नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती-भाग_४.
↕️
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी लागोपाठ अनुभव, एक शुभ संकेत,आणि एक कोडं पडतं तेव्हा…
नर्मदे हर…..
नर्मदे हर… तर मागच्या भागात आपण मला पडलेल्या कोड्याबद्दल बोलत होतो! लेले काका असं काय म्हणाले होते? मी इतकी बुचकळ्यात का पडले? या कोड्याचा उलगडा कसा आणि कुठे झाला ते आता सांगते.
लेले काकांशी माझ्या ब-याच गप्पा झाल्यात. साधना कशी करायची? माझे गुरू कोण? कुठले श्लोक म्हणायचे, काय वाचायचं असे अनेक विषय ते माझ्याशी बोलत होते.. खरतर माझ्या बाबतीत त्यांनी फ़ार काही विचारलं नाही पण मी मात्र अनेक प्रश्न विचारू लागले. तेवढी मोकळीक तोवर बोलून निर्माण झाली होती. ते अगदीच प्रेमाने माझ्याशी बोलत होते…मधे मधे मला आशिर्वाद ही देत होते..”छान होईल बेटा तुझं सगळं”…असं ऐकून छान वाटत होतं, कुणी एक आजोबा, काही कारण नसताना, निस्वार्थ भावनेनी आशिर्वाद देतात हेच मुळात एक वेगळं फ़ीलिंग होतं. मला हे लेले आजोबा वेगळे वाटले, पण आवडले होते.
आमचं भोजन प्रसादी घेऊन झालं आणि लेले काका म्हणाले, बाळ, बरीच प्रश्न दिसतात तुझ्या मनात…बरं मी उत्तर देतो..तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगतोच आता! आजोबा काय सांगतात या कडे मी कान लावून होते. त्यांनी जरा पॉज घेतला, मला थोडं बाजूला बोलावलं, आणि म्हणाले, नाही मी नाही सांगणार तुला माझ्याबद्दल…अरेच्या, अचानक काय झालं आजोबा, सांगा ना….मी आग्रह केला. त्यवर ते म्हणतात…”नको, माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबत च्या लोकांकडून समजेल…आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी”.
मला आता मात्र फ़ारच वेगळं वाटू लागलं…पण एक शुभ संकेत मिळाला…. माझ्या परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात असं आजोबा म्हणाले, म्हणजे परिक्रमा पूर्ण होणार हे नक्की. आजोबांना जास्त आग्रह न करता आम्ही पुढची वाटचाल सुरु केली. मी आता मझ्या मैत्रिणीसोबत होते आणि आजोबा त्यांच्या सोबत च्या पुरुष मंडळींसोबत. ती माझी आणि आजोबांची शेवटची भेट. काय आश्चर्य न? त्या नंतर पूर्ण परिक्रमेत मला लेले काका पुन्हा दिसलेच नाही. मी मात्र प्रत्येक आश्रमात ते येऊन गेले का ही चौकशी करायचे. म्हातारा माणूस, आपल्या पेक्षा पुढे जाणार नाही कदाचित असं वाटायचं.
पुढे माझ्यासोबत मंदार वाळिंबे, सुदिन पराडकर आणि त्याचे काका, आणि तांबे बाबा असे लोक होते. सौ मंत्रींची परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही आणि सौ डोंगरे काही कारणास्तव वेगळ्या गृप बरोबर होत्या…आम्ही सोबत राहयचं ठरवलं असून ते तसं झालं नव्ह्तं!.असो.. तर लेले काकांबद्दल मंदार व गृप माझ्याकडून ऐकून होते. मी लेले काकांचा शोध घेतेय हे त्यांना महित होतं. तब्बल साडे चार महिने गेलेत…मला लेले काका भेटलेच नाही, मात्र एक दिवस अचानक माझ्या समोर जे काही आलं त्याने मी धन्य धन्य झाले… माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटावा अशीच गोष्ट.
नरसिंगपूर जिल्ह्यातल्या गुरसी गावात एका मंदिरात आम्ही आश्रय घेतला. तिथून पुढच गाव रमपूरा, फ़क्त ७ किमी. मी आणि तांबे बाबा गुरसी हून थोडं उशीरा निघालो..मंदार आणि मंडळी सकाळी लवकर निघून रमपू-याला पोचली. तिथून मंदार चा फ़ोन आला, म्हणाला, “ताई आज रमपुरा ला मुक्काम करायचाय!” मी- काय? फ़क्त ७ किमी चालून मुक्काम? नाही रे, अशानी कशी पूर्ण व्हायची परिक्रमा. मी नाही मुक्काम करणार…. मंदार- पण ही रमपु-याची मंडळी जाऊच देत नाहीयेत ताई…तुला मुक्काम करायचा नसेल तर तू दुसरी कडून जा.. असं पुढच्या फ़ोन मधे मला सुदिन सुद्धा सांगत होता… त्या दोन तासात आमचे ३ ते ४ फ़ोन झाले…कुठे पोचलात, पुढचा रस्ता कसा असं आम्ही सतत कॉन्टेक मधे होतो. पुन्हा एक फ़ोन… मंदार म्हणाला, ताई नो ऑप्शन..तुला थांबायलाच लागेल..आणि आता जे मी सांगणार आहे त्याला तू नकार देऊच शकत नाही…तो म्हणाला, तुला लेले काका आठवतात?… मला वाटलं ते तिथे आहेत म्हणून मंदार आपल्याला थांबायला म्हणतोय..पण माहितिये का, ते तर नव्हते तिथे, मात्र तो आश्रम माझ्या गुरुबंधू नी तयार केलेला. माझ्या गुरुंचा वास तिथे…आता विषयच संपला होता… मंदारच्या एका वक्याने पिक्चर क्लीअर झाला..तो म्हणाला, ताई नाना महारांजाचा आश्रम आहे, तू मुक्काम करतेयेस, आणि लेले काकांबद्दल महत्वाची बातमी सांगायचीय.. लवकर ये.
साडे चार महिने, परिक्रमेचा जवळ जवळ शेवटचा टप्पा..अमरकंटक च आमचं नेक्स्ट टारगेट…. काय समजणार होतं मला लेले काकांबद्दल ???… “माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबत च्या लोकांकडून समजेल…आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी.” मला लेले काकांच वाक्य आठवलं…. उत्सुकता शिगेला पोचली…आणि मी रमपु-याला!गेल्या गेल्या गुरुंचा प्रसाद मिळाला…आणि मग मंदार नी जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न च झाले… “ताई लेले काका कोण माहितिये का? ते साक्षात शंकर महाराज आहे” पुण्याला शंकर महाराजांचा आश्रम आहे हे आपल्याला महितच असेल. दत्त संप्रदायातले हे संत सद्गुरू! मोठे आणि भेदक डोळे, अजानुबाहू आणि गुडघ्यावर हात ठेवून बसलेले अशी यांचि मूर्ती मी पाहिली होती. हे लेले काका म्हणजे शंकर महाराज च होते..मी विचारलं मंदार ला..तुला कसं समजलं रे?
तर त्याने धनंजय नाईक नावाच्या एक नर्मदा भक्ताची गोष्ट मला सांगीतली…
धनंजय नाईक हे दर वर्षी परिक्रमा करतात. ते शंकर महाराजांचे भक्त. दर वेळी शंकर महाराज त्यांना भेट देतात, पण ह्या साक्षातकाराबद्दल धनंजय नाईकांना उशीरा कळतं…या वेळी श्री नाईकांनी शंकर महाराजांना विनवणी केली की “मीच शंकर महाराज असं स्वत: च्या तोंडून सांगा, तरच माझा विश्वास बसेल” मी रमपु-याला असताना लेले काका अमरकंटक ला पोहचले होते. धनंजय नाईंकाना त्यांनी स्वत: सांगितलं “ माझी वाट बघत होतास ना? मी च शंकर महाराज आहे” ही वार्ता वाऱ्यासारखी रमपु-याला पोचली, आणि माझ्या पर्यंत आली…परिक्रमा झाल्यावर मी धनंजय दादांना फोन करून या प्रसंगाची खात्री करून घेतली होती.
मी खरच भाग्यवान… परिक्रमेच्या आधी गुरुमाऊली मला पदरात घेते, श्री दत्तगुरू त्यांच्या अनेक रुपातून मला भेट देतात, माझी काळजी घेतात…लेले काकांनी मन भरून आशिर्वाद दिले आणि ठरवल्याप्रमाणे माझ्या कोड्याचा उलगडा माझ्याच गुरुंच्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर आणला…या सगळ्या काळात एक घटना अजून घडली होती, आणि ती माझ्या नजरेतून सुटून गेली..पण मी त्यांचा नजरेतून सुटली नाही..शंकर महाराजांचं माझ्याकडे व्यवस्थित लक्ष होतं हे मला नंतर जाणवलं.
मी गरुडेश्वर ला असतानाची गोष्ट. भालोद चे प्रतापे महाराज म्हणजे आई स्वरूप. मी त्यांची लेक..मूळचे नागपूर चे, त्यामुळे अजून थोडा सॉफ़्ट कॉर्नर…त्यांचे अनुभव पुढे सांगेनच, पण हे प्रतापे महाराज मला गरुडेश्वर ला भेटायला आले.. हो खास मला भेटायला भालोद हून नर्मदा मैया क्रॉस करून नावेतून आले होते. त्या वेळी त्या नावेत शंकर महाराजांचे भक्त त्यांची मूर्ती घेऊन आले होते. गरुडेश्वर घाटावर मी शकर महाराजांच्या आरती आणि पूजे मधे सामिल होते..पण मी अनभिज्ञ होते…..हे निम्मित्त मात्र होतं, संकेत होता, इशारा होता का काय ते माहित नाही, पण शंकर महाराज माझ्यावर लक्ष ठेवून होते हे समजायला मला साडेचार महिने लागले. नक्कीच मी पुण्यकार्य केलं असलं पाहिजे की असे संत सद्गुरू मला प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेत होते. ‘गुरुकृपा हि केवलम’ म्हणतात तेच खरं. एक गुरू प्रसन्न असलेत की सुख दु:खाची तमाच जाणवत नाही.. माझ्यासारख्यांना हे समजायला वेळ लागतो…पण हळू हळू प्रचिती येतेच!गुरू आणि नर्मदा मैया यांनीच माझी परिक्रमा पूर्ण करवून घेतलीये असं मी का म्हणतेय ते आता तुमच्या लक्षात येईल. कारण जसे संत सद्गुरू माझ्या सोबत सुरवाती पासून होतेत तशीच माझी नर्मदा माई पण होती..आमचा दुसरा, म्हणजे मोरटक्क्यानंतर चा मुक्काम झाला टोकसर ला. परिक्रमा सुरू होऊन अजून आठवडा ही व्हायचा होता…पूर्ण तयारी करून मी परिक्रमेला निघाले होते.. माझ्या बाबांचे चांगले महागडे आणि सगळ्यात छान समजणारे केचूआ कंपनीचे जोडे मी घातलेले होते… आणि इतके चांगले जोडे असून ते टोकसर गावाच्या ५ कि.मी आधी फ़ाटले…अजून परिक्रमेची जेम तेम सुरवात होती…मात्र इथे सुद्धा मला वेगळाच अनुभव आला…काय तो पुढच्या भागात मधे सांगते.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply