नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५४ – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५४

नर्मदे हर..

तर महेश्वर चं आमचं दाणा पाणी संपलं होतं. माताजी आणि हृदयजीं चा निरोप घेऊन आम्ही मंडलेश्वर च्या वाटेनी निघालो. हे अंतर जेम तेम सात किमी. पण इथे एक गंम्मत झाली. थोडं आधीपासून सांगते. कुबेर भंडारी ला असताना आम्ही उसाचा रस प्यायचं ठरवलं होतं, आणि स्नान करून येऊन पाहतो तो रस संपलेला. मला फार आवडतो उसाचा रस, पण नाही मिळाला. ठीक आहे, नाही तर नाही… आता काय त्याचं विशेष.. पिऊ पुन्हा केव्हा तरी… असं वाटून तो विचार निघुनंही गेला…आणि त्या नंतर न मला उसाच्या रसाची आठवण आली आणि न कुठे उसाचा रस दिसला, मात्र मंडलेश्वर ला जाताना वाटेत एक उसाच्या रसाचा ठेला होता. त्या रस वाल्यानी आम्हाला आवाज दिला आणि तो काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला.. “ आईये माताजी, मन की और गले की, दोनो की प्यास बुझा दिजीये, ठंडा गन्ने का रस है, मन खुश हो जायेगा आपका, पसंद तो होगा ही आपको”… तो कदाचित ते असच बोलला असेल, पण त्याच्या ह्या बोलण्यावरून मला गुजरात मध्ये रस मिळाला नव्हतं ते आठवलं… कुठेतरी सुप्त मनात असेल का ही उसाच्या रसाची इच्छा? वरपांगी पाहता मी तर विसरलेही होते… काय माहित बाबा, ह्या मनाच्या एवढ्या मोठ्या व्याप्तीत काय अडकून राहात असेल अन काय मोकळं होत असेल… कदाचित म्हणूनच तो पिंजा-यातला पक्षी उडू शकत नसेल आणि इतरांना हे अदृश्य सुप्त पाश दिसत नसतील… असो..

आम्ही उसाचा रस पीत असताना तिथे अजून दोन जण गाडीवर आले, त्यांनी आम्हाला न सांगताच उसाच्या रसाचे पैसे देऊ केले तर तो रस वाला त्या दोघांना म्हणाला “ भैया जी चाहो तो आपके भी पैसे ना लू, लेकीन परिक्रमा वासियोंको तो मै ही रस पिलाने वाला हू, जितना चाहे पिजीये माताजी, आप ही का दुकान है!” किती ही श्रद्धा! नर्मदा मैयाची सेवा करायची हा एकच भाव!

रस पिऊन आम्ही पुढे निघालो, साधारण तासाभरात पोचलो देखील. तिथे दत्त मंदिरात रहायचं असं सांगितलं होतं, पण आम्ही गेलो तेव्हा मंदिरात कुणीच नव्हतं. मग आम्ही राम मंदिरात जायचं ठरवलं, तर तिथेच एका दुकानदारांनी जहागीरदार यांच्या घरी सेवा देतात ते असं सांगीतल, आणि महाराष्टीय नाव ऐकून छानच वाटलं, आणि आम्ही तिथे गेलो. जहागीरदार काकांशी खूप गप्पा झाल्यात.. काका आणि काकू खूप प्रेमाने करतात सगळं. सगळं आटोपल्यावर संध्याकाळी त्यांनी आम्हाला मंदिरात बोलावलं, म्हणाले “चटकन डोळे बंद करून बस, अजिबात इकडे तिकडे बघू नकोस… कसं वाटतं ते सांग आणि मग मी तुला सांगेन काय गंम्मत आहे ती. मी तिथेच पायरीवरच बसले आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे डोळे बंद केलेत. खूप छान वाटत होतं मला.. तिथला मंद सुगंध खूप शांती देणारा होता, आणि अगदी ओळखीचा वाटत होता. मला आठवलं.. परिक्रमेच्या पहिल्या दिवशी लेले काका जेव्हा रस्त्यात थांबून नमस्कार करायचेत नं तेव्हा, म्हणजे त्या नंतर असा मंद सुवास देणारी झुळूक यायची… आठवतंय का? या अनुभव मालिकेच्या तिस-या आणि चवथ्या भागात मी लेले काकांविषयी बोललेय बघा…ते म्हणायचे “ बेटा असा मंद सुवास कुठे असतो माहितीये का? ज्या सुवासाने मनाला शांती मिळते नं तिथे संत सद्गुरूचा वास असतो. परमेश्वराचा वास असतो”.. मला लेले काकांच ते वाक्य आठवलं, आणि खूप समाधान वाटलं.

“कसं वाटतंय ताई?” जहागीरदार काकांनी विचारलं.. उघडा डोळे आणि मी काय दाखवतोय ते बघा. त्यांनी एका मूर्ती कडे बोट दाखवलं..” ही मूर्ती ओळखीची आहे का?.. मुर्तीवराची फुलं बाजूला करून ती मूर्ती त्यांनी मला दाखवली आणि मी गहिवरून गेले. ती मूर्ती माझ्या गुरुंची, माझ्या नानांची! मला इतकं शांत का वाटत होतं ते समजलं.. नंतर जहागीरदार काकांनी त्या मूर्तीची गंम्मत सांगितली. ती मूर्ती त्यांना मैया मध्ये स्नान करताना सापडली होती. या वास्तू मध्ये वासुदेवानंद सरस्वती ही येऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं तेव्हा खरच आश्चर्य वाटलं… राम मंदिरात आम्ही का गेलो नाही? दत्त मंदिरात का कुणीच नव्हतं, नेमकं आम्ही आलो तेव्हा तिथे कुणीच का भेटलं नाही? कारण मी कुठे थांबायच हे मैयांनी आणि माझ्या गुरुंनी ठरवून ठेवलं होतं. जिथे माझे गुरु विराजमान आहेत, जी वास्तू मोठ्या महाराजांच्या स्पर्शाने पावन आहे तिथेच माझं वास्तव्य निश्चित झालं असल्यावर मी दुसरीकडे कुठेही कशी जाईन हो? बघा.. म्हणाले होते न मी, आपण असे नकळत ओढल्या जातो अश्या ठिकाणी… जशी मी बरोबर तिथेच गेले .. जाहागीरदारांच्या घरी… आणि तोच सुवास येणं, तसच शांत वाटण हा देखील एक संकेतच होता नाही का?

थोड्या वेळाने जहागीरदार काका मला बोलवायला आमच्या खोलीपाशी आले. “तुम्हाला भेटायला कुणीतरी आलंय, भेटून घ्या” म्हणाले. मला काही समजेना, इथे कोण मला भेटायला येणार? बाहेर येऊन बघते तो मांगीलाल आला होता. मांगीलाल म्हणजे लेपा गावात जो अन्नछत्र चालवतो तो. ज्याच्या घरी आम्हाला त्याच्या संपूर्ण कुटुंबांनी खूप प्रेम दिलं होतं. अगदी चवथ्या पाचव्या दिवशी परिक्रमेच्या..( ७व्या की ८ व्या भागात लिहिलंय बघा) लेपा हे पलीकडच्या तटावर, कसरावद च्या जवळ. मांगीलाल फक्त मला भेटायला नर्मदा मैया पार करून आला होता. २० किमी तरी अंतर असेल. येताना माझ्यासाठी द्राक्ष, बोरं, केळं आणि आईनी केलेले कणकेचे लाडू घेऊन आला होता. जेमतेम परिस्थिती असलेलं हे कुटुंब पण आपुलकी आणि प्रेम याची जराही कमतरता नाही. त्या माउली नी माझ्यासाठी घाई घाईत कणकेचे लाडू करून दिले होते. किती प्रेम देते ही मैया आपल्याला?

