नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ६७
नर्मदे हर
मागच्या आठवड्यात मी तुम्हाला छोटी धुवाधार बद्दल सांगत होते. बरमान घाटच्या छोट्याश्या मात्र अतिशय तेजस्वी मैया ला भेटून आम्ही पुढे निघालो होतो. छोटी धुवाधार चा खडकाळ पहाड अर्धवट चढून झाला होता. नर्मदामैया चा आवाज आणि तिचा खळखळाट इतका जास्त होता की माझं आणि बाबाच बोलणं आम्हाला एकमेकांना सुद्धा ऐकू जात नव्हतं. अशात मैय्याच्या पाण्याचे तुषार टेकडीच्या वरपर्यंत येत होते. आम्ही अर्ध्या टेकड्यावर पोचलो होतो. इथून पुढे आम्हाला वाटच सापडत नव्हती. अतिशय खडकाळ जागा, खाली मैया खळखळतेय समोर एक मोठे संगमरवरी टेकडी आहे आणि त्याच्या पलीकडे मैया चा पलीकडचा किनारा आहे. मैया च्या पात्राच्या मध्यभागी एक मोठी संगमरवरी खडकांची टेकडी आहे. या टेकडीवर दोन्ही किनाऱ्यांकडून लाटा दणादण आदळत असतात आणि ती संपूर्ण टेकडी पाण्याने चिंब भिजलेली असते.
अशा वातावरणात आभाळ भरून आलं आणि हळूहळू पावसाला सुरुवात झाली देखील. ह्या या टेकडीवर अर्ध्यावर चढून आल्यावर रेतीचा एक मोठा डोंगर होता. या डोंगराच्या आज कदाचित मोठमोठे खडक असतीलही. ही रेती अगदी बारीकशी नसून अत्यंत जाड रेती होती आणि त्यावरून आमचे पाय घसरत होते. आम्ही अनेक प्रयत्न करून, हातातला दंड त्या रेतीत खुपसून वर चढत होतो मात्र पाच-सात पावलांवर चढल्यानंतर आम्ही खाली घसरून येत होतो. त्या टेकडीच्या आजूबाजूलाही जाऊन पाहिले. करवंदाच्या जाळी पेक्षा दाट जाळी त्या टेकडीच्या वरच्या बाजूला होती. आम्हाला रस्ता अजिबात सापडत नव्हता. अशात खाली नजर गेली तो एकच नावाडी आपली नाव घेऊन मैयाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या दिशेने जातांना दिसला. आम्ही त्याला बोलवायचा, आवाज द्यायचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ! त्याला काही केल्या ऐकू जाईना. तो आला तसाच तो त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला आणि आम्ही मात्र हताश होऊन तिथल्याच एका दगडावर प्रार्थना करत बसलो.
अशातच एक आशेचा किरण आम्हाला दिसला. तो असा की मैया च्या पात्राच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या पलीकडे दुसर्या किनार्यावर असलेल्या टेकडीवर काहीतरी हालचाल जाणवली. मैया चे तुषार हवेत उडत होते त्यामुळे धुकं असल्यासारखं वातावरण होतं. स्पष्ट दिसत देखील नव्हतं. नीट लक्ष दिल्यावर तिथे तीन मुलं बसली आहेत हे लक्षात आलं. आम्ही खूप हात वारे करण्याचा प्रयत्न केला. पण गंमत अशी की थोड्या वेळाने आम्हाला असं लक्षात आलं की त्यांची आमच्याकडे पाठ आहे. आम्ही आवाज देऊन काहीही फायदा नव्हता. आम्ही हातवारे केलेले त्यांना दिसणार नव्हते. फक्त ते तेथे आहे हाच एक जमेचा भाग होता.
आता आम्ही मैयाचा धावा करु लागलो. आता एकच आशा होती की त्यांनी आमच्याकडे बघावं. थोडा वेळ तसाच निघून गेला. आणि अचानक यातील एक मुलगा उठून उभा राहिला आणि पुढे चालू लागला. अजूनही त्याची आमच्याकडे पाठच होती. आता ही दुसरी दोघही उतरणार आणि निघून जाणार असं वाटू लागलं. पुन्हा एकदा बेंबीच्या देठापासून आरडाओरडा कर, हातवारे कर असे आमचे प्रयत्न सुरू झाले. आणि अचानक आमच्या प्रयत्नांना यश आलं.
