आज ७ ऑगस्ट:गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची ८२ वी पुण्यतिथी.
रवींद्रनाथ टागोर(बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार:रोबीन्द्रनाथ ठाकूर)
[७ मे १८६१-७ऑगस्ट १९४१],
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर,हे एक ब्राह्मोपंथीय,चित्रकार, नाटककार,कादंबरीकार,बंगाली कवी,संगीतकार आणि समाजसुधारक होते.१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.
अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते,ज्याचे वर्णन “अगदी संवेदनशील,ताजे आणि सुंदर” कविता असे केले जाते. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले.टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले; तथापि, त्यांचे “सुंदर गद्य आणि जादुई कविता” बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत.
बंगाली साहित्यावर रवीन्द्रनाथांचा एवढा प्रभाव लक्षात आहे की, बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते.त्यांना कधीकधी “बंगालचा बार्ड” म्हणून संबोधले जाते.[६] तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.
कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या.सन १८७७ पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला.
शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले.
जीवनपट:प्रारंभिक आयुष्य:१८६१- १९०१:
कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० – १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत,११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे),अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास,खगोलशास्त्र, विज्ञान,कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.
१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले.[१४] याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा “भिकारिणी” व सुप्रसिद्ध कविता “निर्झरेर स्वप्नभंग” आदी रचना लिहिल्या.
पत्नी मृणालिनीदेवी व रवींद्रनाथ सन १८८३
बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु सन १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले.९-नोव्हेंबर-१८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी(जन्मनाव भावतारिणी १८७३-१९००) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.सन१८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते.हा काळ रवींद्रनाथांचा “साधना काळ” म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले.[१५] आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.
शांतिनिकेतन:१९०१- १९३२:
१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले.एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली.[२०] रवीन्द्रनाथांच्या पत्नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला.वडिलांचे देहावसान १९-जाने-१९०५ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली.[२१] या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४-नोव्हे.-१९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते.१९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने “सर” ही पदवी दिली.सन १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.
१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरूल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे “श्री-निकेतन” असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.[२३] ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.सन १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.
७-ऑगस्ट-१९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.
रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र:
रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक,राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
रवींद्रनाथ अनुवादित तुकारामांचे अभंग.
कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली [३५] छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्य ही त्यांनी रचले आहे. रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रवीन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रविंद्रनाथ ्मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले. मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा. बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे.
गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय तिचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. मराठीतले पहिला गद्य अनुवाद हरि नारायण फडके यांनी केला होता. अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर (जन्म : २९ मे, १९२९) यांनी रवींद्रनाथांच्या गीतंजलीसकट एकूण चार पुस्तकांचा ‘रवींद्र गीतांजली…’ नावाचा गद्यानुवाद केला आहे. ह्या अनुवादल मसापचे उत्कृष्ट भावानुवादाचे स.ह. मोडक पारितोषिक मिळाले होते.
याव्यतिरिक्त सौ.ज्योती कुलकर्णी यांनी ‘गीतांजली रविंद्रनाथांच्या-माझ्या मराठीत’ नावाचे पद्यमय भाषांतर केले आहे(२००८).
कार्य: पारंपारिक हैदा कोरीवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे “र-ठ” रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा अशा कलेने सजवत असत.
संगीत,साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.
रवींद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध,लघुकथा,प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे.
काव्य: शांतिनिकेतन येथे वार्षिक होळी यात्रेनिमित्त जमलेले बाऊल लोककलाकार
१५-१६ व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथांवर प्रभाव होता. भारतीय परंपरेतील ‘ऋषी’ संकल्पनेचाही रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव दिसून येतो. गावोगावी गीत गात फिरणाऱ्या फकिरांसारख्या ‘बाऊल’ कलाकारांची ग्रामीण बंगालमध्ये परंपरा आहे. बाऊल स्वतःस कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत. त्यांच्या गीतांत हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्माची शिकवण दिसून येते. रवींद्रनाथांनी या परंपरेस बुद्धिजीवी वर्तुळात पूर्वी नसलेली प्रतिष्ठा दिली. त्यांच्या बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांच्या स्वतःच्या काव्यकृतीस नवा आयाम मिळाला.’मनेर मानुष’ (मनातील माणूस) आणि ‘जीवन देवता’ ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत बऱ्याचदा दिसतात.
रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे १९१३ सालच्या आवृत्तीचे मुखपृष्ठ.:
गीतांजलीतील (গীতাঞ্জলি) चौथ्या कवितेचे (titleः प्रार्थना) मराठी भाषांतर.
