नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ६९👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६९

नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला रोहनी चा अनुभव सांगितला. काहीही सोय नसताना आम्हाला आसन लावायला पडवी मिळाली होती. शिवाय जेवणाची व्यवस्था होईल की नाही असं वाटत असताना एक बैरागी बाबा आम्हाला जेवायला घेऊन गेले आणि दाल बाटी चं जेवण मिळालं. दुस-या दिवशी ते बाबा निघून गेलेत…
आम्ही निघण्याच्या तयारीत असताना कालच्या माताजी हापशीवर आल्या. आम्ही तयारी करतोय बघून म्हणाल्या “रोटी आचार बांध के भेजती हू, खा लेना”.. आम्हाला लोणचं आणि मक्याची भाकरी असं सकाळ चं जेवण पण मिळालं. आता आम्हाला पुढे निघायचं होतं. आज झालोन पर्यंत जाऊ असं वाटलं होतं पण नदी किना-यावर चालताना पायाला वेग येत नाही. कुंडा नावाच्या गावी व्यवस्था झाली. तो दिवस ही छानच झाला, मात्र पुढे झांसी घाट ला जो अनुभव आला तो सांगते.
आम्ही साधारण ३-३.३० च्या सुमारास झांसी घाट ला पोचलो. इथे एक आश्रम दिसला. इथे चहा घेऊ, थोडा आराम करू आणि पुढच्या प्रवासाला निघू असं वाटून आत गेलो. चहा झाला. आणि अचानक पाउस सुरु झाला. आता आम्ही पुढे जाऊ शकणार नव्हतो. मग तिथेच थांबायचं ठरवलं. या आश्रमात अनेक कातेलोर नियम होते जे पालनं जरा कठीण च होतं. साधू बाबांनी भोजन प्रसादीची तयारी केली. तेवढ्यात एक कार आश्रमापुढे येऊन उभी राहिली. हा आश्रम ज्यांनी बांधला तो हा माणूस. नर्मदे हर झालं आणि गप्पा सुरु झाल्या. बोलण्या बोलण्यात जी माहिती मिळाली आणि ज्या प्रमाणे मिळाली ते ऐकल्यावर “कुठून इथे आलो” असं वाटू लागलं.
तो म्हणाला “मै बहोत पैसे वाला आदमी हू.. मेरा बहोत राज चालता है गाव मे. मुझे किसी भी चीज के लिये “नही” कोई बोल नही सकता. सब डरते है मुझसे. मै आदमी बुरा नही हू लेकीन सनकी हू.. अभी अभी जेल से छुट कर आया हू, बेल पर हू… “ त्याचं हे बोलण ऐकून आता हा गेला लवकर तर बरं होईल असं वाटत होतं.. तो ही म्हणाला मी जातो, पण आज रात्री इथेच येतो म्हणाला…. आणि तो दारू प्यायलेला आहे हे समजत होतं. या आश्रमातील नियम ही खूप वेगळे होते. साधं बाथरुमला गेलं तरी आंघोळ करायची, सगळ्या वेळा पाळायच्या. तसं नियम पाळायाला हरकत नव्हती पण तरीही बाबाला इथे रहायचं नव्हतच.
तो माणूस गेला खरा, आणि बाबा नी ठरवलं, आज इथे राहायचं नाही… आश्रमात कुणी बाई माणूस नाही, हा असा माणूस येतो म्हणतोय, पाउस येतोय, अशा परीस्थितीत जायचं तरी कुठे?
पण इथे राहायचं नाही असा हट्ट च धरला बाबाने. मग काय निघालो… मागे वस्तीत गेलो. लोक सांगायचे आश्रमात जा.. शेवटी बाबाने सांगितलच, तिथे बाई माणूस नाही, म्हणून तिथे राहत नाहीये, एका बाईनी तिच्या घरा बाजूच्या एका खोलीत आश्रय दिला… मात्र इथून पुढेही गम्मतच झाली.
रात्री च्या आत आम्ही जाऊन पोचलो. चहा झाला, पूजा पाठ झाले. स्वयंपाक घरातून खमंग वास येऊ लागलेत. आता भोजन प्रसादी करू, सकाळी लवकर उठून इथून लवकर निघून जाऊ असा विचार केला, आणि भोजन प्रसादीची वाट पाहू लागलो मात्र बराच वेळ झाला तरी भोजन प्रसादी काही येईना. मग वाटलं चहा मागावा आणि चहा पिऊन झोपावं, म्हणून त्या बाई ना आवाज दिला..
