नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ७४👇- बडगुजर. इन

नर्मदे हर

मागच्या भागात मी तुम्हाला आमचा दमगड पर्यंतचा प्रवास सांगितला. जलाल शेखने आमची मदत कशी केली तेही सांगितलं आणि वाटेत भेटलेले तिघं मुसलमान तरुण आमच्या सोबत राम कुटिर पर्यंत कुठल्या भावनेने आले होते आणि आम्ही मात्र कुठला वेगळाच विचार करत होतो तेही मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं. आम्ही राम कुटिर पर्यंत पोहोचलो आणि तिथून मागे फिरलीत.

आता आम्ही नर्मदे हर, नर्मदे हर म्हणून आतून कुणीतरी येण्याची वाट बघत होतो. या भागात लाईट नाहीत. हा आश्रम गावापासून थोडा दूरच आणि अक्षरशः जंगलात. आम्हाला फाटक उघडता येईना, आतून कोणी बाहेर येण्याचं नाव घेईना. परत गावाकडे फिरणं केवळ अशक्य, आधीच अंधार पडून गेला होता. आश्रमाबाहेर राहणं देखील अशक्य होतं. कडाक्याची थंडी आणि शिवाय जंगल असल्याने निदान आश्रमाच्या आत तरी जाता यावं असं राहून राहून वाटत होतं. शेवटी बाबा म्हणाला, “आता जर कोणी बाहेर आलं नाही तर मला फाटकावरून आत जावं लागेल आणि मग फाटक उघडतो,मग तू आता ये”.. बाबा जसा वर चढू लागला तोच आतून नर्मदे हर असा आवाज आला. साधारण अर्धा पाऊण तास वाट पाहिल्यानंतर आम्ही आश्रमाच्या आत दाखल झालो. आता आसन लावायचं, पूजा पाठ करायचा आणि भोजन प्रसादीचं काय ते बघायचं.

“आसन कहा लगाये बाबा”, बाबानी विचारलं.”यही लगा दो”असं म्हणत त्या साधू महाराजांनी एक गवताच्या पेंढ्या खाली असलेल्या शेडमध्ये आसन लावायला सांगितलं. इतक्या थंडीत जंगलात असं बाहेर झोपायचं म्हंटल्यावर बंद आसरा नाही का असं विचारलं…. “नाही”, अगदी एका शब्दात आणि पक्क्या आवाजात साधू महाराजांनी उत्तर दिलं. रात्र थंडी मय जाणार… जशी मैया ची ईच्छा…

“आप के भोजन का क्या?” साधू महाराजांनी विचारलं. आम्हाला काहीही चालेल असं आम्ही उत्तरलो. त्यावर मात्र साधुमहाराज आणि आमचा जो संवाद झाला तो जसाच्या तसा लिहिते आहे.

साधु महाराज- नही मैने शाम को छे बजे सारा खाना कुत्तो को खिला दिया है.. अब तुम क्या करोगे… आम्हाला भूक तर लागली होती, म्हणजे आता इतकं थकल्यावर स्वतः स्वयंपाक करावा लागेल तर… करूयात काय करणार… मी म्हणाले “अगर साधन मिल गया तो हम भोजन बना लेंगे”… साधु महाराज म्हणतात, “साधन तो सब है मैया, बर्तन धोने पडेंगे” आता इतक्या थंडीचं आधी भांडी घासायची आणि मग स्वयंपाक करायचा नंतर पुन्हा भांडी घासून ठेवायची… हे अति होणार होतं थकल्याभागल्या जीवांसाठी…., आज चहाच पिऊन झोपावं. आम्ही ठरवलं. “बाबाजी हम चाय पी के सो जायेंगे”. साधु महाराज अतिशय शांतपणे म्हणाले,”आपकी कल्पना तो अच्छी है लेकिन शक्कर खतम हो गई है”, अरे देवा!! जाऊदे!! बिना साखरेचा प्यावा आता चहा, ईलाजच नाही काही! आम्ही बिना साखरेचा चहा पिऊ असं सांगितल्यावर साधु महाराज म्हणतात, “हा वो भी सही है, बिना शक्कर की चाय अच्छी लगती है, लेकिन माताजी इतनी रात को चूल्हा जलाने के लिए सुखी लकडी कहासे लाओगे?…. भगवंता!!! म्हणजे आता चहाचं पाणी पिण्यासाठी देखील आधी लाकडं जमवावी लागतील का? मैया उपाशी ठेवत नाही असं ऐकलं होतं खरं, पण आज कदाचित आम्हाला उपाशीच झोपावं लागणार होतं. बाबाची आता खरंच चिडचिड होत होती. बाबांनी रागातच आपलं अंथरून पसरलं आणि आडवा झाला. साधु महाराज मात्र माझ्याशी सत्संग करत होते. म्हणाले, “अगर थंडी लगे तो बोल देना ब्लॅकेट ला दुंगा…” दूंगा काय द्याच बाबा वाजणारच आहे…. ब्लॅंकेट देऊन जरावेळ गप्पा करून बाबा झोपी गेले. म्हणाले सकाळी नऊ पर्यंत मी खोलीच्या बाहेर येत नाही स्वयंपाकाचं दारा बाहेर काढून ठेवतो उद्या लाकडं जमा करा भांडी घासा आणि स्वयंपाक करा. हे होईस्तोवर मी बाहेर येईलच….