বিপদে মোরে রক্ষা করো এ নহে মোর প্রার্থনা,
বিপদে আমি না যেন করি ভয়।
দুঃখতাপে ব্যথিত চিতে নাই বা দিলে সান্ত্বনা,,
দুঃখে যেন করিতে পারি জয়॥
সহায় মোর না যদি জুটে
নিজের বল না যেন টুটে।
সংসারেতে ঘটিলে ক্ষতি, লভিলে শুধু বঞ্চনা,
নিজের মনে না যেন মানি ক্ষয়॥
আমারে তুমি করিবে ত্রাণ এ নহে মোর প্রার্থনা
তরিতে পারি শকতি যেন রয়।
আমার ভার লাঘব করি নাই বা দিলে সান্ত্বনা,
বহিতে পারি এমনি যেন হয়॥
নম্রশিরে সুখের দিনে তোমারি মুখ লইব চিনে,
দুখের রাতে নিখিল ধরা যে দিন করে বঞ্চনা তোমারে যেন না করি সংশয়॥
बिपदे मोरे रक्षा करो ए नहे मोर प्रार्थना,
बिपदे आमिना जेन करि भय||
दुःखतापे ब्यथित चिते नाइ बा दिले सान्त्बना,
दुःखे जेन करिते पारि जय||
सहाय मोरना जदि जुटे
निजेर बलना जेन टुटे|
संसारेते घटिले क्षति, लभिले शुधु बन्चना
निजेर मनेना जेन मानि क्षय||
आमारे तुमि करिबे त्राण ए नहे मोर प्रार्थना
तरिते पारि शकति जेन रय||
आमार भार लाघब करि नाइ बा दिले सान्त्बना
बहिते पारि एमनि जेन हय||
नम्रशिरे सुखेर दिने तोमारि मुख लैब चिने
दुखेर राते निखिल धरा जे दिन करे बन्चना
तोमारे जेनना करि संशय||
प्रार्थना
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|
दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|
माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|
माझे ओझे हलके करून
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|
कादंबऱ्या व इतर साहित्य: रवींद्रनाथांनी ‘चतुरंग’,’शेषेर कबिता'(शेवटच्या कविता), ‘चार अध्याय’, ‘नौका डुबी’, ‘घरे बाईरे’ या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. ‘चतुरंग’ ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे.
गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात.’शेषेर कबिता'(शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. यात ‘रवींद्रनाथ ठाकूर’ हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या ‘प्रसिद्ध कवी’वर टागोर त्रयस्थपणे टीका करतात. ‘चार अध्याय’ ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. ‘राष्ट्रभक्ती’ म्हणजे काय?,राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.
जीवनकहाणी: रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत.पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.
रवींद्रसंगीत: “नाचणारी मुलगी”,रवींद्रनाथांचे एक तैलचित्र – तारीख अज्ञात.
रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत (बंगाली :রবীন্দ্র সংগীত}} असे संबोधले जाते. गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत मानण्यात येते. भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत. सांगीतिकदृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्त्य संगीत ह्या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा मानल्या जातात. अभिजात भारतीय संगीतातील ठुमरी शैलीचा रवींद्रसंगीतावर मुख्य प्रभाव आहे. ही गीते रवींद्रनाथांच्या स्वतःचे तत्त्वचिंतन दाखवत असली तरी त्यांवर वैष्णव व उपनिषदीय तत्त्वज्ञानाचीही झलकही दिसते. रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते.अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार),अमजद अली खान (सरोद]) आदींचा समावेश आहे.
चित्रकला: वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरून त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली.आयुष्याच्या या काळात रवींद्रनाथांना रंगांधळेपणाचा त्रास सुरू झाला होता. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅडमधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरीवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात.आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत.
नाट्य: वयाच्या विसाव्या रवींद्रनाथांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे. ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. ‘अभिनयापेक्षा भावनांवर भर’ असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. ‘चंडालिका’, ‘विसर्जन’, चित्रांगदा’, ‘राजा’, ‘मायार खेला’ ही रवींद्रनाथांची इतर नाटके. नाटकांसोबत टागोरांच्या ‘नृत्य-नाटिका’ विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे.
लघुकथा:‘गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात.’काबुलीवाला’ या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.
इस्रायलमधील सार पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनसंस्थेने रविंद्रनाथांच्या कथांचा हिब्रू भाषेतील अनुवाद ‘एप’ या नावाने इ.स. २००६ साली प्रकाशित केलेला आहे.
प्रभाव व वारसा:
रवींद्रनाथांचा वॅलाडोलिड येथील पुतळा
रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूर बाडी गावी रवींद्रनाथांच्या पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो.
रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तींत अमर्त्य सेन, ॲंन्द्रे गिडेल (फ्रान्स),यसुनारी कावाबाता(जपान) आदी नोबेल विजेते,याशिवाय सलमान रश्दी,पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे,विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.
रविंद्रनाथ टागोर यांच्या ८२ व्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन तथा शत् शत् नमन
स्त्रोत:गुगल विकिपीडिया
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply