नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला कांचनपूरच्या सरपंचाबद्दल सांगत होते. हा सरपंच रात्री उशिरा आला आणि त्यानंतर तो काही आमच्या समोरून जायचं नाव घेई ना. “मुझे मैया जी से बाते करनी है” असा हट्ट धरून बसला होता. कसाबसा टाळला त्याला आणि तो आपल्या खोलीत गेला. आम्ही सकाळचा अलार्म लावला होता साडेचारचा, त्याआधीच आम्ही उठलो आवर सावर केली आणि तिथून सटकायचा प्रयत्न करायला फाटका पर्यंत आलो पण फाटकाला कुलूप लागलेलं होतं. आता काय करायचं? आम्हाला आता त्या माणसाचा चेहरा सुद्धा बघायचा नव्हता. खरं काल अंधारात त्याचा चेहरा आणि त्याचे हावभाव आम्हाला दिसत नव्हते पण एकंदरीत अंदाज येत होता.
मात्र फाटकाला कुलूप होतं आणि आता थांबून राहण्याशिवाय आमच्याजवळ पर्याय नव्हता. ओसरीतच कुठेतरी किल्ली ठेवली असावी असं वाटून आमच्या नजरा किल्ली चा शोध घेऊ लागल्या. आमच्या हालचालीनी आजींची झोप उघडली. “जा रहे हो माता जी? सुबह का भोजन पाकर जाओ,” त्या म्हणाल्या… भोजन काय आम्हाला साधं पाणी सुद्धा प्यायची इच्छा नव्हती. किल्ली कुठे एवढेच काय ते आम्ही आजींना विचारलं. त्या म्हणाल्या, “मेरा बेटा बुरा इन्सान नही है, दारू सब बिघाड देती है”. खरं तर नर्मदा परिक्रमावासीयांच्या बाबतीत असं घडावं असं कदाचित त्या आजीनाही पटलं नसावं, पण ती एक आई सुद्धा होती. शिवाय आपल्याकडून नर्मदा परिक्रमावासीयांची अशी गैरसोय झाली याचं तिला वाईटही वाटत असावं. ती पुढे म्हणाली, “वो दिल का बहुत साफ है, लोगो की बहुत मदद भी करता है, मेरे बहू के बारेमे बताती हू. मेरे बेटे और बहू में पंधरा साल का अंतर है. बहु पढने मे बहोत होशियार है. घर की गरीब है, मेरे बेटे ने उसको बारवी तक पढाया. फिर दोनों एक दुसरे को पसंद आये तभी शादी करी”.
आपला मुलगा कसा चांगला आहे हेच तिला सांगायचं होतं. परिक्रमावासी ने आपल्या मुलाला शाप देऊ नये अशी तिची भावना स्पष्ट दिसत होती. “कम से कम चाय पी कर जाओ. उसको एक बार मिलकर जाओ.” ती जीव तोडून आग्रह करत होती. एकीकडे तिथून लवकर निघून जावं असंही वाटत होतं आणि दुसरीकडे त्या आईची इच्छा, भावना समजत होती. बाबा म्हणाला आपण जाऊ पुढे, पण का कोण जाणे मी मी थांबायचा निर्णय घेतला. उजाडेस्तोवर थांबतो, चहापाणी नको, मग मात्र आम्ही निघू. मी आजींना सांगितलं. ऊजाडेस्तोवर आम्ही तिथेच बसून होतो. उजाडल्यावर आम्ही निघायची तयारी केली तेव्हा आतून सरपंच बाहेर आला. बाबाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला मुझे माफ कर दो. त्यांनी चुकूनही डोळे वर करून माझ्याकडे बघितलं नाही. काही न बोलता कुलुप उघडलं आणि आम्ही बाहेर पडलो.
मैया अनेकक प्रकारचे अनुभव देते. त्यांतून अनेक शिकवणी देते. अनेक प्रश्न पुढे मांडते आणि त्याची उत्तरही स्वतःच देते. हा विषय तिथेच थांबला आणि कंचनपुर चा अनुभव तसाच आणि तिथेच सोडून आम्ही पुढे शिवाला घाट ला निघालो.