दुस-या दिवशी सकाळीच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आज चं अंतर बराच लांब होतं. म्हंणजे आम्ही ठरवलं काहीच नव्हतं पण एक अंदाज होता की धारेश्वर ला पोहोचता येईल. पण आम्ही धारेश्वर ला जाऊ शकलो नाही. त्या आधीच थांबावं लागलं. तरीही ३६ किमी चालून झालं पण याचं श्रेय आम्हाला नाही. एका गावातल्या शेतक-याला. आम्ही शेतातून जात असताना एक शेतकरी त्याची बैलगाडी घेऊन बसला होता. जणू काही आमच्यासाठी बसला असावा तो, कारण आम्ही त्याच्याजवळ पोचताच म्हणाला “अंधेरा होनेको है, बैठो गाडीमे” आम्ही गाडीत बसायला नकार दिला, अजून ७-८ किमी चालून जायचं बाकी होतं असं त्यांनी सांगितलं.. मग तो पुढे आणि आम्ही मागे असं चालू लागलो, आणि अचानक त्यांनी गाडी थांबवली, आमचं सामान आम्हाला त्याच्या गाडीत ठेवायला लावलं आणि तो पुढे निघाला… “आजाओ सब सुविधा हो जायेगी”.. गाडी पुढे निघून गेली होती.

आमच्याजवळ काहीही सामान नव्हतं. आम्हाला त्या शेतक-याचं नाव माहित नाही, आम्हाला नक्की कुठे जायचं आहे ते ही माहित नाही…आम्ही पोहोचू शकू की नाही ही पण कल्पना नाही… पण दुसरा पर्याय नव्हता. अंधाराच्या आत गावात पोहोचणं गरजेचं होतं आणि झपाझप पावलं टाकत जवळ जवळ तासाभरातच ७ किमी अंतर आम्ही पार केलं सुद्धा. त्या शेतक-राने सांगितल्या प्रमाणे परशुराम यादव यांच्याकडे आमची व्यवस्था करण्यात आली होती. अगदी पाय धुण्याला गरम पाण्यापासून तर भोजन प्रसादी आणि अगदी अंथरूण देखील टाकून तयार होतं. त्यांचं घर तसं लहान, त्यामुळे पडवीत आसन लावलेलं, आणि परशुराम जी स्वत: आमच्या बाजूला पडवीत झोपले होते.. आमची जरा हालाचाल झाली की ते विचारत “कुछ चाहिये बाबाजी”…रात्रभर जणू आमच्या दिमतीला असावेत इतकी सेवा त्यांनी केली आमची. आणि धारेश्वर फक्त ३ किमी होतं इथून, तरीही परशुराम जी यांच्याकडे आमचं येण लिहिलं होतं… म्हणून तेवढे ३ किमी आम्ही जाऊच शकलो नाही.