तो सगळ्यात आधी उठलेला मुलगा समोर गेला आणि त्याच्या मित्रांनी त्याला मागून आवाज दिला असावा, म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं. त्यांनी मागे वळून पहिल्या क्षणी माझी ओढणी दंडावर लावून मी उंचावली आणि झेंड्यासारखा हलवू लागली… त्याला ती दिसली आणि आमचे हातवारे करून एकमेकांना समजून घेणे सुरू झाले. खाणाखुणा करतच आम्हाला रस्ता सापडत नाही असं मी त्याला सांगितलं. त्यावर आधी वर चढा मग उजवीकडे वळा असा इशारा त्याने केला.
आम्ही आम्ही पुन्हा एकदा त्या रेतीचा टेकडीवर काही अंतर चढलो आणि तसंच पाय रोवत रोवत वर न जाता उजव्या हाताला वळलो. हा भाग म्हणजे दाट जाळीच्या थोडा वरचा भाग होता. इथली जाळी फार दाट नव्हती. इथून मी पुन्हा ओढणीचा झेंडा वर केला आमच्यासमोर मोठा खडक असल्यामुळे त्या तिघांना कदाचित आम्ही दिसत नसू मात्र आम्हाला ते दिसत होते. आमचा झेंडा वर झालेला पाहून त्यांनी त्या जाळी मधून आत जा अशी खूण केली. आम्ही कसं बसं वाकत अडकलेल्या वेली काढत जाळीमधून आत गेलो. इथे आल्यावर आपण कुठल्याश्या पिंज-यात आहोत की काय असं वाटत होतं. सरडे, पाली, साप आणि न जाणे कोण कोण आमच्या आथम अंतर वावरत असेल, मैया च जाणे.
इथून पुढे मात्र छोटी पाऊल वाट लागली आणि एक चढाव लागला. हा चढाव चढून वर आलो तो आम्ही रेतीच्या टेकडीच्या वर आलेलो होतो. इथून आम्हाला आजुबाजूच सगळच मोकळं आणि स्पष्ट दिसत होतं. ते तिघे आमच्याच दिशेने बघत होते. आता पुन्हा त्यांनी इशारा केला आणि उजव्या हाताला दूरवर आम्हाला छोटी छोटी घरांची छपरे दिसू लागली. ही घरं दूर होती पण आम्ही इथवर पोहोचणार होतो ते या तिघांमुळेच. अन्यथा येवढ्या दाट जाळीत वाकून आत शिरण्याची हिम्मत आमच्यात नव्हती, आणि अशी जाळी पार केल्यानंतर रस्ता असेल अशी कल्पना देखील आम्हाला आली नसती.
ते तिघे तिथे त्या तटावर उभे होते आणि मी इथे अलीकडे. मी खाली वाकून तिथल्या मातीवर डोकं टेकून त्या तिघांना नमस्कार केला. नर्मदे हर अशी मोठ्याने आरोळी ठोकली, त्यांना ऐकू जावो की न जाओ माझ्या भावना त्यांच्या पर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील या आशेने मी “टाटा” केला, हात हलवला आणि पुढील शेताच्या वाटेवर चालू लागले. चार-पाच चार पावलं चालल्यानंतर कृतज्ञतेने एकदा मागे वळून बघितलं तो तिघही तिथे नव्हती. रिमझिम पाऊस अजूनही सुरूच होता. पलिकडचा काठ संपूर्णपणे ओसाड दिसत होता. आता क्षणभरापूर्वी तिथे तिघं मुलं होती हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही इतकी शांतता दोन्ही तीरांवर जाणवत होती. त्या तिघांचे कपडेसुद्धा मला स्पष्ट आठवतात. एकाने जांभळ्या रंगाचा शर्ट घातला होता दुसऱ्याने पिवळ्या रंगाचा टि-शर्ट घातला होता आणि तिसऱ्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता. पुन्हा एकदा मैया ने तिच्या आमच्यासोबत असण्याची प्रचिती दिली होती.
छोटी धुआधार चा हा प्रसंग डोळ्यासमोरून सरकत नाही इतका ताजा वाटतो… मी एकेक पाऊल पुढे टाकत होते आणि मन मात्र मागेच मागे जात होतं. बरमान घाट च्या मैया चे शब्द आठवले, “जब मोका मिलेगा तब नौ कन्याओको भोजन खिलाना” असं ती म्हणाली होती. नर्मदा माई चे ऋण तर फेडणे अशक्य आहे, किंबहूना तिची कृपा अशीच बरसत रहावी हेच खरं! तरीही गावात गेल्यावर नऊ कन्यांना भोजन तयार करून खाऊ घालू ही इच्छा तीव्रतेने मनात आली.