शिवाला घाट हा अपभ्रंश आहे. या घाटाचं नाव शिवालय घाट असं होतं. इथे नर्मदा मैया च्या पात्रा खाली अनेक शिवलिंग आहेत. त्यातली काही दिसतात. काहींवर मंदिरा सारखं बांधलेलं आहे. काही पूर्णपणे पाण्याच्या खाली आहेत. या शिवाला घाटावर एक कल्पवृक्ष आहे. त्या कल्पवृक्षाखाली बसले असताना हा कल्पवृक्ष आहे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे त्या कल्पवृक्षाखाली बसून देखील मी काहीही कल्पिलं नाही. माझ्याकडून कसलीही इच्छा त्या कल्पवृक्षा कडे व्यक्त केल्या गेली नाही, मात्र त्या कल्पवृक्षाच्या छायेत बसल्यानंतर अतिशय प्रसन्न, शांत, आनंददायक वातावरणाची अनुभूती झाली हे निश्चित. अर्थात माहित असतं तरी कदाचित माझ्याकडून कसलीच कामना केल्या गेली नसती कारण माझ्या सगळ्या कामना आपोआपच पूर्ण होत होत्या….
“कल्पना विस्तार होतसे संहारू, आम्हा कल्पतरू चाड नाही…”. आपण कल्पतरू च्या खाली बसून देखील काहीच मागितलं नाही हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी रामदास स्वामींचा हा अभंग आठवला, आणि प्रथमच काही न मागण्याचा मनापासून आनंद झाला.
थाडपठार, देवरी करत करत आम्ही दम्हेडी ला आलो. इथे शिवमंदिरात मुक्काम केला. इथून पुढे बिलासपुर, भीमकुंडी, खाटी असा रस्ता घ्यायचा होता. हा रस्ता म्हणजे तसा जंगल मार्गच. दम्हेडी पासून आम्हाला एक तरुण अधून-मधून दिसायचा. तो ऑटोचालक होता. मध्ये त्यांनी आम्हाला पार्ले जी बिस्कीट देखील दिली. त्याचं नाव जलाल शेख. हा विलासपूर ते खाटी या अंतरात सवारी ऑटो चालवतो. तुमची बॅग खाटी ला नेऊन सोडतो असंही तो म्हणाला पण आम्ही बॅग दिल्या नाहीत. खाटी ला शाळा मास्तरांकडे राहण्याचा सल्लाही त्यांनीच दिला. इथेही सोय व्यवस्थित झाली. हा सगळा आदिवासी पाड्यांचा आणि जंगलाचा भाग. सगळे कच्चे रस्ते. रस्त्यांवर दगडंच दगड. आजूबाजूला सगळी सागवानाची झाडं. अंतर जरी फार नसलं तरी चालायला वेळच लागत होता. दुस-या दिवशी खाटी होऊन निघायला उशीर झाला. थोड्या थोड्या अंतरावर छोटे-छोटे पाडे होते. मध्ये जंगलाचा भाग. रस्त्यांवर शुकशुकाट. एखादा सायकलवाला फार तर फार दिसायचा.