त्या म्हणाल्या “ भोजन प्रसादी नही करोगे? आम्ही म्हणालो, भूक तो लागी है, त्यावर त्या म्हणतात, मैने तो बनाया ही नही.. मग आम्ही म्हणालो, कोई बात नाही, चाय भी चलेगी, तर म्हणे, अभी भोजन के समय पर चाय क्यू पी रहे हो… तिला नक्की काय म्हणायच होतं समजेना, म्हणजे ती भोजन देणार होती, की चहा देणार होती, की काही देणार नव्हती, माहित नाही.. “आपको तकलीफ ना हो, बाकी हमे कुछ भी चलेगा” असं सांगितलं, आणि आजचं जेवण मैयावर सोडलं. थोड्या वेळाने तिनी साखर आणि २ पोळ्या आणून दिल्या.
भोजन प्रसादी झाली, आता झोपी जायचं. झोपण्या पूर्वी फ्रेश व्हायचं म्हणून बाहेर जायला निघाले तर या मैया जीं नी दार बहरून लावलेलं. नर्मदे नर्मदे हर आवाज देऊन झाला तरी कुणी काही येईना.. शेवटी रात्र तशीच गेली.. म्हणजे बघा, आश्रमात रात्री जायला लागलं असतं तर आंघोळ करावी लागली असती, आणि इथे जाताच येईना.. दार बाहेरून बंद…सकाळी मैया नी उशिरा दार उघडलं तेव्हा बाहेर पडलो. पण त्यांनी दार का लावलं हे समजलं नाही…. असो…
जबलपूर ग्वारी घाट ला संस्कृत पाठशाळेत थांबलो होतो. तिथे एक म्हातारे आजी आजोबा पण थांबले होते. ते परिक्रमेत नव्हते पण कार नी भ्रमणाला आले होते. त्या आजी खूप शांत दिसत होत्या आणि आजोबा जरा बोलके होते. आमच्या थोड्या फार गप्पा झाल्या तेव्हा समजलं की आजोबा मोठे सायंटीस्ट म्हणून सेवा निवृत्त झाले. त्यांनी ए पि जे अब्दुल कलामांबरोबर काम केलं होतं. आजोबा अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आणि तितकाच साधेपण त्यांच्या अंगी होतं. गप्पा करताना आजोबा मध्येच थांबायचे.. त्यांना काही बोलायचं आहे असं वाटलं आणि पुन्हा शांत झाले. मी विचारलं, दादाजी कुछ बोलना है आपको… तर म्हणाले “तुम्हारे आसपास के लोग, जगह, वस्तू, सब तुमसे बाते करते है, तुमको सुनाई भी देता है, तुम समझती क्यू नही हो? मला काही समजे ना… क्या हुआ दादाजी, क्या नही समझ पा रही हू मै… मी विचारलं… तेव्हा ते जे बोलले तसं च्या तसं तुम्हाला सांगते..
ते म्हणाले, दो तरीके होते है समझने के लिये… एक बंद आंखोसे, एक खुली आंखोसे.. जब तुम्हारी आंखे खुली है तब तुम्हे छोटी छोटी चीझो को देखना होगा..गीलहरी क्या कहती है, पत्ते क्या कहते है, हवा क्या कहती है..ध्यान देगी तो पता चलेगा. अगर तुम सवाल करोगी तो जवाब भी मिलेगा, तुम्हे समझाना होगा…कर के देखो, सवाल करो, सवाल करो इस बिल्ली के बच्चे से, कुछ भी, असं म्हणत त्या आजोबांनी एका मांजराच्या पिल्लाकडे पाहिलं… मी मनात येईल तो प्रश्न विचारला, मी म्हणाले, “काय रे बाबा, तुला विचारलं तर सांगशील का तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर?” ते पिलू दोन चार मिनिटात उठलं आणि माझ्या पायाशी घुटमळू लागलं…दादाजी म्हणाले, “देखा, तुम्हारी जान न पेहचान, लेकीन फिर भी ये तुमसे लगाव जाता रहा है.. तो इसके पास तुम्हारे लिये कुछ तो है…हम बस पढ नाही पाते..खरच असच असतं, आपल्या ला हवी असलेली उत्तरं बरेचदा आपल्या अवती भवतीच असतात, माध्यम मिळत नसतं इतकंच.. मी हा उपाय करून बघण्याचं ठरवलं आणि लागलीच याची प्रचीती आली सुद्धा…आणि मग मला कांदरोज चा माझा अनुभव आठवला, हनुमान चालीसा म्हणताना कसं आजूबाजूचं सगळं हनुमान चालीसा म्हणतय असं वाटलं होतं मला! ह्या उपायाने एक होतं नक्की, आपला आपल्यावरचा विश्वास फार धृड होतो, कारण आपल्या सोबत अक्ख्ख विश्व उभं आहे याची जाणीव होते. आजोबांची ही शिकवण लक्षात ठेवण्यासारखी आणि अंमलात आणण्यासार्खीच आहे.
पुढे निवास मार्गे जावं का मंडला मार्गे हा एक प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. इथे अनेक लोक अनेक मतं देतात. मार्ग दोन्ही आहेत, पण आम्ही निवास मार्ग धरला. मंडला मार्ग कठीण आहे असं म्हणतात, बाबाचा दुखरा पाय बघता आम्ही निवास चा मार्ग घेतला पण शक्य असल्यास मंडला मार्ग घ्यावा. कारण असं की इथे घनदाट अरण्य आणि निर्मनुष्य वनं आहेत, त्यामुळे अनेक योगी तपस्वी इथे तप करत असतात, पण आम्हाला हे कुणी सांगितलं नाही. ते आमच्या नंतर लक्षात आलं.असो.
निवास मार्गे जाताना मध्ये मणेरी नावाचं गाव लागतं. इथे एका शिव मंदिरात मुक्काम केला. इथे एक छोट मंदिर आहे. सोबत ग्राम देवतेचं मंदिर आहे. ही ग्राम देवता अतिशय जागृत आहे असं म्हणतात. इथे नवस बोललेला फळतो असं म्हणतात. याच मंदीराच्या नवसाने झालेला एक मुलगा आणि त्याची आई आम्हला भेटले. त्याच्या आईनी सांगितलं की त्यांच्या लग्नानंतर दहा वर्षांनी मुलगा झाला, आणि त्या वेळी कुणीतरी एक साधू म्हणाला होता की ग्रामदेवतेला नवस घालायचा आणि परिक्रमा वासियांना जेवायला घालायचं, तेव्हापासून हा परिवार सेवेला हजर असतो.
आता या बाळाची गोष्ट सांगते. हा बाला साधारण एक वर्षाचा. त्याची आई स्वयंपाक करत होती आणि बाळाला मी घेतलं होतं. मी त्याच्याशी खेळत होते. तो ही आनंदाने तास दीड तास माझ्या बरोबर खेळला. मग माझ्याच हाताने जेवला देखील. आता भोजन प्रसादी करून आम्ही निघणार होतो. हे पिल्लू मला सोडायला तयारच नाही. आपल्या आईजवळ सुद्धा तो जायला तयार नव्हता. मग थोडं अंतर त्याला घेऊन गेले, वाटलं आईला दूर पाहून हा रडेल, तरी नाहीच, त्याला माझ्यापासून दूर जायचं नव्हतच…खरं तर तो अगदी झोपायला आला होता, तरीही मला सोडायला तयार नव्हता. शेवटी त्याला थोपटून निजवलं आणि मग आम्ही पुढे निघालो. काही तरी नक्की देणं घेणं असलं पाहिजे त्याचं अन माझ… मागच्या जन्मीचं.
आम्ही पुढे निघालो. आजोबांचा उपाय मी अमलांत आणत होते आणि मला अनेक उत्तरं मिळतही होते. आता पुढचा मोठा टप्पा होता विक्रमपूर आणि त्या आधी करोदि. करत करत आम्ही बिझोली च्या जवळ पोचलो. आता इथून पुढे मुंडा महा अरण्य सुरु होणार होतं, त्या आधीचा हा चढाई चा भाग. घाटातला रस्ता होता. दोन्ही बाजूने द-या आणि झाडी होती.. चालताना धाप लागेल अशी चढाई होती. रस्त्यात पाणी नाही की घर नाही… जवळचं पाणी संपल होतं..भूक लागायला आली होती…अगदी १०० मीटर चालून झालं की थकायला होत होतं.. आजोबांचा उपाय आठवला आणि मी त्या आजूबाजूच्या सगळ्या झाडांना, रस्त्याला, दोम्गाराना प्रश्न विचारू लागले…. मला उत्तर मिळालं का? काय झालं? सांगते, पण पुढच्या भागात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*