अजून गाव बरंच दूर होतं. आम्हाला गावात जायला तास-दीड तास नक्की लागणार होता. त्यानंतर आसन लावायचं, अंघोळ पूजा करायची, आणि मग भोजनाची व्यवस्था होईल. आज काही नऊ कन्यांना जेवायला घालता यायचं नाही, ते उद्या सकाळ वर सोडावे असा विचार करत करत आम्ही गावाकडे जात होतो. गाव बरंच जवळ आलं होतं आणि अचानक दहा-बारा मुलं मुली नर्मदे हर हर नर्मदे हर हर करत आमच्या जवळ आलीत…
“कहा जाओगे माताजी? किसके घर रहोगी मैया जी?” असा प्रश्न त्यातील मोठ्या म्हणजे दहा-बारा वर्षाच्या मुला मुलींनी विचारला. “आश्रम कहा है गाव में?” मी पण माहिती काढायला सुरुवात केली… तेव्हा त्यातली सगळ्यात मोठी मुलगी म्हणाली “आप हमारे घर चलो…”आम्ही तिच्या मागे मागे जाऊ लागलो. गावात गेल्यावर बघू काय करायचं ते असं ठरवलं, मात्र या मुलीकडून उद्या कन्या भोजनासाठी साठी नऊ कन्या मिळवता येतील का याचा प्रयत्न मी करू लागले. “बेटा जी मुझे कल कन्या भोज करना है नौ कन्या को खाना खिलाना है, तुम तुम्हारे दोस्तो को लेकरं आओगी?” मी तिला विचारलं… ती म्हणाली “आप हमारे ही घर चलो, हमारे घर कन्याये है उनको खाना खिला दे ना… मुझे दो बहने है, और मेरे दोनो चाच को तीन-तीन बेटिया है. हमारे घर मे हम नौ बहने और एक भाई है…..” तिचं हे बोलणं ऐकून काय आनंद झाला म्हणून सांगू! बरमान च्या त्या छोट्या मैया बद्दल बोलू? की आम्हाला शोधत येणाऱ्या या आठ बहिणीबद्दल बोलू? नऊ पैकी आठ इथे माझ्या अवतीभोवती होत्या आणि एक तीन वर्षाची असल्यामुळे आपल्या आईजवळ आपल्या घरी होती. आता मात्र आम्ही तिच्याच घरी जायचं ठरवलं.
ठरल्याप्रमाणे गुरसि ला सरपंच अली ठाकूर यांच्या घरी आम्ही गेलो आणि दुसर्या दिवशी सकाळी यथेच्छ कन्यापूजन आणि कन्या भोजन केलं. त्या नऊ कन्यांनी ही अतिशय शांततेने, आनंदाने अगदी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. यापेक्षा मोठं भाग्य ते काय? एक छोटी कन्या मैया स्वतःहून सांगून जाते की तुझ्या हातून नवदुर्गा जेवणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत, तुझ्या भाग्यात हे लिहिलेलं आहे आणि जेव्हा तुला शक्य असेल तेव्हा ते कर असं सांगितल्यानंतर लागलीच म्हणजे त्याच दिवशी या नवदुर्गा स्वतःहून मला त्यांच्या घरी घेऊन जातात आणि माझ्याकडून त्यांची पूजा आणि भोजन करवून घेतात.
सरपंच आली ठाकूर यांच्या घरचा मुक्काम हा खूप छान होता अगदी छोटसं घर त्यात बागडणार्या या नऊ मैया जी, तीन अन्नपूर्णा जी यांच्या सान्निध्यात तो दिवस खूप छान गेला. पुढे रामपुरा आणि रोहिणी ला देखील अनुभव आलेच…तसा रमपुरा चा अनुभव आपल्या अनुभव कथनाच्या सुरुवातीला मी सांगितलेला आहे. गुरूपासून तुम्ही कुठेही पळून जाऊ शकत नाही याची आलेली प्रचितीच ती… तिथून पुढे रोहणी ला खरंतर थांबायचं नव्हतं पण अंधार होत आला होता त्यामुळे थांबावं लागलं आणि ते सुद्धा एका दिव्य पुरुषाच्या आशीर्वाद अचानक पणे मिळाला….. कसं ते सांगणारे पण पुढच्या भागात.


Leave a Reply