खाटी नंतर तासा-दोन तासाने असेल कदाचित, ती मुसलमान तरुण आमच्या मागून चालू लागलीत, त्यांना कदाचित पुढच्या पाड्यांवर जायचं असेल असं आम्हाला वाटलं, मात्र आम्ही थांबलो की ती थांबायचीत, आणि आम्ही चालू लागलो की पुन्हा चालू लागायची. बाबाला थोडं वेगळंच वाटलं. एक-दोन पाडे झाल्यावर जरा हिम्मत करून बाबाने त्या तिघांना विचारलं,” क्यू भाई कहा जाना है”..”दमगड तक जायेंगे बाबाजी”, त्यांनी उत्तर दिलं…”यांना पुढे जाऊ देऊ आपण मागून जाऊ” बाबाने निर्णय घेतला, पण ही तिघं काही उठायचं नाव घेईना. मात्र जसं आम्ही उठून चालू लागलो तसं ती तिघं पुन्हा आमच्या मागोमाग चालू लागली. आता बाबाला खरोखर काळजी वाटत होती, सोबत मी असल्याने आणि नुकताच कांचनपूर चा अनुभव असल्याने बाबा थोडा घाबरलाच होता. बळ एकवटून बाबानी थोडं खडसावून त्या तिघांना पुन्हा विचारलं..”आप हमारे पीछे ही आ रहे हो, हमे समझ आ गया है, ऐसा क्यू कर रहे हो?” बाबाचं बोलणं अर्धवट तोडत एक तरुण म्हणाला “हा तुम्हारे पीछे आ रहे है, बाबाजी तूम बूढे हो, धीरे धीरे जा रहे हो, जंगल का रास्ता है, दिदी को लेकर जा रहे हो, कुछ हुआ तो क्या करोगे? तुम आगे चलो हम तुम्हारे पीछे पीछे दम गड तक आयेंगे.”.. ही तिघं मुलं आमच्या मदतीसाठी येत होती तर! आमच्या मनात मात्र भलतेच विचार येत होते…”ऐसा है तो साथ में चलो ना, पीछे पीछे क्यू आ रहे हो?” बाबाला थोडं हायसं वाटलं आणि त्याने असा प्रश्न केला. त्यावर “तुम परिक्रमा वासी, हम मास मच्छी खाने वाले, तुम्हारा धरम भ्रष्ट हो जायेगा, इसलिए साथ नही चल सकते… तुमको क्या लगा? हम मुसलमान है तो क्या हुआ? पानी तो नर्मदा जी का पीते हे ना? हम भी नर्मदा जी को मानते है, तो परिक्रमावासी को क्यू तकलीफ देंगे?…”
आमच्या मनातले विचार त्या तिघांनी ओळखले होते. मात्र त्यांचं हे उत्तर ऐकून जीव भांड्यात पडला होता. “कल जलाल ने बताया था तुम दोनो के बारे मे, इसलिये ये साथ चले आये”.. आम्हाला बिस्किट देणारा जलाल ऑटोवाला या मुलांना सांगून गेला होता. झालं असं की जलाल नी बिस्कीट दिले त्यावेळी आधी त्याने आम्हाला एक प्रश्न विचारला, “मै मुसलमान हू लेकिन मुझे परिक्रमा वासी की सेवा करना अच्छा लगता है, बॅग तो आपने दिया नही, मेरे हाथ से बिस्कीट खाओगे क्या?.. त्यावर “जरूर खायेंगे जलाल भाई” असं म्हणून आम्ही आनंदाने बिस्किटं खाल्ली होती…. खरंच किती छोट्या छोट्या गोष्टी कुणाच्या मनाला सुख देऊन जात असतात नाही? त्यावेळी खरंच असं वाटलं की फक्त माणूस बनून राहणं हेच योग्य आहे. ही तिघही दमगड पर्यंत आमच्यासोबत आली. खरंतर फेरी सेमल च्या पुढे अंधार पडू लागणार होता, मात्र या तिघांनी आम्हाला धीर दिला म्हणाले, फेरी सेमल तो निकल गया अब ज्यादा दूर नही है अंधेरा होने से पहले हम आपको पोहोचा देंगे… थोडा उशीर झाला, किंचीत अंधार पडला, मात्र आम्ही राम कुटीर च्या दारा पर्यंत पोहोचेपर्यंत ही तिघे आमच्या सोबत होती. आम्ही आश्रमा पर्यंत पोचलो आणि ही मुलं परत फिरलीत. आम्ही जवळच गावात राहू, उद्या जाऊ, असा निरोप दिला आणि ति मुलं निघून गेली.
इकडे आम्ही आश्रमाचं दार वाजवू लागलो. इथे किर्र अंधार, लाईट नाहीच कुठे, दूर एक दिवा आणि आत आतल्या खोलीत एक कंदील दिसत होता. म्हणजे आत कुणीतरी होतं नक्की… पण नर्मदे हर ला काही उत्तर नाही, फाटकाला कुलूप नाही, पण ते फाटक उघडताच येईना, काही दिसेही ना.. ती मुलं ही निघून गेलेली…आता अंधारात परत फिरता येणार नव्हतं… पण सद्य स्थितीला आत ही जाता येत नव्हतं… मग काय केलं आम्ही? काय झालं पुढे? कुठे निवारा झाला? भोजन प्रसादी चं काय? थंडी प्रचंड होती, त्याचं कसं?.. सांगते, पण पुढच्या भागात.


Leave a Reply