राहून राहून मला एकच वाटत होतं, मैया उपाशी झोपू देत नाही म्हणतात मग असं कसं शक्य आहे? मला उपाशी झोपावं लागतं आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता आणि कुणीतरी येईल आणि काहीतरी देऊन जाईल असं सारखं वाटत होतं. आता तर नऊ साडे नऊ होऊन गेले होते… कोणी येण्याची फारशी शक्यता नव्हती. मी देखील माझं अंथरूण-पांघरूण बाहेर काढलं. त्या छोट्याशा शेडमध्ये एक मेणबत्ती तेवढी लागलेली होती. बाकी इथे काहीही नाही. साधू महाराज म्हणाले होते “यहा सिर्फ एक नेटवर्क है फास्टेस्ट वाला, डायरेक्ट कनेकशन होता है कोई डिस्टर्बन्स नही, आपकी आवाज बराबर पोहोचती है, बस आपकी प्रार्थना में सच्चाई होनी चाहिये… डायरेक्ट कनेक्शन विथ गॉड..”विचार करता करता मी माझं ब्लॅंकेट बाहेर काढलं आणि आनंदाने ओरडले च. माझा विश्वास जिंकला होता. तीन-चार दिवसांपूर्वी कुणीतरी आम्हाला दिलेले मूग डाळीचे हल्दीराम चे पाकीट हरवलेत किंवा आम्ही कुणाला तरी दिलेत असं आम्हाला वाटत होतं. ती दोन्ही पाकीटं माझ्या ब्लॅंकेट मधून बाहेर आलीत. ती ब्लॅंकेट च्या घडीच्या आत कशी काय गेली देव जाणे. हो एक मात्र खरं माझ्याकडे दोन ब्लॅंकेट होते त्यातलं हे एक मी पाच-सहा दिवसांपासून काढलं नव्हतं, ते बॅगच्या सगळ्यात खाली ठेवलेलं होतं… कदाचित ही वेळ येणार आहे हे लक्षात ठेवून ती पाकीटं वापरल्या न जाणाऱ्या ब्लॅंकेट खाली दडवून ठेवली होती मैयाने…. ती उपाशी झोपू देत नाहीच… ती आई असते.

आम्ही खाऊन पाणी पिऊन झोपलो. अगदी थोडीही थंडी वाजली नाही. थकलो होतो त्यामुळे झोपही गाढ लागली, आणि जागही उशिराच आली. उठलो तेव्हा साडेसात वाजले होते. उठून आश्रम भर फिरलो. अतिशय रमणीय स्थान आहे हे. आम्ही ज्या शेडमध्ये झोपलो होतो तिथून तीन-साडेतीन फुटावर नर्मदा माई वाहत होती, तीही अगदी बाल स्वरूपात. राम कुटीर इतकं रमणीय आणि सकारात्मक स्थान आतापर्यंत कुठलंच नव्हतं… अगदी डायरेक्ट कनेक्शन विथ गॉड…

स्नानादी आटोपून आम्ही स्वयंपाकाला लागलो, साधुमहाराज हि आलेत. जेवण झाले आणि आम्ही साधारण तीन सव्वातीन ला चहा घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. म्हणायला हा रस्ता ८-९किलोमीटरचा असावा. पण संपूर्ण जंगलच. कुठे झाडांवर तर कुठे दगडांवर परिक्रमा मार्गाचे चिन्ह होते. साधारण अर्ध अंतर चालून आल्यानंतर एक सुंदर स शेड दिसलं त्याखाली थोडा विश्राम घ्यायला म्हणून आम्ही बसलो. आम्ही आपसात बोलतानाच अचानक आवाज आला,”कुठले पाहुणे तुम्ही? चहा घेणार का? आणतो करून. थांबा तिथेच. इकडे येऊ नका. परिक्रमा खंडित होईल तुमची.”. इतक्या शुद्ध मराठीत कोण बोलतंय म्हणून आम्ही त्याच्याकडे धावत गेलो. पाहतो तर पलीकडच्या भागावर एक संन्यासी उभे होते. अतिशय प्रेमळ चेहरा, आणि बोलके डोळे होते त्यांचे. नर्मदे हर झालं, एकमेकांची चौकशी झाली. मी नागपूरची म्हटल्यावर ते चक्क व-हाडी भाषेत बोलायला लागले. “नागपूरची हाय कावं मावशी, म्या पांढुरन्याचा हावो”. त्यांची ती भाषा ऐकून मला इतकं छान वाटलं म्हणुन सांगु… चहा झाला गप्पा झाल्या आणि त्यांनी जे सांगितलं त्यावरून खरंच वेड काय असतं, अभ्यास काय असतो,ध्यास कसा ते लक्षात आलं. यांचं नाव रामदास महाराज. गेली बावीस वर्ष ते इथे ज्ञानेश्वरीचं अखंड पारायण करतात आहेत. किती पारायण झाले माहित नाही. एक संपलं की दुसरं सुरू करायचं. आश्रम कसा चालतो माहीत नाही कुणीतरी येतं आणि काहीतरी देऊन जातं इतकंच काय ते माहीत मात्र परिक्रमावासी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात हे नक्की.

रामदास महाराजांचा निरोप घेऊन पुढे निघालो. कपिलधारा च अप्रतिम सौंदर्य बघून सरतेशेवटी अमरकंटक च्या रस्त्याला लागलो. माझे कपडे फाटले होते. मला नवीन कपडे घेणं भाग होतं. येईल त्या दुकानात कपडे घ्यायचे आणि पुढे मृत्युंजय आश्रमात आजचा मुक्काम करायचा हे ठरलेलंच होतं. मृत्युंजय आश्रम अजून दूर होता. एका दुकानात थांबलो मी पांढऱ्या कपड्यांची चौकशी करू लागले, तो दुकानदार मात्र मला पांढऱ्या वर डिझाईन असलेले किंवा काहीतरी भरतकाम केलेले असे कुर्ते दाखवू लागला. “अरे भाई पुरा सफेद हो तो दिखाओ हम परिक्रमावासी है” मी त्याला समजावून सांगत असतानाच मागून आवाज आला, “ओ सुरुची मैया एम्ब्रोईडरी है तो क्या हुआ? कुछ नही होता. एक कुर्ता ऐसा भी लेलो”.. माझं नाव घेवून मला कोण सांगतंय म्हणून मी मागे वळून पाहिलं तो चितळे माई उभ्या होत्या.. मोरटक्का नंतर आमची आताच भेट तेही अचानक… मी त्यांना कडकडून मिठी मारली… “दोन दिवस मृत्युंजय आश्रमात राहून आराम करा. अमरकंटक चा इकडला भाग फिरून घ्या, मग दक्षिण तटाला या. तिथे आपला आश्रम आहे तिथे तीन दिवस राहायचं आहे कमीत कमी… काही लागलं तर फोन करा तुमच्या आश्रमाच्या समोर मात्र महिन्याच्या दुसऱ्या किनाऱ्याला आपलं स्थान आहे तुम्ही येऊ शकत नाही मात्र आम्ही येऊ शकतो.” माईंचा हुकूम आणि वर तुपाने माखलेल्या पोळीवर केशर पेरलेल्या गुळाचा खडा असतो तसा वाटणारा धीर, हे दोन्ही मनाला भिडलं. आम्ही मृत्युंजय आश्रमात आराम केला. पुढे माई की बगिया फिरून माईंच्या आश्रमात आलो. तिथे आल्यावर दोन गोष्टी खूप जाणवल्या. एक म्हणजे इथे असलेला प्रत्येक जण हा माझ्या जीवा भावाचा होता, आणि दुसरं म्हणजे इथून जाऊच नये असं वाटणार हे स्थान होतं.

मोहिनी ताई, रमा,शमिका ताई,मोना ताई, देव दादा, धनंजय दादा, अश्या मैया सेवकांनी खूप सेवा केली आणि खूप आनंदात तीन दिवस गेलेत. इथून निघताना मात्र असं काही झालं की काय करावं तेच समजेना… माई पण खूप रागवल्यात मला “नाही तू जाच आता,मी तुझं सामान बाहेर आणून देते” असं म्हणाल्या मला…. असं काय झालं माझ्याकडुन? अशी कोणती समस्या पुढे आली की मला काय करावं हेच कळत नव्हतं? सांगते, पण पुढच्या भागात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*