नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇१९.👇
राजघाट ते भवती या प्रवासात मला खूप कमी बोलावंसं वाटू लागलं. अचानक काय झालं माहित नाही पण बोलूच नये किंवा रीअॅक्ट होऊ नये कशावर, नुसतं आतल्या आत बघत राहावं असं वाटू लागलं.. कदाचित माझ्यातील आवेष, माझ्यातील नकारात्मकता, माझा माझ्यावरच्या ताबा या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पडताळून बघाव्या असं काही मैया मला सुचवत होती का माहित नाही. मीच लिहिलेल्या एका अभंगाच्या ओळी मला राहून राहून आठवू लागल्या.
अरे किती उधळण। किती आतुरले मन
जरा घालावे कुंपण। आतल्या आत॥
आता पुरे वणवण। तृप्ती पाहिलेसे का।
माझे मज समाधाण। आतल्या आत॥
ब-याच चढ उतारांचा हा रस्ता होता. तसं मनाचे ही चढ उतार जाणवत होते पण समजत मात्र नक्की नव्हते. ही उदासीनता नव्हती हे मात्र नक्की. माझं मन उदास नव्हतं पण अंतर्मुख होतं हे निश्चित!एखाद्या वाटेवर अनाहूत पणे पावलं पडत राहतात तसं काहिसं होत होतं. हे वेगळं होतं काहितरी…. जेव्हा आपल्याला काही समजत नाही तेव्हा ते मैयावर सोडून द्यायचं… मी ही तेच केलं..
“खरच अहंकार हा फ़ार इतस्तत: पसरलेला रोग आहे, आणि मी यातून सुटले नाहीये..या रोगाची लागण आपल्याला सातत्याने होत असते आणि जिथे मनाला हा रोग जडला तिथे त्याची अवस्था कमकुवत होत जाते, आणि तोकड्या फ़सव्या अहंकाराच्या आधाराची वाट बघत आणि शोधत आपण कसल्याश्या खोल दलदलीत सापडत जातो” हे असे विचार माझ्या मनात रेंगाळत होते. मला अहंकार होता का? किंवा अजाणतेपणी तो गळून पडत होता का? माहित नाही, पण मैया वर सोपवलं की ती करते काहितरी… दिवसभर हे वेगळं फ़िलींग मनाला चिकटून राहिलं खरं पण मुक्कामाला आल्यावर मात्र हे अनाकलनीय वेगळं वाटण काय आहे याचा अंदाज आला. “शूलपाणी ची झाडी हे मैयाचं हृदय आहे आणि तिच्या हृदयातून जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्या हृदयात हालचाल झाल्याशीवाय राहील का?” असा विचार माझ्या मनात आला आणि अचानक अनाकलनीय अनुभवाचं आकलन झालं. आणि हो, हा विचार मी केलाय असं मला वाटत नव्हतं, म्हणजे कुणीतरी हा विचार माझ्या मनात टाकलेला आहे मला समजत होतं.
भवती ला येण्या आधी आम्ही गणेशपु-राला भोजन प्रसादी घेतली.आधी तिथेच थांबायचा विचार केला होता पण सगळ्यांच्या मातानुसार पुढे आलो. इथे भवती ला एक किराणा दुकान आहे. त्याचा पत्ता आम्हाला कुणीतरी सांगितला. ह्या दुकानदाराचं दुकान आणि घर मोठं होतं. पण त्यानी आम्हाला घरात घेतलं नाही. दुकानासमोरच्या पाय-या आणि ओटा होता तिथे थांबा असं त्यानी सांगीतलं. आश्चर्य वाटलं. इतकं मोठं घर होतं की आम्ही सगळे त्यात सहज मावणार होतो, पण नाही. त्या दिवशी आम्ही पहिल्यांदाच अशाप्रकारे उघड्यावर झोपलो होतो. ही सुरवात होती. पुढे शूलपाणीची झाडी असो की पुढची परिक्रमा, आता असं झोपावं लागू शकतं, ह्याची ही पूर्वतयारी. जेवणाचं ही तसच! तो दुकानदार म्हणाला “भोजन व्यवस्था नही है” आणि आज आम्ही तब्बल २२ किमी चाललो होतो. दुपारी गणेशपु-याला मोनिका आणि तिचे बाबा डबा घेऊन आले होते त्यातलं थोडं अन्न शिल्लक होतं, आणि गम्मत म्हणजे “मैया जी अब मै घर नही लेकर जाउंगा खाना, आप साथ रखो” असा आग्रह आज मोनिका च्या बाबांनी केला होता. गेले तीन दिवस ही दोघं जण आमच्या साठी डब्बा आणत होती (राजघाट ला पण आली होती, मागच्या अनुभवात सांगितलय, आठवतय न?), आज ती दोघेजण ४० किमी गाडी चालवून डब्बा घेऊन आली होती… आता उद्या यायचं नाही हे वचन घेउन त्या दोघांना आम्ही परत पाठवलं होतं. तर त्यानी दिलेलें थोडंसं अन्न म्हणजे काही पोळ्या आणि भाजी आम्ही कागदात गुंडाळून घेतली होती, आमच्या बरोबर एक तावसे दांपत्य पण होतं, त्यांनाही कुणीतरी भाजीपोळी बांधून दिली होती, आणि आम्ही अन्नाची जमवाजमव करतोय हे पाहून त्या दुकानादाराच्या बायकोनी त्यांच्या घरच्या सकाळ्च्या पोळ्या आणि बेसन असं अन्न आम्हाला दिलं. आजची भोजन प्रसादी अशी पार पडली… आणि अशा भोजनप्रसादीची ही पहिलीच वेळ!..आज पहिल्यांदाच आम्ही जवळ अन्न ठेवलं होतं आणि ते ही आग्रहाखातर! आम्हाला आज जेवायला मिळनार नाही हे कदाचित नर्मदा माईला माहित असावं, म्हणून तिने तसा आग्रह करवला त्या मोनिका च्या वडीलांकरवी!
