आज १५ जुलै:मुंबईत पहिली उपनगरी🚎बस सेवा🚌सुरू झाली – बडगुजर. इन

🪩दिन विशेष:भाग-२.🪩
आज १५ जुलै:मुंबईत पहिली उपनगरी🚎बस सेवा🚌सुरू झाली.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराची (Mumbai) शानच काही और आहे. ब्रिटीश काळापासून सतत आघाडीवर असणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण शहराचा स्वतःचा असा एक वेगळा इतिहास आहे. त्याची एक वेगळी संस्कृती आहे. ज्यामुळे हे शहर नेहमीच इतर शहरांपासून वेगळं ठरलं आहे.हे शहर अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे.आज अशाच एका ऐतिहासिक सेवेचा वर्धापनदिन आहे.ही सेवा आहे मुंबईतील बससेवा (Bus Service).१९२६ मध्ये आजच्याच दिवशी देशात पहिल्यांदा मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी बस (First Bus Service in Country Started in Mumbai) धावली.तेव्हापासून आजतागायत बेस्टची बससेवा अखंड सुरू आहे.उत्तम सेवेसाठी देशभरात मुंबईची बससेवा ओळखली जाते.
कुठून कुठे धावली पहिली बस: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्ट (BEST) या कंपनीनं सुरू केलेली ही बससेवा मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली बस सेवा होती.अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत पहिली बस धावली होती.नंतर सरकार आणि बीएमसीच्या आवाहनानुसार कंपनीनं १९३४ मध्ये मुंबईच्या उत्तर भागात आपल्या सेवेचा विस्तार केला.१९३७मध्ये डबल डेकर बस वापरात आणली गेली.मुंबई आणि देशातील पहिली मर्यादित बस सेवा १९४० मध्ये कुलाबा ते माहिमदरम्यान चालवण्यात आली होती.
१५ जुलै १९२६ रोजी मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली:बेस्टचा इतिहास सुरू होतो तो जॉर्ज आल्वा किर्टीज आणि विल्यम फ्रेंच स्टर्न्स यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे ट्रामवेज कंपनीच्या घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रामपासून.नंतरच्या काळात ट्राम चालविण्यासाठी विजेची गरज लागली.आणि ही कंपनी बंद होऊन १९०५ साली ‘बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कं. लि.’ (बेस्ट कं.) ची स्थापना झाली.दि. ७ मे १९०७ रोजी सायं. ५.३० वा. हार-फुलांनी सजलेली विजेची एकमजली ट्राम मुंबई पालिका मुख्य कार्यालय ते कॉफर्ड मार्केट या पहिल्या उद्घाटनाच्या फेरीने वाजत-गाजत रस्त्यावर धावू लागली.

घोड्याच्या ट्रामच्या तुलनेत अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता व अधिक गती, प्रदूषण विरहित स्वस्त प्रवास यामुळे विजेवरील ट्राम प्रचंड लोकप्रिय झाली.

१५ जुलै १९२६ रोजी, अफगाण चर्च,कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर (सकाळी ६.३० पासून ते रात्री ११.२० पर्यंत, दर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने) बससेवा सुरू झाली. या बससेवेचे वेळापत्रक व माहिती आदल्या दिवशीच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ दैनिकात देण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये टपालपेट्या ठेवण्यात आल्या.मुलांसाठी अर्धे तिकीट व ट्राम प्रवासाप्रमाणे एकाच तिकिटाच्या प्रवासात दोन वेळा कोठेही उतरून पुन्हा बसप्रवासाची सोय असलेले ‘ट्रान्सफर तिकीट’, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. सेवा सुरू करण्यात आल्या आणि कालांतराने त्या बंदही झाल्या.बस प्रवासाची उपयुक्तता उशिरा का होईना प्रवाशांच्या लक्षात आल्यावर बसताफा वाढविण्यात आला आणि प्रवाशांची संख्याही वाढत गेली.

त्याकाळी ड्रायव्हर-कंडक्टर चा पोशाख सारखाच असे. खाकी कोट-पँट, गोल काळी टोपी, पितळी बटणे, आर.टी.ओ.आणि बेस्टचा पितळी बिल्ला.नंतर खाकी गांधी टोपी आली.

सुरुवातीच्या काळात बसमार्ग इंग्रजी वर्णाक्षरात असत, तर ट्राम मार्ग अंक/आकड्यात. पुढे बसमार्ग वाढत गेले आणि इंग्रजी वर्णाक्षरे अपुरी पडू लागली तेव्हा ए-१, बी-१ या प्रकारे नावे देणे सुरू झाले,नंतर बसमार्ग इतके वाढत गेले की हे ही अपुरे पडू लागले आणि शेवटी १९५९ पासून बसमार्ग अंक/आकड्यात देणे सुरू झाले ते आजतागायत चालू आहे.

१९५३ साली ट्रामसेवा कमी करून त्या मार्गावर बसगाड्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे ३१ मार्च १९६४ रोजी रात्री १० वाजता ट्राम बोरीबंदरहून दादर टी.टी. या अखेरच्या प्रवासाला निघाली अन् मुंबईतील ट्रामसेवेचे पर्व कायमचे अस्तंगत झाले.

जुन्या ओम्नी बसमध्ये थ्रॉनीक्रॉफ्ट (१९२६), डॉज (१९२७),डॅमलर (१९२८),थ्रॉनीक्रॉफ्ट चारबंक पर्यटन बस (१९२८)जी एम सी(१९३०),ए इ सी(१९३१),लेलँड(१९३१), आल्बियन (१९३३),गाय अरब (१९५०) इ. प्रकारचा बसताफा असे.तेव्हा ब्रिटिशांची सत्ता असल्याने वरील सर्वच बस प्रामुख्याने ब्रिटीश बनावटीच्या असत.आल्बियन बसेसना इंजिनपासून शेवटच्या चाकांपर्यंत सायकलीसारख्या साखळ्या (चेन ड्राइव्ह) असल्याने बस धावताना ‘कड्-कड’ असा जोरदार आवाज येत असे. या गाड्या चालविणे कष्टप्रद असल्याने या गाडीला ड्रायव्हर रागाने ‘भैस’ म्हणत.१९३७ साली डॅमलरच्या दुमजली बसेस आल्या आणि रस्त्यावरील तेवढ्याच जागेत एकमजली बसच्या तुलनेत दुप्पट प्रवासी वाहून नेऊ लागल्या.१९६७ साली आलेल्या दुमजली ट्रेलर बसेस १९८५ पर्यंत होत्या,या बसमध्ये सर्वात जास्त म्हणजे १०० प्रवासी मावत.जानेवारी १९९७ मध्ये पर्यावरणस्नेही सी़ एन.जी. बसगाड्या दाखल झाल्या. वरील दोन्ही गाड्या सर्वप्रथम भारतात आणण्याचा मान बेस्ट उपक्रमाकडेच जातो.

ऑक्टोबर १९४९ पासून जोगेश्वरी, जानेवारी १९५५ पासून पूर्व उपनगरे मुलुंड व डिसेंबर १९६० पासून बोरीवलीपर्यंत,१९८४ साली वाशीपर्यंत,१९९५ ठाणे, मीरा-भाईंदर पर्यंत बससेवेचा विस्तार झाला.

जुन्या बसच्या सांगाड्याच्या बांधणीत धातूसह लाकडाचा प्रामुख्याने वापर असल्याने २-३ वर्षातच ब्रेकच्या झटक्यांनी त्रास होत असे. १९५३ नंतर बस बॉडी बांधणीत आमूलाग्र बदल झाला.बस बॉडी बांधणीत धातूचाच वापर होऊ लागला. प्रवाशांच्या व ड्रायव्हर-कंडक्टरच्या सोयी लक्षात घेऊन आसनव्यवस्था, बसच्या दरवाजांची स्थाने,आकार,रंगसंगती,दर्जा इत्यादीत बदल केला आणि बसचे रंगरूप पालटू लागले.

७ ऑगस्ट १९४७ रोजी बेस्ट कंपनी मुंबई पलिकेच्या ताब्यात आली आणि बेस्टचे देशातील पहिल्या ‘सार्वजनिक उपक्रमात’ रूपांतर झाले. भारतीय स्वातंत्र्यदिनी आणि गणराज्य दिनी दिवशी विशेष रोषणाई केलेली ट्राम व बस सर्वांचे लक्ष वेधून घेत असे.

बसचा रंग प्रामुख्याने लालभडक व त्यावर फिकट पिवळसर क्रिम रंगाचा पट्टा ही रंगसंगती असली तरीही दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी (१९४१ ते ४५) नागरी वस्तीवर हवाई हल्ले होऊ नयेत म्हणून ट्राम व बसेसना (न चकाकणारा -‘मॅट’)असा ‘सैनिकी हिरवा’ रंग देण्यात आला होता.

घोड्याने ओढणाऱ्या ट्रामपासून..तर डिझेल- इलेक्ट्रिक हायब्रीड एसीबस ते प्रदूषणमुक्त इलेक्ट्रीक बसपर्यंत,इतर कोणत्याही वाहतूक संस्थेने दिल्या नसतील इतक्या विविध प्रकारच्या बसेस व तितक्याच प्रकारच्या वाहतूक सेवा बेस्टने मुंबईकरांना आजवर दिल्या आहेत.
स्तोत्र:गुगल/इंटरनेट..
संकलन:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🚌🚎🚌🚎🚌🚎🚌🚎🚌🚎🚌🚎🚌🚎🚌

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*