परशुराम भाई नी आम्हाला एक गोष्ट सांगितली. त्यांच्या धाकट्या मुलाची. तो लहान असताना सारखा आजारी असायचा. सगळं करून झालं तरी याचं आजारपण संपेना.. मोठा आजार असा काही नव्हता मात्र सतत तब्येतीची कुरकुर सुरु असायची. कधी ताप तर कधी सर्दी पण पोरगा ठणठणीत आहे असं कधी झालं नाही. त्याच्या आजीनी मैया ला साकडं घातलं आणि परीक्रमावासींची सेवा करायला सुरवात केली. वर्षभर न चुकता येणा-या परिक्रमावासींची आपल्याच्याने होईल तशी सेवा ते करत गेले आणि मुलाची तब्ब्येत सुधारू लागली. तेव्हापासूनची सेवा आजतागायत सुरु आहे. हा मुलगा आता १५ वर्षांचा आहे. त्याची आजी वारली पण घरच्यांनी सेवा सुरूच ठेवली. परशुराम भाई म्हणतात “अब तो बच्चा अच्छां ही है, लेकीन अब हमे सेवा करने मे आनंद आता है, परिक्रमावासी जिस दिन पेट भर खाना खाते है, हमारा दिल आनंद से भर जाता है”.. ते इतके भावपूर्ण होऊन सांगत होते की आमचे ही डोळे भरून आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही धारेश्वर कडे निघालो. इथे रस्त्यात म्हणजे मैया किनारी रेती खोदण्याचं काम सुरु होतं. साधारण धारेश्वार च्या पुढे ४ किमी वरची गोष्ट असेल. आम्ही एका दगडावर आराम करत बसलो असताना खालून, म्हणजे मैया चं पात्र साधारण ८ एक फुट खाली होतं तिथे, तिथून एक म्हातारी आजी वर आली. आल्या आल्या तिनी मला मिठी मारली आणि ती रडू लागली. “बेटा परिक्रमावासी बच्चा, तुम कितने चलते हो मेरे बच्चे, माई के लिये चलते हो… बस उसके दर्शन पाने के लिये कितने कष्ट लेते हो.. भुके प्यासे चलते जाते हो मेरे बच्चे… थोडा भोजन पा लो” आजी मला कुरवाळत होती, माझ्या कपाळाचे मुके घेत होती आणि रडत होती. माझा जीव तर तिथेच पाणी पाणी झाला. एक अनोळखी म्हातारी आजी, माझ्यावर इतका वर्षाव करतेय मायेचा, काय संबंध तिचा आणि माझा? आधी कधी पाहिलं नाही, नंतर कधी भेटणार नाही, आणि ही माउली मला एकच म्हणतेय, कळवळून…”भोजन पा लो”… जेवून घ्यायला सांगतेय… आणि आता तर जेमतेम सकाळचे साडे नऊ वाजलेत… इतक्यात मला भूकही लागली नाही.. पण ही आजी काही ऐकेच ना.. समोर च्या मोठ्ठ्या टेकडी कडे बोट दाखवत म्हणायची “ उपर जा के खाना खालो… शरमाना नही, पेट भर के खाना मेरी बिटिया रानी…तुझे मेरी सौ..” आता तर तिनी शप्पथच घातली.. तिचं मन मोडून पुढे जाण्याची न माझ्यात हिम्मत होती न इच्छा..ती माझ्या जेवणासाठी स्वत:ची शपथ घालतेय? नाही, मी ऐकेन तिचं. ती भली मोठी टेकडी चढून जाईन वर आणि भोजन प्रसादी घेईन तिथे.. मी ठरवलं..आणि मी आणि बाबा तिचा निरोप घेऊन टेकडी चढून वर गेलो. आम्ही थकलो होतो.. तिथे आश्रमात पडवीत एक साधू झोपलेले होते.. आम्ही नर्मदे हर केलं पण ते काही उत्तर ही देईनात….जे नर्मदे हर ला उत्तर देत नाही ते भोजन प्रसादी तरी देतील का? मनात प्रश्न पडला आणि आता धर्म संकट उभं राहिलं.. आजी ला वाचन दिलेलं…. आणि हा माणूस ढुंकून ही बघत नाहीये… मला आजीच्या शब्दाचा मान राखायचाय… काय करावं?

एक कल्पना सुचली.. ती अंमलात ही आणली मात्र नंतर जे झालं ते फार कष्टप्रद होतं. आयुष्यात असं कधीही केलं नव्हतं ते आज करावं लागलं.

बळजबरिनी…अगदी अजिबात इच्छा नसताना… कारण कंबरेवर हात ठेऊन ते साधू महाराज जमदग्नीच्या अवतारात उभे होते समोर….करवूनच घेतलं होतं त्यांनी!… पण त्याही नंतर जे झालं तो खरा अनुभव.. काय झालं असं टेकडीवर? भोजन मिळालं? आजीनी दिलेली शप्पथ पाळू शकले मी? ते संन्यासी का उभे होते रागात माझ्या समोर? तेही दोन्ही हात कमरेवर ठेऊन? काय करवलं त्यांनी माझ्याकडून? काय कष्ट झालेत मला? आणि त्यानंतर काय झालं? सांगते पण पुढच्या भागात.

©सुरूची नाईक – विदर्भ गट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*