आम्ही उघड्यावर झोपलो पण फ़ारशी थंडी वाजली नाही. शूलपाणी च्या झाडीतला पहिला दिवस पार पडला. खरं तर दिवस येतो आणि आल्यापावली काही अनुभव देऊन निघून जात असतो, त्या दिवसाने दिलेले अनुभव चांगले किंवा वाईटही असू शकतात, आपल्या प्रारब्धाप्रमाणे, आणि प्रारब्ध आधीच लिहिल्या गेलेलं असतं. त्यामुळे जे समोर येइल स्वीकारणे हाच एक मार्ग असतो. मग ते आनंदानी करा का दु:खाने, स्वीकार करावच लागणार!..असो
आता पुढचा टप्पा म्हणजे बोरखेडी. हीरालाल रावत चं घर. हा आणि इथून पुढचा भाग हा आदिवासी लोकांचा. पण अनुभव सांगण्या आधी त्या आदिवासींबद्दल लोक जे ऐकून आहेत ते सांगते, आता झालेला बदल सांगते आणि आधीच्या घटनांचं कारण ही सांगते. तर हे इथेले आदिवासी म्हणजे “मामा” परिक्रमा वासींना लुटून नेतात हे आम्ही ऐकून होतो. अर्थात आधी तसं व्हायचं देखिल! अगदी अंगावरच्या कपड्यासह लोकांना लुटून नेण्याचे अनुभव ऐकलेले आहेत. मात्र पुढे या लोकांना मदतही मिळत असे. असं का व्हायचं तर हा अतिशय गरीब आणि दुर्गम भाग. इथे सगळीच कमतरता, तेव्हा येणा-या जाणा-याला लुटून पैसा मिळतो हे एक कारण आहेच! पण यामागचं आध्यात्मिक कारण वेगळं आहे असं सांगितल्या जातं.
ह्या आदिवासिंना “मामा” असं म्हणतात. मामा म्हणजे आईचा भाऊ. हे मैयाचे भाऊ, पण मग हे लूटतात कशासाठी? तर तुम्ही परिक्रमा करता म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडे आलेले असता. लहान मूल आईकडे येतं तेव्हा ते आपला लवाजमा घेऊन येत नाही कारण आपल्या सर्व गरजा आई पूर्ण करणार आहे याची त्याला खात्री असते. किंबहूना आपल्या गरजा काय आहेत हे आपल्यापेक्षा आईलाच माहित आहे हे ही त्या बाळाला महित असतं. मग तुम्ही आईकडे आला आहात, तर तिच्यावर विश्वास ठेवा, असं म्हणून हे मामा लोक तुम्हाला लुटून घेतात आणि त्यानंतर तुम्हाला जी मदत मिळते त्यामुळे तुमचा तुमच्या आईवरचा विश्वास वाढतो.. तर असं हे कारण!
तर जेव्हा आम्ही हीरालाल कडे आलो तेव्हा तिथे आधी ही बरेच परिक्रमावासी होते. म्हणजे एकूण ३० तरी लोक असतील. तसा हा हीरालाल म्हणजे मामांपैकीच एक असंही समजलं पण त्याच्याकडे पाहून असं अजिबात वाटलं नाही. त्याच्या अंगणात त्यानी मांडव घातला होता आणी सगळ्या परिक्रमा वासियांची आसन लावण्याची व्यवस्था तिथे केली होती. हिरालाल चं एक दुकानही होतं, तिथे छोट्या मोठ्या वस्तू मिळतात. ३० एक परिक्रमावासी एकत्र आल्यानंतर भजन, भक्तिगीतं , हरीपाठ असं म्हणत म्हणत भोजन प्रसादीची वेळ आली. आज भोजन प्रसादी ला चक्क दाल बाटी आणि हलवा होता! शूलपाणीच्या झाडीत, जिथे मामा लोक लुटून घेतात वगैरे कथा ऐकल्या होत्या तिथे आम्हाला पंचपक्वान्नांचं जेवण मिळत होतं. आमचे मोबाईल चार्ज करायाला भरपूर जागा होती, शिवाय कुणाला काही हवं आहे याची चौकशी पण हीरालाल भाई अगत्याने करत होते! शूलपाणीतही असा अनुभव येईल असं अजिबात वाटलं नव्हतं, विशेषत: कालच्या भवती च्या अनुभवानंतर तरी!.. पण असं होत नसतं… आपण जे ठरवू, किंवा जसा विचार करू त्यापेक्षा नक्कीच वेगळंच असं आपल्या समोर येतं… या झाडीमधे आलेले अनुभव आश्चर्य चकित करणारे होते. असं म्हणतात की इथे नर्मदा मैया दर्शन देते. असं म्हणतात की इथे सप्त चिरंजीव दर्शन देतात…. खरच असं होतं का…आठ दिवस हा झाडीचा प्रवास होता.. किती आणि कसे अनुभव आले यात?… एकदा तर एक अतिशय दैवी अनुभव आला, आणि चमत्कार च झाला… माझ्या सोबतच्या शक्तींच सोबत असणं हे मलाच नाही तर माझ्या सोबत असलेल्या स्मीता ला पण जाणवलं… त्या शक्ती नसत्या तर हे अनुभव सांगायला मी आज कदाचित शिल्लक राहिले नसते….कशीकाय? सांगते पुढच्या भागात.
©सुरूची नाईक-विदर्भ गट:देवा तुझा मी सोनार/9309926559
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Leave a Reply