जितेंद्र कोतवाल यांची पिंपरी चिंचवड पोलिस दलात निवड
(१७ वर्ष आर्मी सेवा बजावून निवृत्त झाल्यावर पुन्हा देशसेवा करण्याचा घेतला निर्णय;बडगुजर समाजातील गौरवास्पद कामगिरी)

श्री. जितेंद्र सुधाकर कोतवाल (बडगुजर) यांची पिंपरी चिंचवड पोलिस दलात निवड झाली असून ते २८ मे २०२३ रोजी रूजू झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुन्हा एकदा बडगुजर समाजाचे नाव उंचावले आहे. शांत, संयमी व अडचणीत असलेल्याना मदतीचा हात देणार्या व्यक्तीमत्वाचा आजवरचा जीवनपट हा प्रेरणादायी असाच आहे. जितेंद्र कोतवाल यांचा जन्म १७ जून १९८४ रोजी पिंप्री (ता. धरणगाव, जि. जळगाव ) येथे झाला आहे. त्यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना खूप संघर्षांत दिवस काढले आहे. आई, वडील, लहान भाऊ असे त्यांचे चौकोनी कुटुंब आहे. परिस्थिती जेमतेम असल्याने बालपणापासून त्यांनी मिळेल ते काम करून घराला हातभार लावला आहे. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षी जितेंद्र हे भारतमातेची सेवा करण्यासाठी आर्मीत भरती झाल्याने घराचे दिवस पालटण्यास सुरूवात झाली. भावाच्या पाऊलावर पाऊल ठेवत लहान भाऊ परेश कोतवाल हा देखील आर्मीत भरती झाल्याने कोतवाल कुंटुबात सोन्याचे दिवस आले. देशाची सेवा करतानाच त्यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण केले. २००९ मध्ये त्यांचा विवाह वर्षी (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील भरत आत्माराम बडगुजर यांची कन्या सुषमा हिच्याशी झाला. पत्नी देखील शांत, संयमी व संकटात मदतीला धावून येणारी आहे. अल्पावधीतच तिने कोतवाल परिवारातील सदस्याच्या मनात घर केले आहे. जितेंद्र यांना दोन मुली भुमी व तनवी असून त्या देखील आई व वडिल यांच्या सारख्या हुशार आहे. त्या सध्या पुण्यात आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. संकटे आली तरी डगमगायचे नाही या विचाराने झपाटलेल्या जितेंद्र यांच्या जीवनात सुखासोबत अनेक दुःखाचे पहाड आले पण त्यांनी दोन हात करत कुंटुंबाचा बुरूज हलू दिला नाही. असा अवघड प्रवास करून दोघी भाऊ १७ वर्ष भारतात विविध राज्यात सेवा बजावून २०२० रोजी दोघे भाऊ सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तनंतरचा काळ त्यांना स्वस्त बसू देत नव्हता म्हणून त्यांनी पुन्हा शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झपाटून प्रयत्न व अभ्यास सुरु केला. विविध स्पर्धा परीक्षा व शासकीय परीक्षा त्यांनी दिल्या. याच काळात अंगावर शहारे व डोळ्यात अश्रू आणणारा कोरोना सुरू झाला. त्यामुळे सर्वञ भरती ठप्प झाल्या म्हणून काही तरी उद्योग करावा, म्हणून पुण्यात त्यांनी शालक तथा युवा उद्योजक शैलेश भरत बडगुजर यांच्या सोबत उद्योगात उतरले. दोघांनी सुरूवातीला लाकडी घाण्याचे तेल व मसालेचा उद्योग काही पार्टनर सोबत केला. त्यात यश आल्यानंतर शैलेश बडगुजर यांच्या सोबत जेली कॅन्डी फॅक्टरी सुरू केली. हा व्यवसाय देखील अल्पावधीत नावारूपाला आला आहे. आज त्यांची जेली कॅन्डी ही संपूर्ण भारतात जात असून तीने चिमुरड्यापासून ते अबाड वृद्धांपर्यंतच्या व्यक्तीच्या मनात घर केले आहे. व्यवसाय उभारी घेत असताना त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलातील पिंपरी चिंचवड येथे पोलिस भरतीत भाग घेतला. त्यात विविध अवघड चाचण्या यशस्वीपणे पार करून ते आज पोलिस दलात भरती झाले आहे. या यशात त्यांना वडील सुधाकर बडगुजर, आई मंगलाबाई सुधाकर बडगुजर, पत्नी सुषमा जितेंद्र बडगुजर, भाऊ परेश बडगुजर, पल्लवी परेश बडगुजर, सासरे भरत बडगुजर (वर्षी), सासू शशिकला भरत बडगुजर, शालक युवा उद्योजक शैलेश बडगुजर (पुणे), भारती शैलेश बडगुजर, साडू जळगाव येथील दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक सुनील बडगुजर व शिक्षिका शीतल सुनील बडगुजर आणि इतर नातेवाईक, मित्र मंडळी यांची मोलाची साथ लाभली आहे. जितेंद्र कोतवाल यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
~ सौ. भारती शैलेश बडगुजर, पुणे.

Congratulations!