नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇१७👇
आम्ही दत्तवाड्याहून पुढे निघालो तेव्हा थोडा उशीरच झाला होता. मयूरेश दादा सकाळी लवकर उठून पुढे निघून गेले होते. आम्ही बाकी मंडळी नंतर निघालो. त्यात गंमत अशी तेव्हा आमच्या सोबत अलकाताई कुलकर्णी पण होत्या. त्यांचा दंड आश्रमातच राहिल्याचं सधारण ४ किमी अंतर पार करून झाल्यावर लक्षात आलं. आता काय करायचं? उलटं परत जाणं शक्य नाही! एकटी बाई जाईल तरी कशी आणि थांबेल तरी कशी? मग थोडं थांबलो, तिथे रस्त्यावरून एक गावकरी माणूस सायकल वर जात होता, त्यानी ओळखलं की काहीतरी अडचण या परिक्रमावासींना आलेली आहे. त्यानी विचारलं आणि लागलीच म्हणाला ‘आप चलते रहो, आपका दंड मै सायकल से ला देता हू…!’ बिचारा आमच्यासाठी चार किमी गेला आणि दंड घेऊन आला.
खरं तर गावागावातून मार्ग दिला होता तसं आम्ही दही बेडा, पिप्लोद, देदला, कसरावद मार्गे राजघाट ला जायचं ठरवलं आणि कसरावद पर्यंत आलो देखिल. इथून पुढे एकलदा आणि राजघाट. आणि राजघाट हून पुढे सुरु होणार परिक्रमामार्गातला सगळ्यात कठीण रस्ता, शूलपाणीची झाडी. पण गंमत माहितीये का, हा राजघाट पर्यंतच रस्ता काही साधा सुधा नक्कीच नव्हता. आम्हाला तरी तो शूलपाणी झाडी सारखाच कठीण वाटला.
कसरावद नंतर एक वाट शेतातून जाते. तिथे पुढे एक आश्रम लागतो. त्या आश्रमापर्यंत आम्ही नीट पोहचलो, तिथे आश्रमातले स्वामिजी नव्हते म्हणून तिथे जास्त थांबलो नाही आणि राजघाटला लवकर पोहोचता यावं हा हि एक हेतू होताच.. पण असं होत नसतं…इथून पुढचा रस्ता एकट होता, दोन्ही बाजूला बाभळीची जाळी होती आणि त्याहून गंमत म्हणजे दर पाचव्या मिनिटाला दोन फ़ाटे.. कुठे जायचय काही काळायला मार्ग नाही. मग आम्ही लोकांच्या पाऊलखूणा बघायला सुरवात केली, जिकडे जास्त चपला जाताहेत तिकडे जाऊ, असं ठरवलं आणि एक दोन दा तरी गोल चक्कर मारून परत होतो त्याच जागी आलो. तसं पाऊलखूणा बघण ही काही चांगली कल्पना नव्हती कारण या कल्पनेमुळेच पुढे आम्हाला वेगळ्य़ाच भयाला बळी पडावं लागलं. झालं असं की चपलांच्या खुणा बघता बघता मला, स्मिताला आणि पसारकर काकांना बिबट्याच्या पाऊलखुणाही दिसल्या. माणसापेक्षा त्या जास्त होत्या…आणि आम्हाला वाट सापडत नव्हती, पण तो तिथला चांगलाच जाणकार असला पाहिजे असं आमचं मत होतं. मग आता सोबत राहायचं, फ़ारसं मागेपुढे व्हायचं नाही वगैरे निर्णय घेतले.
लहानपणी आपण काही गोष्टी फ़ार मन लावून करतो. माझी वाचनाची आवड माझ्या बाबांनी अगदी जीव तोडून पुरवली होती. बाकी आय़ुष्यात त्याचा फ़ायदा ही झाला पण नेमकं नको अशा ठिकाणी मला मी लहानपणी वाचलेले “रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता” आणि जिम कॉर्बेट च्या वगैरे कथा आठवून गेल्या. मग आम्ही सगळे नर्मदे हरचा जप करत निघालो. सुदैवाने फ़ोन ला रेंज आली आणि मयुरेश दादाला फ़ोन केला… तो एकटा गेला असावा इथून या विचारांनी सुद्धा थरकाप झाला. पण त्याला देखिल सोबत मिळाली होती. त्याला जसं जसं आठवेल तसं तसं तो सांगत होता आणि तसं तसं पुढे सरकत होतो. मात्र रेंज गेली….
