युवावर्गाला आपण स्वतः कंपन्यांचे, राजकीय पक्षांचे निव्वळ ‘कस्टमर’ होत आहोत आणि डिजिटल बाजारपेठेतला एक ‘डाटा पॉइंट’ होत आहोत, याचं राजकीय भान आजघडीला तरी आलेलं दिसत नाही… आंतरराष्ट्रीय युवादिनाच्या निमित्ताने तरुणाईसमोरच्या समस्या…
चला सकाळ झाली. व्हाट्सएप, इन्स्टा, ट्विटर, टेलेग्राम, फेसबुक इ. सोशल मीडिया अकाउंट वर भरपूर मेसेजेस आलेत.
‘जियोच्या नवीन प्लाननुसार दिवसाला १.५ जीबी मिळणार यार’ तो संपविण्यासाठी जागा झालेला आजचा युवावर्ग.
मोबाइलवरचा मेसेज पाहून एक मित्र आनंदविभोर होऊन बोलला.
‘चल, PUBG खेळू या’ दुसरा बोलला.
वर्ल्ड बँकेच्या एका अहवालानुसार भारतातील दहापैकी आठ युवा बेरोजगार असल्याची बातमी मला आठवली!
या तीनही वाक्यांचा परस्परांशी काय संबंध आहे, असं पहिल्या क्षणाला वाटू शकेल; मात्र थोडा विचार करताच या सगळ्याचा एकमेकाशी अगदी जवळचा संबंध आहे, हे आपल्या लक्षात येईल. बेरोजगारीमुळे
युवावर्गाची ऊर्जा दाही दिशा मुक्तपणे उधळली गेली आहे आणि 4-जीच्या वेगवान स्पीडसह उभ्या राहणाऱ्या मायाजालात आपण बेरोजगार आहोत, याचाच जणू विसर पडलाय. PUBG या गेमचं पूर्ण नाव किती इंटरेस्टिंग आहे पाहा- प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड! आजच्या युवावर्गाचं रणांगण सुस्पष्ट करणारा असा हा गेम आहे. आपल्या जगण्याचाच ‘गेम’ झालाय की काय, असं वाटावं अशी अवस्था असताना एका आभासी जगात गुंग असलेला युवावर्ग एका अराजकाच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे.
म्हणूनच अलीकडच्या काळात जगभरात युवा वर्गाविषयी एक स्वतंत्र विचारमंथन होतं असल्याचं दिसतं आहे. गेल्या वीस वर्षांपासून संयुक्त राष्ट्र संघ आंतरराष्ट्रीय युवा दिवस १२ ऑगस्ट रोजी साजरा करतं आहे. यानिमित्ताने युवावर्गाकडे विशेष संवर्ग म्हणून स्वतंत्रपणे पाहून त्यांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा उद्देश आहे.
शिक्षणाचं झपाट्यानं होणारं खाजगीकरण लक्षात घेता रास्त दरामध्ये दर्जेदार शिक्षण घेण्याच्या संधी कमी होत आहेत. भारतातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अवस्थाही दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. व्यावसायिक कोर्सेसकरता असणारी फी अमाप वाढते आहे आणि शिक्षण असो की इतर सार्वजनिक क्षेत्र, सरकार आपली कल्याणकारी राज्यसंस्थेची जबाबदारी झटकून देते आहे. तुम्हाला नोकरी नाही याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात, असा समज निर्माण केला जातो आहे. कोणत्याही उत्तरदायित्वाशिवाय निव्वळ नफा लाटणारी कंपनी असं आजच्या राज्यसंस्थेचं स्वरुप दिसतं आहे. त्यामुळे पात्रतेनुसार रोजगार प्राप्त होत नसलेल्या युवावर्गाची संख्या लक्षणीय आहे. स्वाभाविकच यातून वैफल्यग्रस्तता वाढते आहे. ऐन उमेदीच्या वर्षात टोकाचं सिनिक
किंवा अति-महत्त्वाकांक्षी होणं अशा प्रवृत्ती दिसून येत आहेत. युवावर्गाच्या मानसिक आरोग्याविषयी चिंता व्यक्त करणारी मांडणी सातत्याने होते आहे. युवावर्गाच्या डिप्रेशनला प्राधान्याने संबोधित करावं लागेल, असं काही मानसशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. संधींचा प्रचंड मोठा बुडबुडा, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागत नाही; अशी अवस्था झाल्याने आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला आहे. समाज-राजकीय चौकटीत आपले स्वतःचे असे स्थान प्राप्त करता येत नाही, हा देखील मोठा पेच आहे. ज्याला precariat असं इंग्रजीत म्हटलं जातं, तसा अस्थिर युवावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही अस्थिरता केवळ आर्थिक परिस्थिती बाबत नाही. किंबहुना आर्थिक घटकाबाबत अस्थिरता असल्याने इतर सामाजिक-राजकीय प्रतिष्ठा, ओळख याबाबतही अनिश्चितता आहे. या क्रायसिसमुळे प्रस्थापित राजकीय प्रवाह ज्या दिशेला युवा वर्गाला खेचू इच्छितो तिकडे तो सहज जाऊ शकतो. धार्मिक उन्माद असो की राष्ट्रप्रेमाचे उमाळे, युवावर्ग सहज लोंढ्यासोबत वाहत जाऊ शकतो; एवढेच नव्हे तर तो उत्साहाने या प्रवासाचे सारथ्य करायला उत्सुक असतो. त्यामुळे स्वतःचा असा
विचार विकसित होण्याऐवजी वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याकडे अधिक कल दिसतो. आत्यंतिक व्यावहारिक होत जाणं हा या सर्वाचा परिपाक आहे. अनिश्चितता, असुरक्षितता यांनी चोहो बाजूंनी घेरल्यानं एखाद्या बेटावर असल्यासारखा युवा वर्ग असह्य तडफड करतो आहे. त्यातून वैफल्याचे विविध आविष्कार दिसून येतात.
