रेशीम शेती हा शेतीस पूरक व्यवसाय असून तो अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. अशा या उपयुक्त तुतीची लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते.
एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर ते झाड साधारणतः 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो.
तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते.
रेशीम उद्योग-कापड निर्मिती
हातमागाने कापडनिर्मिती अधिक सोयीची:
एक विणकर एका हातमागावर साधारणतः ३-४ मीटरपर्यंत रेशीम कापड विणतो. रेशीम कापडावर डिझाईन हे धोटा, डॉबी, जेकॉर्डच्या सहाय्याने रंगीत धागे वापरुन काढता येते. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई करता येते. तसेच भरतकाम व डिझाईनस् काढता येते. भांडवली गुंतवणूक लक्षांत घेता यंत्रमागापेक्षा हातमाग आर्थिकदश्ष्टया व रेशीम कापडाचे वेगळेवेगळे नमुने काढण्यास उपयुक्त ठरतो. हातमागाची पीटलूम, पॅडल हातमाग व अर्धस्वयंचलित हातमाग हे तीन प्रकार आहेत. अशा रितीने तयार केलेले रेशीम कापड आकर्षक पॅकिंग करुन विक्रीसाठी पाठविले जाते. ज्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे.
कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा शेणोली गांवातील तेरा सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन कामधेनु प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. नंतर त्यांनी प्रत्येकी एक एकर मध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला. यात त्यांना बँकेकडून आर्थिक साहाय्य मिळाले होते. त्यांना रेशीम उद्योगापासुन भरपूर अर्थिक लाभ झाला. सदर संस्थेचे यश पाहुन गावांमध्ये जवळपास ५० एकरवर तुतीची लागवड झाली. संस्थेने यापुढे जाऊन सुत निर्मिती प्रकल्पाकरीता एम आय डी सी कराड येथे जागा घेतलेली आहे.
रेशीम कीटकांचे पालन
रेशीम शेतीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे रेशीम कीटक. यांचे पालन व्यवस्थित करणे फार महत्वाचे असते. रेशीम कीटकांच्या पालन तंत्रज्ञानात हवामानानुसार आवश्यक बदल घडून आणल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यास वर्षभर रेशीम कीटकांचे पालन करणे सोईचे होतेच याशिवाय ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरते. परंतु हवामानानुसार तापमान, आद्रता व वातावरणातील योग्य ती खबरदारी न घेतल्यास त्याचा रेशीम कीटक पालनावर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होते, रोगांचा पादुर्भाव होतो, तसेच रेशीम कोशाचा दर्जा सुद्धा खालावतो. अशामुळे भाव कमी होतो व तोटा सहन करावा लागतो.
रेशीम कीटकांच्या वाढीसाठी व योग्य शारीरिक क्रियांसाठी तापमान व आद्रतेचे महत्व असते. रेशीम कीटक हा थंड रक्ताचा प्राणी असून शरीराचे तापमान वातावरणातील तापमानानुसार बदलत असते. रेशीम कीटकांचे पालन १५ ते ४० अंश सेल्सियस तापमानात करता येत असले तरी योग्य वाढ व शरीरक्रियासाठी २२ ते २४ अंश सेल्सियस तापमान रेशीम कीटकांना पोषक असते. त्याचप्रमाणे आद्रतेचा देखील रेशीम कीटक पालनावर परिणाम दिसून येतो. आद्रता कमी झाल्यास रेशीम किटकाच्या अन्नग्रहण, पचन, रक्तातील आम्ल- विम्ल निर्देशांक, शरीरातील टाकाऊ वायू बाहेर येण्यास व्यत्यय येतो. तसेच उन्हाळ्यात देखील आद्रता कमी असल्यामुळे पाने सुकतात त्यामुळे कीटक कमी पाला खातात. त्याचबरोबर पानाचाही दर्जा कमी होतो.
कीटक संगोपन गृह-
कीटक संगोपन गृह थंड जागेत असावे किंवा सावली असेल त्या ठिकाणी दक्षिण- उत्तर दिशेने बांधावे. मातीच्या जाड भिंती, पालापाचोळा, कौलारू किंवा ऍसबेसटॉप पत्रे वापरून कीटक संगोपन गृह बांधावे. कीटक संगोपनाच्या छतावर नारळ, भात, गवत इत्यादीचा वापर केल्यास तापमान नियंत्रणास मदत होते. तसेच छतावर मारण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचे पेंट बाजारात मिळतात, त्यांचा वापर केल्यास ५ ते ६ अंश सेल्सियस कमी होते. कीटक संगोपन गृहाच्या पश्चिम बाजूस विविध झाडे वाढवावीत. प्रामुख्याने तुतीचे झाडे लावल्यास दुहेरी फायदा होतो. पश्चिमेकडील सूर्यकिरणे थोपवून जातात, शिवाय तुतीझाडाचा पालाही कोशनिर्मितीसाठी उपलब्ध होतो.
रेशीम शेती उद्योग
देशात रेशीम उद्योग आणि तुती लागवड क्षेत्र वाढत आहे. साठ हजाराहून अधिक खेड्यात हा उद्योग राबविला जातो. विदभार्तही मोठ्या प्रमाणात तुती लागवड क्षेत्र वाढले आहे. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱया या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची शास्त्रीय दृष्टीकोनातून लागवड होणे गरजेचे आहे.
रेशीम उद्योग शेतीवर आधारित असा कुटीरोद्योग आहे या उद्योगातून ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटकसंगोपन व धागानिमिर्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो तर अनेक नगदी पिकांच्या तुलनेत हा उद्योग फायदेशीर आहे. या उद्योगामुळे शहरी संपत्ती सहजपणे ग्रामीण नागरिकांकडे वळली जाते. रेशीम उद्योगातून दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. उच्च प्रतिच्या रेशीम धाग्यास जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे मागणी लक्षात घेता दुबार (बायव्होल्टाईन जातीच्या कोषउत्पादनाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या तंत्राचा वापर करून तुतीची लागवड करणे फायदेशीर ठरेल.
तुती व रेशीम उद्योगाचे यश हे तुतीच्या एकरी उत्पादित होणाऱ्या पानांवर अवलंबून असते. राज्याचे कृषी विषयक हवामान अवलंबून असते आपल्या राज्याचे हवामान. तुतीच्या व वषर्भर पानांच्या निमिर्तीसाठी पोषक आहे .त्यामुळे तुती वाढीसाठी चांगले वातावरण मिळते
तुती लागवडीबाबत घ्यावयाची काळजी :
तुती लागव़ड वाहनांची वाहतूक जेथे जास्त आहे, अशा रस्त्याच्या कडेने करू नये. कारण पानांवर धूळ मोठ्या प्रमाणात बसल्यास अशी पाने रेशीमकीटकसंगोपनासाठी योग्य ठरत नाही कीटकनाशकांचा वापर ज्या पिकांवर वारंवार करावा लागणार आहे,त्या पिकांच्या जवळ तुती लागवड करू नये, त्यात किमान शंभर मीटर अंतर ठेवावे.
रेशीम शेती-उद्योगातून होणारे फायदे
रेशमाच्या अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.
तुतीचा वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
तुतीच्या पानांमध्ये जीवनसत्वांचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.
विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

Leave a Reply