आता आम्ही किती दूर आहोत, कुठल्या दिशेला जायचय काहीही माहित नाही. अशा वेळी विजेचे दूरवर दिसणारे टॉवर फ़ार मदतिला धावून येत असते. आम्ही टॉवर च्या दिशेने चालू लागलो पण ते खूप दूर होते. आम्ही संध्याकळपर्यंत तिथे पोहोचू शकणार नाही असं वाटत होतं आणि रात्र इथे काढण्याबद्दल विचार करणं ही भयंकर होतं. आम्ही नर्मदे हर इतक्या मोठ्याने म्हणत होतो की जेणे करून ते त्या प्राण्याला ऐकू जावं आणि हो त्या मैयाला पण! तो येऊ नये आणि तिनी धावून यावं ह्या दोन इच्छा प्रबळ होत्या अगदी. झाली, त्यातली एक इच्छा पूर्ण झाली… तसं पाहता त्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या..
झालं असं की दूरून एक पांढऱ्या रंगाचं पण मळकट धोतर घातलेला, अतिशय काळा सावळा… अगदी दगडासारखा काळ्या रंगाचा, डोक्यावर टोपी घातलेला आणि धुळीने माखलेला एक माणूस समोरून येताना दिसला.त्याला पाहून इतकं शांत वाटलं म्हणून सांगू! तो जसजसा जवळ येत होता तसं तसं त्याच्या चेह-यावरच स्मितहास्य खूप ओळखीचं वाटत होतं.. त्याच्या डोक्यावरची टोपी ही क्षणभर मला मुकुटासारखी वाटून गेली…
काही समजलं नाही मात्र मन प्रसन्न झालं. आता हा आपल्याला मदत करणार असं वाटायला लागलं. त्याच्याशी बोलावं इतका जवळ तो अजून आला नव्हता.. मात्र तो जवळ आला तो क्षण माझ्यासाठी खूप वेगळा आणि खूप अनपेक्षीत होता..
तो जवळ आला तसं आम्ही सगळेच त्याच्यावर तुटून पडतो की काय या आवेशात राजघाटचा चा रस्ता विचारू लागलो.. आम्ही ३-४ जण एकदम बोलल्यामुळे त्याला कळलच नसणार काही आणि म्हणून तो काही बोललाच नाही मात्र कमरेवर हात देऊन उभा राहिला….
तो काळा सावळासा माणूस, हात कमरेवर, डोक्यावर टोपी, जी मला काही क्षणापूर्वी मुकुटासारखी वाटली होती, तो शांत मुद्रेने हसत होता… मी अवाक होते, काकांनी त्याला पत्ता विचारला… तो म्हणाला “अगले गाव तक मै आपके साथ चलता हू”… मी पसारकर काकुंकडे पाहिलं आणि आम्ही दोघीही एकमेकिंकडे पाहून काय म्हणालो माहितीये? अगदी काहिही न ठरवता, न चर्चा करता आमच्या दोघींच्या तोंडून काय निघालं माहितिये?.. मी म्हणाले “पंढरीचा विठोबा असावा तसाच आहे गं हा….विठोबा आला धावून!” आणि पसारकर काकू काय म्हणाली माहितिये? “पांडूरंगा…आलास बाबा”! त्या माऊलीकडे पाहून आम्हा दोघींना एकाच वेळी तो आठवावा आणि एकाच वेळी हे असे शब्द आमच्या मुखातून बाहेर पडावे! आम्ही दोघींनी फ़क्त हात जोडले, आणि त्या माऊलीच्या मागे मागे जाऊ लागलो. ठरल्या प्रमाणे त्या विठू ने आम्हाला पुढच्या पाड्यापर्यंत सोडले. पाच सहा घरं जेमतेम असतील नसतील..पुढे जंगल कायम..पण आता जंगल विरळ होतं आणि पाठिमागे माणसांची वस्ती आहे हे माहित होतं त्यामुळे घाबरायला झालं नाही. टॉवर मात्र अजूनही थोडं दूर होतं.. त्या टॉवर चा शोध घेत घेत आम्ही कसं तरी राजघाट च्या रेवाश्रय गोशाला आश्रमात एकदाचे येऊन पोचलो.
