रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती-सजीव प्राणी,जमिन व पिकावर होणारे दुष्परिणाम तसेंच सेंद्रिय खतांचा तुटवडा या सर्व बाबींचा विचार करता उपाय म्हणून स्वस्त-मस्त-सोपा उद्योग “गांडूळ खत निर्मिती” तथा “गांडूळ शेती”कडे शेतकरी बंधूंनी वळणे ही काळाची ठरूं शकते.
गांडूळाला दानवे,वाळे किंवा कचवे व इंग्रजीत अर्थवर्म या नावाने ओळखले जाते.गांडूळ एक नाजूक,मऊ,गुळगुळीत शरीराचा जंतासारखा आकार असणारा प्राणी असून तो आकाराने ६ सें.मी.पासून ६० सें.मी. पर्यंत असतो.रंगाने तांबूस,तपकिरी लालसर किंवा पांढरट असतो.गांडूळाच्या अंडी,अपूर्ण व पूर्ण अवस्था अशा तीन प्रमुख अवस्था असून,त्या ओलसर जमिनीत पूर्ण होतात.कोरड्या मातीत किंवा पाण्यात गांडूळ जगू शकत नाहीत.गांडूळ पूर्ण अवस्थेत प्रत्येक आठवड्यांत एक अंडीपुंज(एका अंडीपुंजात २-६ अंडी असतात) याप्रमाणे अंडी घालतो. गांडुळाचे आयुष्य २ ते ३ वर्षे असते.
गांडूळ खत करण्याचे तंत्रः गांडूळ खत तयार करण्यासांठी ‘इसिनिया फोयटीडा’ या विदेशी जातीच्या गांडूळचा वापर करावा.जमिनीमध्ये २० सेंटीमीटर खोलीचा १ मीटर लांब – ६० सेंमी. रूंद असा खड्डा खोदावा,या खड्ड्यामध्ये ३/४भागांत कम्पोस्ट खत किंवा शेणखत व राहिलेल्या १/४भागात अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजे पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा व गादीवाफा करावा.या वाफ्यावर दिवसभर सावली राहिल,याप्रमाणे छप्पर करूनत त्यांत साधारणपणे २००० गांडुळे सोडावीत. गांडुळे सोडल्यानंतर गादीवाफ्यावर गोणपाटाचे आच्छादन करून दिवसातून तीन वेळेस पाणी शिंपडावे अश्याप्रकारे गांडूळ खत {vermicompost} तयार होते(साधारणतः ४००-४५०किलो गांडूळ खत मिळळू शकते)सदर खत हाताने (टिकाव, पावडी,खोरे,खुरपे या औजारांचा वापर शक्यतोवर टाळावा म्हणजे गांडूळांना ईजा होणार नाही)बाजूला करावे.पूर्ण वाढ झालेली गांडूळे वर नमूद केलेप्रमाणे पुन्हां गादीवाफ्यात सोडावीत. तयार झालेल्या खतामध्ये गांडुळाची अंडी,त्यांची विष्टा, कुजलेले खत असते.हे गांडूळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते किंवा छोट्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा, शेणखत,माती यांचे मिश्रण टाकून त्यांत मिसळून द्यावे, तेथे गांडुळाची पैदास सुरूं होते त्यासांठी तो खड्डा ओलसर राहील(खड्डा जास्त कोरडा किंवा त्यांत जास्त पाणी राहणार नाही) अशी काळजी घ्यावी.
सध्या विविध रोपवाटिकेत ७’लांबx३’रुंदx२’उंचीचे रेडीमेड ताडपत्री मिळते त्याचा वाफा ४ कोप-यांत बांबू लावून ५ मिनीटात तयार करून वरीलप्रमाणे ३/४ भागात कम्पोस्ट किंवा शेणखत व १/४भागांत कुजलेले सेंद्रिय पदार्थ टाकून भरावा.त्यांत साधारणतः ५००० गांडूळे सोडावीत अश्या वाफ्यापासून जवळजवळ सव्वा ते दीड टन गांडूळ खत मिळते.
गांडूळाचे/गांडूळ खताचे शेतीसांठी फायदेः १)गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
२)मातीच्या कणांच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो.
३)गांडुळाची विष्टा एक उत्तम खत असून त्याला ‘ह्युमस’ म्हणतात,यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना जलदगतीने उपलब्ध होतात.
४)जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाऊन जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची वाढ चांगली होते.
५)जमिनीत पाणी धरून ठेवणेची क्षमता वाढते व पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते.
६)जमिनीची धूप कमी होते.
७)जमिनीचा सामू(पीएच) योग्य पातळीत राखला जातो.
८)गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
९)उपयुक्त जिवाणूच्या संख्येमध्ये भरमसांंठ वाढ होऊन वरखते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते.
१०)झाडांची सशक्त वाढ होऊन त्याच्यात कीड व रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते.
११)गांडूळ खताचे उपलब्राधतेमुळे सायनिक खतांचा कमी वापर होऊन जमिनीत क्षारता कमी राखणेसांठी मदत होते.
१२)गांडूळ खत विशेषतः अन्नधान्य,भाजीपाला व फळबागामध्ये उपयुक्त असते. ———————–

सुरेख व उपयुक्त माहितीl
गांडूळ शेतीबद्दल प्रश्न वेब पोर्टलवर कमेंटस् करतांना विचारलेस समर्पक उत्तर दिले जाईल.ll