नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती👇भाग-७👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती👇भाग-७👇

संत सियाराम बाबांची भेट होणे हे सौभाग्य!

   *🚩नर्मदे हर🚩*

आजच्या सातव्या भागात आपण एका महान संत पुरुषा बद्दल ऐकणार आहोत. तेली भट्ट्य़ान गावी मैया किनारी या बाबांचा आश्रम आहे. या बाबांच दर्शन होणं हेच खूप भाग्याचं म्हणावं लागेल. या बाबांकडे केवळ बघूनच शांत आणि समाधानाची अनुभूती येते. यांच स्मितहास्य बघितलं की आतून इतकं शांत वाटतं नं की त्याचं वर्णन करता येणं अशक्य आहे. बाबांकडे पाहिलं की असं वाटतं आपले सगळे कष्ट संपून एखाद्या मोठ्या कल्पवृक्षाखाली आपण बसलेलो आहे आणि मनात मात्र कुठलीही इच्छा शिल्लक रहिली नाही. विचार करा ना, ज्या कल्पवृक्षाची कामना आपण आपल्या कल्पितांच्या पूर्ती साठी करत असतो तो कल्पवृक्ष मिळतो पण कल्पित कामनाच उरत नाही…किती आनंद निनादत असेल त्या ठिकाणी? तसं काहीसं या बाबांच्या दर्शनाने मला झालं…. काही काही मागायची इच्छाच झाली नाही!

हे बाबा फ़क्त एका लंगोटीवर असतात. यांना सियाराम बाबा असं म्हणतात. सियाराम बाबांचं वय काय यावर सूद्धा जरा दोन वेगळी मतं आहेत. आश्रमातील लोक बाबांच वय ९५ सांगतात तर गावातली लोक १३५ च्या जवळपास असेल असं सांगतात. बाबांना नजर लागू नये म्हणून त्यांच वय कमी सांगण्यात असं गावकरी म्हणतात. गावातल्या ७० वर्षाच्या आजोबां म्हणतात “या बाबांना मी माझ्या लहानपणापासून असच बघतो आहे”.

सियाराम बाबांच वय कितीही असू देत. त्यांची साधना त्यांच्या चेह-यावर दिसून येते. प्रशांत करुणेचा सागर असलेले त्यांचे डोळे बघितले की मनाला इतक शांत आणि प्रसन्न वाटतं कि माणूस तिथून उठून जाउच शकत नाही. सियाराम बाबा सकाळी लवकर उठून मैया स्नान करतात. उन पाउस थंडी काहीही असो गेली कित्येक तपं त्यांच्या या दिनचर्येत कधीही फरक पडला नाही. बाबा बाहेर पडले की भक्तांची गर्दी जमा होते. बाबा कायम एका लंगोटीवर असतात. सुर्यानमस्कार घालून ते स्नानाला जातात. स्नान झालं की मैया पूजन आणि रोज स्वत:च्या हातांनी नारळ फोडतात. एका आपटण्यात नारळ फुट्लाच पाहिजे.

सियाराम बाबांच्या बाबतीत एक अजून गोष्ट सांगण्यासारखी आहे. ती म्हणजे बाबांच्या हातचा चहा. सियाराम बाबा सर्व भाविकांसाठी स्वत: चहा तयार करतात. पण ह्या चहाची गम्मत अशी आहे की हा चहा दिवसातून एकदाच तयार होतो आणि कितीही लोक येऊ देत, हा चहा संपतच नाही. एकदा सकाळी ज्यावेळी बाबा चहाच्या भांड्यात चहा साखर आणि दुध घालतात त्यानंतर तो चहा पुन्हा वाढवल्या जात नाही. तो आपोआप वाढत असावा कारण साधारण १०-२० लिटरच्या भांड्यातून ५०० भाविक आणि गावकरी, आश्रमातील मंडळी मनसोक्त चहा घेतात तरीही ते भांड कायम भरलेलं असतं. ही अतिशोयोक्ती नाही. हा ऐकीव प्रसंग नाही तर माझ्या डोळ्यादेखत मी हे पाहिलेलं आहे.

अजून एक गोष्ट सांगते. मागे जेव्हा मैयाला पूर आला होता तेव्हा सगळं भट्ट्यान गाव रिकाम करण्यात आलं. लोकांनी बाबानाही आश्रम सोडण्याची विनंती केली. बाबा मात्र तयार झाले नाही. “मैया को छोडके मै नाही जाउंगा” असं म्हणाले. मैया किनारी असलेल्या कडप्प्यावर ते बसून राहिले. मैया ला पूर आला, बाबांचे चरण बुडतील इतकंच पाणी आश्रमात आलं आणि आश्रमाला वळसा घालून गावाकडे निघून गेलं.. आता हे मी पाहिलं असं मी का म्हणते? तर गावातल्या घरावर चे पाण्याचे डाग मी पाहिलेत, छपरा पर्यंत भिंती पाण्यात बुडाल्याचे डाग होते आणि आश्रमाच्या भिंतीवरचे डागही मी पाहिलेत…ते जेमतेम पावलं बुडतील, किंवा काही ठिकाणी जास्तीत जास्त गुडघे भिजतील एवढेच होते. लोक सांगतात, मैया नी पुराबद्दल बाबांना चरणस्पर्श करून माफी मागितली आणि तिच्या मार्गाने आणि विधिलिखिताप्रमाणे ती पुढे निघून गेली. तर असं आहे सियाराम बाबांचं व्यक्तिमत्व..त्यांची साधना अशी की साक्षात नर्मदा माई त्यांना प्रणाम करून जाते. माई चं आणि या सियाराम बाबांचं नातं वेगळंच आहे.

एक अजून आख्यायिका यांच्या बद्दल ऐकायला मिळते ती अशी- एकदा काही परिक्रमावासी बाबांच्या आश्रमात आले असता आश्रमातलं तूप संपलं होतं. परिक्रमावासीन्ना उपाशी ठेवणं हे सियाराम बाबांच्या नियमाविरुद्ध होतं. तूप यायला अजून दोन तास तरी लागणार होते. “वो कुछ नही, मैया जिसे घी उधार लेकर आओ और खाना पकाओ” बाबांच्या सेवकांना काही समजलं नाही. ते मैया मधून दोन डब्बे भरून पाणी घेऊन आणले आणि याच पाण्यात पु-या तळून घेतल्या. अशी आहे बाबांची साधना, श्रद्धा आणि मैयाची त्यांच्यावरची कृपा. मी भाग्यवान म्हणून याची देही याची डोळा बाबांचं दर्शन झालं.

बाबांच्या आश्रमाची अजून एक कमाल सांगते. इथे येणा-या प्रत्येक परिक्रमावासी ला सुकी भेळ साधारण ३ वाट्या, ३ वाट्या डाळ आणि तांदूळ, खिचडी ला लागाणारे सर्व मसाले व तेल, केळी, उदबत्ती चा पुडा, गाईच्या तुपाची बाटली आणि भिजवलेल्या फुलवाती, आगपेटी, कापूर असं सर्व सामान देतात. तुम्ही कितीही मोठी रक्कम दान कराण्यासाठी द्या, त्यातील फक्त १० रुपये च घेऊन बाकी रक्कम तुम्हाला परत केली जाते. या सर्व सामाना सोबत पुरी भाजी ताक किंवा कढी, मसाले भात आणि पापड असे जेवण व हवा तितका चहा हे ही असतेच. आता सांगा, फक्त १० रुपयात हे सगळं कसं जमत असेल? पण जमतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे असच सुरु आहे. न कुठे वाच्यता न पोस्टर, न डोनेशन..काहीच नाही..आहे नं कमाल?..असे साधू संत भेटणं आणि त्यांचे आशीर्वाद मिळणं हा कितीतरी मोठा अनुभव आहे! आयुष्यात समाधान म्हणजे काय हे बघायचे असेल तर एकदा तरी या आश्रमाला भेट द्या. इंदोर पासून फक्त २.५ तासाच्या अंतरावर हे गाव आहे. इथे आम्ही एक रात्र होतो, सकाळी मैया स्नान करून निघायचं तर पसारकर काकांचे जोडे बदलले गेले होते. जे तिथे होते ते त्यांना अजिबात कम्फर्टेबल नव्हते. पण तो प्रश्न अगदीच लवकर सुटला …जोडे परत मिळाले नाहीत, पण अनुभव मिळाला.. कोणता ते पुढच्या भागात सांगते.
©सुरुची नाईक
9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*