आज १५ ऑगस्ट:अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद ऊर्फ ऑरोबिंदो,यांची १५१ वी जयंती – बडगुजर. इन

आज १५ ऑगस्ट:अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद ऊर्फ ऑरोबिंदो,यांची १५१ वी जयंती.
🇮🇳↕️🇮🇳
[१५ऑगस्ट१८७२-५डिसेंबर १९५०]
अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते,ते स्वातंत्र्य- सेनानी,शिक्षणतज्‍ज्ञ,भाषांतरकार,लेखक,संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.

अरविंद घोष वैयक्तिक माहिती
जन्म: १५ ऑगस्ट१८७२.
मृत्यू: ५ डिसेंबर १९५०.
पाँडिचेरी, भारत
निवासस्थान: कलकत्ता,दार्जीलिंग,लंडन,बडोदा,पाँडिचेरी.
राष्ट्रीयत्व: भारतीय
टोपणनावे: श्रीअरविंद
प्रशिक्षणसंस्था: किंग्ज कॉलेज,लंडन.
प्रसिद्ध कामे: वंदे मातरम्,आर्य,धर्म,कर्मयोगिन इ.वृत्तपत्रे_
मूळ गाव: कलकत्ता
जोडीदार: मृणालिनी देवी
वडील: डॉ.कृष्णधन घोष
आई: स्वर्णलता देवी_
जीवन: अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता घोष होते.प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी राजनारायण बोस यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते.सरोजिनी ही धाकटी बहीण आणि बारीन्द्र घोष हा धाकटा भाऊ,असे हे कुटुंब होते.इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला,त्यांना इंग्लिश शिक्षण,त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली.मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले.भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.

शिक्षण: लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती,वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश,ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच,जर्मन,स्पॅनिश,इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले.१८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.
केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते ‘इंडियन मजलिस’ या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि.०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष भारतात येऊन पोहोचले.

व्यावहारिक जीवन: भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री.भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी,मृणालिनी देवी यांच्याशी झाला. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले,येथे ते बंगाली, मराठी,गुजराथी,तमिळ आणि संस्कृत या भाषा शिकले. तेथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे वाचन केले.वेद, उपनिषदे,महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून,त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले.

योगसाधनेस आरंभ: इंग्लंडवरून भारतात परतल्यावर,अपोलो बंदर,मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली.भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.काश्मीरमध्ये शंकराचार्य टेकडीवर(तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला.सन१९०२ मध्ये पुण्यामध्ये पर्वतीवर त्यांना अनुभव आला.हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे.नर्मदाकाठी चांदोदच्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते.
बडोदा येथे असतांना त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला.आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे विष्णु भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले.श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली,तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग: सन१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला,ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले,ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या इंदुप्रकाश साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे,हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता;अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.सन १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते.
थोर क्रांतिकारक,तत्वज्ञानी अरविंद घोष यांच्या १५१ व्या जयंती निमित्ताने विनम् अभिवादन_
स्त्रोत:गूगल/इंटरनेट.
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🇮🇳〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️🇮🇳

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*