या वैफल्यातून हिंसेचे समर्थनही वाढते. भवताली घडणाऱ्या हिंसक घटनांना मूक समर्थन असो की आत्मघातकी पाऊल उचलण्याचे प्रमाण, युवावर्ग हिंसेला पूरक अशा बाबींमध्ये सहज सामील होतो आहे. त्याच प्रकारची कला-अभिव्यक्तीही होताना दिसते. मुख्य प्रवाही सिनेमामध्ये हिंसेचं प्रमाण इतकं आहे की हिंसेनं युवावर्ग पछाडला आहे, हे विधान अतिशयोक्त वाटू नये. अर्थात या सगळ्याला वैचारिक घडणही कारणीभूत आहे. कर्मठ, पुराणमतवादी विचारांना युवावर्ग बळी पडतो आहे.
युवावर्गाला आपण स्वतः कंपन्यांचे, राजकीय पक्षांचे निव्वळ ‘कस्टमर’ होत आहोत आणि डिजिटल बाजारपेठेतला एक ‘डाटा पॉइंट’ होत आहोत, याचं राजकीय भान आजघडीला तरी आलेलं दिसत नाही. प्रश्नाच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय आणि स्वतःला एका व्यापक पटलावरुन पाहिल्याशिवाय हा पॅनोरमा आकळणार नाही. आज ना उद्या या अवस्थेला भिडावं लागणार आहे.
प्रत्येक काळाचे काही पेच असतात. आजचा पेच अधिक गुंतागुंतीचा आहे. इथे दृश्य-आव्हान नाही. ‘फाइटक्लब’ या सिनेमातला एक संवाद या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. त्या संवादाचा आशय साधारण असा-
‘आपण इतिहासाची ‘मधली मुलं’ आहोत. आपल्या आयुष्याला हेतुही नाही किंवा विसावता येईल येईल असं कोणतं ठिकणही नाही. आपल्या काळात कोणतं महायुद्ध नाही किंवा कोणती महामंदीही नाही. आपलं युद्ध हे आध्यात्मिक युद्ध आहे. आपलं सर्वात मोठं युद्ध आहे ते स्वतःशी. आपुलाचि वाद आपणासी!’
युवा असण्याचा खरा अर्थ हा प्राप्त परिस्थितीला नव्या, सर्जक पद्धतीने भिडण्याचा आहे. हेच तर ‘अत्त दीप भव’ म्हणणाऱ्या बुद्धापासून ते ‘मनासि संवाद’ करायला सांगणाऱ्या तुकोबांपर्यंत सारेजण सांगताहेत. आपण आपला आतला आवाज ऐकणार का, हा खरा प्रश्न आहे!


Nice and eye opening write up
जबरदस्त आणि वस्तुस्थितीनुरूप सत्य व परखड विचार!
लोकेश कोतवाल यांचे कौतुक-अभिनंदन-शुभेच्छा!!
वस्तुस्थितीला अनुसरण असा लोकेश कोतवाल यांनी आपल्या लेखातून युवा तरुण वर्गातील समस्यांचे उदाहरण समोर मांडले आहेत तरी युवा तरुण वर्गानी खरोखर या लेखातून बोध घेऊन आपल्या समस्या सोडवल्या तर नक्कीच फायदा होईल यात शंका नाही
धन्यवाद!