इथे छानसं मंदिर होतं तिथेच आसन लावलं. इथून पुढे शूलपाणीची झाडी लागणार होती. आम्ही ट्रायल आताच पाहिली होती. त्यामुळे सगळ्यांनी सोबत राहयचं, गरम कपडे असू द्यायचे, औषधं असू द्यायची असं काही बाही सगळेच जण आपसात बोलत होते. माझ्याकडे स्लिपिंग बॅग तर होती मात्र सतत कोंबून ठेवल्याने ती विरळ झाली होती आणि जमिनीवर अंथरली असताना खालून पाठीला फ़ार थंड लागायचं.. अर्थात राजघाट पर्यंत मला त्याचं फ़ार वाट्लं नव्हतं मात्र झाडीत फ़ार थंडी असते, शिवाय झाडी मुळे काही मिळत नाही असाही एक विषय होता, त्यामुळे काही घ्यायचं असेल सामान तर ते इथेच किंवा बडवानी लाच घ्यावं लागणार होतं. सोबत फ़ारसा पैसा नव्हता. शिवाय झाडीत लूटमार होते, इथले आदिवासी लोक लुटून घेतात… अगदी बरेचदा अंगावर कपडा पण ठेवत नाहीत असं ही आधी वाचलं ऐकलं होतं. झाडीतून जायचं की नाही, हा ही एक विषय होताच मात्र काहिही झालं तरी झाडीतूनच जाईन असा माझा विचार पक्का होता. कोणते रस्ते उघडे आहेत आणि कोणचे बंद, हे ही अजून नक्की माहित नव्हते. धरणामुळे पाण्याची जी पातळी वाढते त्यामुळे बरेच रस्ते पाण्याखाली गेले होते असं समजलं होतं.
तसा राजघाट चा काही भाग पण डूब मधे होता, म्हणजे पुढे कधी इथे आल्यास तो दिसणार नाही हे माहित होतं. मी ज्यावेळी परिक्रमेचे इतरांचे अनुभव फ़ेसबुक किंवा इंटरनेट वर वाचायचे नं तेव्हाचे काही फ़ोटॊ माझ्या डोळ्यासमोर होते. एक दत्ताचं मंदिर मी पाहिलं होतं… ते पाण्याखाली जातानाचे फ़ोटो कुणितरी अपलोड केले होते पण मला काही केल्या त्या गावाचं नाव आठवेना. मात्र ते मंदिर आपल्याला बघायला मिळणार नाही कारण ते पाण्याखाली गेलं आहे हे मला माहित होतं. सुंदरशा पाय-या, समोर खांब, आतमधे संगमरवरी फ़रशी, गाभा-याला पण पाय-या आणि आत एकमुखी दत्ताची रेखीव मुर्ती असं ते पाण्याखाली गेलेलं मंदिर!..पण मला ते बघायला मिळनार नव्हतं आणि ते कुठे होतं ते मला अजिबात आठवत नव्हतं… जेव्हा जेव्हा डूब हा शब्द मी ऐकत असे तेव्हा तेव्हा मला ते मंदिर आठवायचं….राजघाट च्या या सगळ्या गोष्टी सुरू असतानाही डूब चा विषय निघत होता आणि ते मंदिर मला सारखं आठवत होतं…. आणि अचानक ते मंदिर आठवून मला खूप हळहळ वाटू लागली…अगदी आधी वाटली असेल नसेल त्याहीपेक्षा जास्त. मझ्या हातात हळहळण्या पलिकडे काहीही नव्हतं.
संध्याकाळी मैयापूजा करायला आम्ही मैयावर जायचं ठरवलं. अंधाराच्या बरच आधी मैयावर जायचं होतं. साधारण दोन अडीच किमी अंतर असेल, फ़ार नाही. आम्ही मैयावर जायला गेलो तेव्हा कुणीतरी म्हणालं, नागपूरची एक बस पण परिक्रमावासिंना घेऊन आली आहे आणि मैया किनारीच्या आश्रमात त्यांचा मुक्काम आहे. मनात एकदम आपुलकी ची भावना निर्माण झाली आणि त्यांना भेटायचं ठरवलं…. त्यांच्या आश्रमात जाऊन दोन चार शब्द बोलावे, छान वाटेल.. असं वाटलं आणि मनात विचार आला “ आज काहीतरी छान होणारे, आपल्या नागपूरची मंडळी भेटतात आहे हे तर आहेच पण अजूनही काही तरी नक्की होणारे छान”… कदाचित त्यात कुणी ओळ्खीचं भेटणार असेल, काय माहित नाही पण असे विचार मनात येत होते…आणि असच झालं देखील… मला तिथे गेल्यावर नागपुरची मंडळी भेटली पण अजून एक मोट्ठी भेट झाली…अगदी अशी की मी नकळत रडू लागले…. कोण भेटलं असेल तिथे मला? माझे आई वडील?.. नाही… पण तसच कुणी… खूप खूप जवळचं… सांगते पुढच्या म्हणजेच १८ व्या भागात. अजूनही अनुभव आलेत राजघाटला… सांगते सांगते…. थोडा वेळ द्या मला.. तोवर ..नर्मदे हर!
सुरूची नाईक:विदर्भ गट:देवा तुझा मी सोनार-9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply