणे, दुबे मैया असं कळवळून राम सिंग जी ना आम्हाला घरी आणण्याबाबत विनवणे…नेमकं कसं होतं असं?.. पण असं होतं…पुढे पाथोडा आणि होलीपुरा ला पण अश्याच प्रकारचे अनुभव आले. मात्र बुधनी आणि नांदनेर चा अनुभव अगदी हृद्य आहे…
बुधनी ला आम्ही अज्ञानात सुख कसं असतं ते अनुभवलं तर नांदनेर ला आमची चांगली कान उघडणी केली… नांदनेर ला मैया नी खूप लाड केलेत, आणि अद्भुत कंपनाच्या स्वाधीन केलं आम्हाला, इथल्या मंदिराची विशेषता आहे ती, मात्र ते तसं भाग्य असावं लागतं. माझं भाग्य मात्र जोरावर आहे बरं का… पूर्व जन्मीची पुण्याई , माय बापाची पुण्याई , पण मी भाग्यवान आहे खरी… आणि हे अनुभव त्यामुळेच येतात…कोणते?..सांगते पण पुढच्या भागात..
.. सुरुचि नाईक


Leave a Reply